नम्र आणि साधकांना आधार देणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. भानु पुराणिक (वय ४७ वर्षे) !

‘वैशाख शुक्ल त्रयोदशी (१०.५.२०२५) या दिवशी श्री. भानु पुराणिक यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहे.

श्री. भानु पुराणिक यांना त्यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. भानु पुराणिक

१.  श्री. प्रथमेश खांडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘वर्ष २०१६ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आलो. गेली ९ वर्षे मला सेवेच्या निमित्ताने श्री. भानुदादांचे मार्गदर्शन सतत मिळत आहे. माझे उत्तरदायी साधक या नात्याने मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहिण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

१ अ. सेवेतील बारकाव्यांचा स्वतः अभ्यास करून इतरांनाही शिकवणे : मला भानुदादांनी सेवेतील सूत्रे, बारकावे इत्यादी टप्प्याटप्प्याने शिकवले. त्यामुळे मला सेवेचे स्वरूप समजून घेतांना कधी ताण आला नाही. भानुदादा सेवेतील कृतींमागील कारणमीमांसाही स्पष्ट करत असत, उदा. ग्रंथ खोक्यात भरतांना त्यांच्या कडा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ठेवल्यास खोक्यातील ग्रंथांची संख्या अल्प असतांना खोक्यांची हलवाहलव केल्यास ग्रंथ एकमेकांत मिसळून पृष्ठे खराब होत नाहीत.

१ आ. साधकांना घडवणे : ‘साधकाला न दुखावता त्याला कार्यपद्धतीचे पालन करण्याचे महत्त्व लक्षात आणून देणे, तसेच साधकाला समजेल, अशा पद्धतीने त्याला त्रुटी निदर्शनास आणून देणे’, ही कौशल्यपूर्ण हातोटी दादांमध्ये आहे. दादा साधकांची क्षमता जाणून त्यानुसार त्यांना सेवा देतात. दादा साधकांमध्ये नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी प्रयत्नरत असतात.

१ इ. साधकाला त्याच्या आग्रही भूमिकेची जाणीव करून देऊन योग्य दृष्टीकोन देणे : काही वेळा सेवेच्या अंतर्गत येणार्‍या अडचणी, तसेच अन्य सूत्रे लिखित स्वरूपात कळवून आश्रमात अन्य सेवा करणार्‍या साधकांचे साहाय्य घ्यावे लागते. एका प्रसंगी मी यासंबंधीच्या सूत्रांचे लिखाण करून ते पडताळण्यासाठी भानुदादांना दिले. मी लिहिलेल्या लिखाणात ‘अन्य साधकांनी लवकरात लवकर सूत्रांविषयी निर्णय घ्यावा’, अशी माझी आग्रही भूमिका अभिव्यक्त होत होती. तेव्हा दादांनी मला सहजतेने सांगितले, ‘‘आपण आपल्या सेवेच्या अंतर्गत आलेल्या अडचणी अवश्य पुढे सांगाव्यात; पण अडचणी सांगतांना समोरच्या व्यक्तीने त्या सोडवायलाच हव्यात’, अशी अपेक्षा ठेवू नये.’’

१ ई. बोलण्यात अधिकारवाणी नसणे : भानुदादांनी कधीही मला एखादी सेवा अधिकारवाणीने सांगितली नाही. ते नेहमी ‘‘अमूक एक सेवा आहे, तर ती करायला तुला जमेल का ?’’, असे विचारतात. त्यांनी कधी मला सेवेनिमित्त भ्रमणभाष केल्यास ते ‘‘बोलायला वेळ आहे का ?’’, असे प्रथम विचारून नंतर अन्य सूत्रे सांगतात.

१ उ. उद्यमशीलता : ‘उद्यमशीलता’ हे दादांचे अजून एक भावणारे वैशिष्ट्य आहे. ‘भानुदादा कधी निवांत बसले आहेत’, असे मला कधीच पहायला मिळाले नाही. ते नेहमी सेवेत स्वतःला गुंतवून ठेवतात. त्यांचा व्यवस्थापकीय सेवा, तसेच तांत्रिक कौशल्य लागणार्‍या सेवा करण्यासह शारीरिक सेवा करण्याकडेही कल असतो. परिणामी त्यांच्याकडे असणार्‍या सेवांची व्याप्ती अधिक आहे; परंतु त्या व्यस्ततेतही ते साधकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवतात.

