प्रेमळ आणि साधनेची आवड असणारे चिंचवड (जिल्हा पुणे) येथील कै. हेमचंद्र नारायणराव गिरी (वय ८५ वर्षे) !

‘१०.४.२०२५ या दिवशी माझे वडील हेमचंद्र नारायणराव गिरी यांचे निधन झाले. १०.५.२०२५ या दिवशी असलेल्या त्यांच्या मासिक श्राद्धाच्या निमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

हेमचंद्र नारायणराव गिरी

१. शिस्तप्रिय आणि साधी रहाणी

बाबा पहाटे उठत असत. ते त्यांची कामे वेळेवर करत असत. ते नीटनेटके रहायचे. ते ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीप्रमाणे जीवन जगले.

२. प्रेमभाव

बाबा त्यांच्या भावंडांमध्ये मोठे होते. त्यांनी भाऊ-बहिणी, त्यांची मुले आणि नातेवाईक यांना कधीही दुखावले नाही. त्यांनी सर्वांना प्रेमाने जोडून ठेवले होते. त्यांनी आम्हा तिघी बहिणींना सर्व प्रकारे साहाय्य केले. ते घरातील व्यक्तींना समजून घ्यायचे आणि समजावूनही सांगायचे. ते ‘आपल्याला देवाने दिले आहे, तर सर्वांना साहाय्य करायचे’, असे सांगत असत. गावातील लोक बाबांचे ‘हरि ॐ’ असे म्हणून स्वागत करायचे.

सौ. वैशाली सांबर

 ३. साधना

 

अ. बाबा तरुणपणापासून व्रतवैकल्ये आणि उपवास करत असत. ते प्रतिदिन अग्निहोत्र करत आणि सूर्याला अर्घ्य देत असत. त्यांना देवदर्शनाची पुष्कळ आवड होती.

आ. वर्ष २००० मध्ये आई-बाबांनी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची दीक्षा घेतली. तेव्हापासून बाबा प्रतिदिन त्यांना दिलेला गुरुमंत्र म्हणजे जप १० माळा करत असत.

इ. दळणवळण बंदीच्या कालावधीत आई-बाबांना सनातन संस्थेचा ‘ऑनलाईन’ सत्संग मिळाला. त्यांना ‘प्रत्येक कृती शास्त्रानुसार कशी करायची ?’, याविषयी समजले. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांची गुरुमाऊलींवर (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्यावर श्रद्धा वाढली.

ई. ते देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर ध्यानमंदिरात बसून नामजप करत असत. ते प.पू. भक्तराज महाराज यांच्या चारचाकी गाडीला प्रदक्षिणा घालत असत.

उ. माझ्या आईची (श्रीमती सुमती गिरी, वय ७५ वर्षे यांची) आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुझी आई साधनेत पुढे गेली. आपल्यालाही साधना करून पुढे जायचे आहे. त्यासाठी प्रयत्न करूया.’’ बाबा शेवटपर्यंत नामजप करत होते.

ऊ. बाबा त्यांना मिळणार्‍या निवृत्तीवेतनातून काही रक्कम अर्पण करत असत. त्यांनी सनातनच्या वह्या आणि सनातन पंचांग विकत घेऊन त्यांचे वाटप केले. ते देवस्थानांनाही अर्पण देत असत.

 ४. धर्मशास्त्रानुसार कृती करणे

अ. बाबांच्या घरी देवघरात पूर्वजांचा टाक ठेवला होता. आम्ही बाबांना ‘यांमुळे त्यांना पुढील गती मिळण्यात अडथळे येतात’, असे सांगितले. तेव्हा बाबांनी पूर्वजांच्या टाकाचे विसर्जन केले.

आ. एका संतांनी बाबांना ‘हॅलो’ म्हणण्याऐवजी ‘हरि ॐ’ म्हणायला सांगितले होते. बाबा त्यांच्या सहवासात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ‘हरि ॐ’ म्हणत असत.

५. संतांप्रती भाव

वर्ष २०२४ मध्ये पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४३ वर्षे) बाबांना भेटण्यासाठी घरी आल्या होत्या. तेव्हा बाबांचे मन भरून आले. बाबांना पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली.

 ६. शेवटचे आजारपण

६ अ. त्रास शांतपणे सहन करणे : बाबांना वयाच्या ८४ व्या वर्षांपर्यंत कुठल्याही प्रकारचा आजार झाला नाही. मार्च २०२४ मध्ये बाबांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. या आजारात त्यांच्यावर ‘केमोथेरेपी’चे उपचार (कर्करोगावरील उपचारप्रणाली) केले. त्याचा त्यांना पुष्कळ त्रास झाला. त्यांना अशक्तपणाही आला होता; पण त्यांनी कशाविषयीही गार्‍हाणे केले नाही. त्यांनी स्वतःला होणारा त्रास शांतपणे सहन केला. वर्ष २०२५ च्या पहिल्या आठवड्यात त्यांना पुष्कळ त्रास होऊ लागला. आधुनिक वैद्यांनी ‘आता काही करू शकत नाही’, असे सांगितले. तेव्हा बाबांच्यावर घरीच उपचार केले; पण त्यांचे शरीर साथ देत नव्हते.

६ आ. नामजपादी उपाय करणे : मी बाबांना नामजपाची आठवण करून देत होते. तेव्हा ते ‘नाम चालू आहे’, असे सांगायचे. बाबांना त्रास होत असतांना गुरुमाऊलींच्या कृपेने नामजपादी उपाय मिळाले. आई किंवा शक्य असेल, तेव्हा बाबा नामजपादी उपाय करायचे.

‘मला गुणी वडिलांच्या पोटी जन्म मिळाला’, त्याबद्दल मला कृतज्ञता वाटते. मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

–  सौ. वैशाली सांबर, चिंचवड, पुणे. (२९.४.२०२५)