हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय, तो म्हणजे हिंदूंना जागृत करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे – परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना सत्संग लाभला. त्या भेटीतील निवडक सूत्रे पुढे दिली आहेत.  

१. हिंदु राष्ट्रात सर्व व्यक्ती सात्त्विक झाल्याने त्यांच्या मनात जातीयवादासारखे विचार येणार नाहीत ! 

श्री. प्रवीण दुबे, भाग्यनगर : हिंदु राष्ट्र निर्माण झाल्यानंतर ‘हिंदूंना जातीयवादाच्या सूत्रावर लढावे लागणार नाही’, असे कुणी सांगू शकते का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : सत्ययुगात, तसेच त्रेतायुगात आपापसांत कुणी लढत होते का ? सर्वजण साधना करून सात्त्विक झाले की, त्यांच्या मनात आपापसांत लढण्याचा विचारसुद्धा येणार नाही.

श्री. प्रवीण दुबे : असा विचार केल्यास सर्वांनी सात्त्विक व्हायला पाहिजे; पण हे खरोखरंच शक्य आहे का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : असेच आहे. सर्वजण सात्त्विक झाले, तरच हिंदु राष्ट्र येईल ! सात्त्विक राज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्र ! आता सर्वत्र रज-तमप्रधान लोक असल्यानेच सध्याचे हे कलियुग चालू आहे !

२. देशात गोहत्या होऊ नयेत; म्हणून हिंदूंनी स्वतः साधना करून हिंदु राष्ट्र स्थापनेत योगदान द्यायला हवे ! 

श्री. राघवेंद्र, बेंगळुरू : ‘भारत देशात गोहत्या होऊ नयेत’, यासाठी काय करावे लागेल ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यानंतरच सर्वकाही ठीक होईल ! समजा, मला खोकला हा आजार झाला आणि या खोकल्याचे मूळ कारण क्षयरोग (टी.बी.) आहे, तर क्षयरोगाची औषधेच घ्यायला हवीत. त्यानंतर थकवा, खोकला आणि क्षयरोगाची सर्व लक्षणे दूर होऊन जातील. एक साध्य केल्यावर सर्वकाही साध्य होते. ते एक म्हणजे काय ? तर उपासना, साधना किंवा भक्ती करणे होय.

३. साधना करणार्‍यांकडूनच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असून भगवंताचे कार्य केल्याने भगवंत स्वतःहूनच सर्वकाही देतो ! 

डॉ. राजीव श्रीवास्तव, प्रयागराज : मला भगवंताने ‘आचार्य मोतीलाल नेहरू राष्ट्रीय औद्यौगिक संस्था, प्रयागराज’, येथे शिक्षकाचे कार्य नेमून दिले आहे. तेथे मी मुलांना श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकांसह आध्यात्मिक लेखांविषयी शिकवतो. मला हिंदु शाळांमध्ये जनजागृती करायची आहे. त्यासाठी मी आपला आशीर्वाद घेऊ इच्छितो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. हे चांगले आहे; परंतु अन्य संघटना काय करत आहेत ?

डॉ. राजीव श्रीवास्तव : त्या साधनामार्गावर वाटचाल करू शकत नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : जे साधना करणारे आहेत, त्यांच्याद्वारेच हे कार्य होणार आहे.

डॉ. राजीव श्रीवास्तव : आमच्या येथील मुलांमध्ये सनातन संस्कृतीची मूल्ये सांगून त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी मी आपला आशीर्वाद घेऊ इच्छितो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण तळमळीने प्रयत्न केले, तर असा आशीर्वादही मागावा लागत नाही; कारण भगवंत स्वतःच आशीर्वाद देतो. तुमच्या मनाची ही वृत्ती चांगली आहे. नाहीतर कार्य केल्याचा अहं होतो. ‘आम्ही हे केले’, ‘मी केले’, असे वाटू लागते. ‘गुरूंच्या आशीर्वादामुळे सर्व झाले’, हा विचार पुष्कळ चांगला आहे.