१ ऊ. इतरांना महत्त्व देणे आणि सेवेत साहाय्य करणे : मी पू‍र्वी आश्रमातून बाहेरगावी जातांना दादा मला पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, जेवण नोंदीतील पालट, आश्रम स्वच्छता सेवकाला कल्पना देणे इत्यादी आश्रमातील कार्यपद्धतींची पूर्तता केली असल्याची निश्चिती होण्यासाठी आठवण करून देत असत. परिणामी मागील काही वर्षांत आश्रमातून बाहेरगावी जातांना ‘सेवांचे हस्तांतरण किंवा अन्य काही साहित्य आश्रमात राहून गेले’, असे माझ्या संदर्भात घडले नाही. मी काही काळ अन्य ठिकाणी सेवा करत होतो. तेव्हा ‘आश्रमात होणार्‍या यज्ञयागादी कार्यक्रमांचा लाभ मला मिळावा’, यासाठी दादा कधीकधी स्वत:च्या व्यस्त नियोजनातूनही वेळ काढून मला घेण्यासाठी आले आहेत.

१ ए. साधकांच्या साहाय्यासाठी नेहमीच तत्पर असणे : एकदा मी नामजपादी उपाय करत असतांना मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीला त्रास होऊ लागला. त्या वेळी भानुदादा माझ्या शेजारीच बसले होते. त्यांनी मला प्रेमाने हाक मारून साहाय्य केल्याचा प्रसंग माझ्यासाठी स्मरणीय आहे. काही वेळा रात्री-अपरात्री माझा आध्यात्मिक त्रास वाढून मी अस्थिर होत असतांना दादांशी भ्रमणभाषवर बोलतो. काही वेळा माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रकटीकरण होऊन मी रागाच्या भरात किंवा उद्धटपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेव्हा दादांनी शांतपणे माझे बोलणे ऐकून घेतले. मी दुसर्‍या दिवशी त्यांची क्षमा मागितली. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तुझे रागाचे प्रमाण अल्प होत आहे ना, याकडे लक्ष देऊन प्रगतीची स्वयंसूचना घे.’’ तेव्हा त्यांच्या बोलण्यातील सहजता माझ्या मनाला भावली आणि माझ्या लक्षात आले, ‘दादांच्या मनाची पाटी कोरी आहे.’

१ ऐ. भानुदादांचे हसतमुख असणे आणि लाघवी शब्द यांमुळे अनेक वेळा मला त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.

१ ओ. सर्वांशी जुळवून घेण्यास साधकाला सांगणे : मला एका प्रसंगात भानुदादांनी सांगितले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विविध प्रकृतीच्या साधकांशी जुळवून घेतात, तर आपल्यालाही तसे शिकून सर्वांशी जुळवून घेता यायला हवे.’’ श्री गुरुदेवांची ही शिकवण दादांनी स्वत: आत्मसात् केली असल्याने कौटुंबिक, तसेच आश्रमस्तरावरील विविध सेवांचे दायित्व सांभाळतांना ते नेहमी स्थिर असतात.

भानुदादांनी ज्या प्रकारे मला सांभाळून आणि समजून घेतले, तेवढे मला बाह्य जगात कोणी समजून घेतले नसते. मला भानुदादांसारखे उत्तरदायी साधक लाभल्याबद्दल मी श्री गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

२. श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. सतत साहाय्याच्या भूमिकेत असणे : ‘भानुदादा करत असलेली सेवा आणि मी करत असलेली सेवा, यांचे स्वरूप वेगळे आहे. मी त्यांना माझ्या सेवांच्या अंतर्गत साहाय्यासाठी कधीही संपर्क केला, तरीही ते मला नेहमी सकारात्मक प्रतिसाद देतात. ‘त्यांच्याकडे साहाय्य मागितले आणि  त्यांनी केले नाही’, असे कधी झाले नाही.

२ आ. वागण्यात सहजता आणि बोलण्यात नम्रता असणे : त्यांच्या वागण्यात सहजता असते. त्यामुळे त्यांच्याशी आपोआप मोकळेपणाने बोलले जाते. त्यांच्या बोलण्यात नम्रता आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना चांगले वाटते.

२ इ. समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घेणे आणि आवश्यक तेवढेच बोलणे : भानुदादांशी बोलतांना नेहमी माझ्या लक्षात येते, ‘ते माझे बोलणे आधी संपूर्णपणे ऐकून घेतात आणि नंतर त्यांचे मत मांडतात. ते आवश्यक तेवढेच बोलतात.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १३.४.२०२५)