कलियुगातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’, म्हणजे द्वापरयुगात श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर महाभारताच्या वेळी केलेला शंखनाद असणे

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फर्मागुडी, फोंडा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. वैशाख कृष्ण पंचमी या तिथीला (१७.५.२०२५ या दिवशी) महोत्सवाला आरंभ होत आहे. स्थळ, काळ आणि अध्यात्म या दृष्टीने या महोत्सवाला पुष्कळ महत्त्व आहे. सध्या कलियुगातील संधीकाल चालू आहे. कलियुगांतर्गत कलियुगांतील एका छोट्या कलियुगाचा अंत होऊन छोट्या सत्ययुगाची स्थापना होणार आहे. अशा स्थितीत हा महोत्सव विश्वव्यापक स्तरावर होत आहे. ‘या महोत्सवाचा उद्देश आणि परिणाम’ यांसंदर्भात मला देवाच्या कृपेने सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान येथे दिले आहे.

१. महाभीषण आणि रौद्र आपत्काल चालू होण्यापूर्वी होत असलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’, म्हणजे भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर स्वतः शंखनाद करून धर्मयुद्धाला दिलेल्या अनुमतीप्रमाणे आहे !

२. शंखनाद महोत्सवात सहभागी होण्यासाठी संत-महंत, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांना निमंत्रण दिलेले असणे : कुरुक्षेत्रावर धर्मयुद्ध होण्यापूर्वी पृथ्वीवरील समस्त राजांची २ भागांत विभागणी झाली होती. एक कौरवपक्ष (अधर्माचा पक्ष) आणि दुसरा पांडवपक्ष (धर्माचा पक्ष) होता. त्या वेळी समष्टीला धर्मयुद्धात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.

अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

३. ‘या महोत्सवात ‘तन, मन, धन, बुद्धी आणि प्राण’ यांपैकी कोणत्याही प्रकारे सहभाग असलेला जीव धर्माच्या बाजूने आहे’, असे ग्राह्य धरले जाईल. ‘जे जीव तटस्थ रहातील, ते अधर्माच्या बाजूने आहेत’, असे ग्राह्य धरले जाईल.

३. कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धाचा कालावधी आणि ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा कालावधी अन् त्याचे माहात्म्य : कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्ध हे १८ दिवसांचे होते. आताचा शंखनाद महोत्सव ३ दिवस आहे. शंखनाद महोत्सवातील १ दिवसाची फलनिष्पत्ती ही कालमहात्म्यानुसार द्वापरयुगातील ६ दिवसांच्या समान आहे, म्हणजेच ६ पट आहे. कलियुगातील शंखनाद महोत्सवाचे ३ दिवस, म्हणजे द्वापरयुगातील १८ दिवस आहेत. कलियुगातील जिवाचे आयुष्य महाभारतकाळातील जिवाच्या तुलनेने अल्प असल्याने भगवंताने कालगणनेत असा पालट केला आहे.

अ. ‘१८’ या अंकात १८ विश्वे समाविष्ट आहेत.  

आ. ‘१’ हा अंक प्रारंभाचा असून ‘८’ हा विनाशाचा अंक आहे आणि या दोन्ही अंकांची बेरीज ‘९’, म्हणजे ‘नवनिर्मिती !’ नवनिर्मिती, म्हणजेच ‘प्रारंभ-अंत-नवीन आरंभ’, म्हणजेच ‘१८’ हा अंक सृष्टीतील ‘प्रारंभ-अंत-नवीन आरंभ’ यांचे प्रतीक आहे.

‘हे भगवान श्रीकृष्णा, या शंखनाद महोत्सवाच्या माध्यमातून आम्हा सर्व साधकांची तुला अपेक्षित अशी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर पुष्कळ साधना होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (१६.४.२०२५)