कोतवडे (रत्नागिरी) येथे श्री महालक्ष्मीमातेच्या जयघोषात संतांच्या शुभहस्ते श्री महालक्ष्मी मंदिराचे भावपूर्णरित्या झाले कलशारोहण !  

मार्गदर्शन करतांना पू. स्वामी श्री दंडी महाराज

कोतवडे, ९ मे (वार्ता.) – ‘श्री महालक्ष्मीमातेचा विजय असो’ या समस्त कोतवडेवासियांच्या भावपूर्ण आणि उत्साहपूर्वक जयघोषात ९ मे या दिवशी पुणे येथील परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री नृसिंह आश्रमाचे पू. स्वामी श्री दंडी महाराज यांच्या शुभहस्ते ग्रामदेवी श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराचे कलशारोहण झाले.

कलशारोहण करतांना पू. स्वामी श्री दंडी महाराज

सकाळी ७ वाजता मंदिराच्या वास्तूशांती विधीला प्रारंभ झाला. गुरव कुटुंबियांनी देवीला भावपूर्ण सजवले. त्यानंतर देवीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर देवीची आज्ञा घेऊन नूतन कलशासह समस्त ग्रामस्थांनी मंदिराला ५ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर ‘क्रेन’द्वारे पू. स्वामी श्री दंडी महाराज यांनी मंदिराच्या शिखरावर जाऊन कलशारोहण केले.

कलशारोहणानंतर देवीची आरती करतांना ग्रामस्थ

कलशारोहण झाल्यानंतर पू. स्वामी श्री दंडी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये समस्थ ग्रामस्थांनी देवीची प्रार्थना आणि आरती केली. त्यानंतर महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी ‘पब्लिक देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. अरुण पेडणेकर यांसह सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्या वतीने पू. स्वामी श्री दंडी महाराज यांचा सन्मान करण्यात आला. सर्व ग्रामस्थांना महाराजांनी आशीर्वाद दिला. या वेळी सर्व विश्वस्त, तसेच मंदिराच्या कार्यात योगदान देणारे भाविक यांचा पू. स्वामी श्री दंडी महाराज यांनी स्वत:हून गौरव केला.

कलशारोहण

‘श्री महालक्ष्मीदेवीचा कृपाशीर्वाद समस्त ग्रामस्थांवर अखंड राहू दे’, अशी पू. स्वामी श्री दंडी महाराज यांनी देवीला प्रार्थना केली, तसेच ‘देवीच्या धार्मिक कार्यात अशाच प्रकारे एकजुटीने सहभागी व्हावे’, असे ग्रामस्थांना आवाहन केले. मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या कार्यात सढळ हस्ते धर्मदान करणार्‍यांचा विश्वस्तांनी सत्कार केला. मंदिराची निर्मिती करणारे स्थापत्य अभियंता श्री. शैलेंद्र शिवलकर हे कलशारोहण समारंभासह जीर्णाेद्धार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून ग्रामस्थांच्या आनंदामध्ये सहभागी झाले.

संतांचे मार्गदर्शक ऐकतांना ग्रामस्थ

सनातन धर्माच्या स्थापनेसाठी नियमित एक माळ तरी देवीचा नामजप करा ! – पू. स्वामी श्री दंडी महाराज, श्री नृसिंह आश्रम

अखंड भारताची निर्मिती व्हावी, यासाठी अनेक तपस्वी तपश्चर्या करत आहेत. सर्व ग्रामस्थांनी श्री महालक्ष्मीदेवी आणि कुलदेवता यांची उपासना नियमित करावी. आपण केलेली उपासना तपस्वींपर्यंत पोचते. तपस्वीचे तप आणि आपली साधना यांमुळे या धर्मकार्याला बळ प्राप्त होईल अन् लवकरच हा देश अखंड भारत होईल. अखंड भारताच्या निर्मितीसाठी, राष्ट्रासाठी प्रत्येक ग्रामस्थाने नियमित एक माळ तरी देवीचा नामजप करा, अशी मी आपणाकडे भिक्षा मागतो. भाविकांनी देवीची नियमित उपासना केल्यास तिचे दैवत्व प्रकट होईल. सनातन धर्माच्या अभिवृद्धीसाठी ग्रामस्थांनी नियमित देवीची उपासना करावी. देवी प्रसन्न होईल, असे समस्त ग्रामस्थांनी आचरण करावे.

कलश आणि धर्मध्वज यांचे वैशिष्ट्य !

कलशारोहण पहातांना ग्रामस्थ

या वेळी गाभार्‍यावर स्थापन करण्यात आलेल्या कलशाचे वजन ५८ किलो, तर सभागृहावरील कलशाचे वजन ३५ किलो आहे. या वेळी मंदिरावर धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. धर्मध्वजावर मारुतीसह, ॐ आणि स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरण्यात आली आहेत. हे दोन्ही कलश आणि धर्मध्वज ओतीव पितळेचे आहेत.

कलशाची मंदिराभोवती सवाद्य मिरवणूक काढतांना ग्रामस्थ

पू. स्वामी श्री दंडी महाराज यांनी ‘कलशाद्वारे ब्रह्माडातील दैवी शक्ती खेचली जाते आणि त्याचा लाभ मंदिरात येणार्‍या भाविकांना होतो’, असे कलशाचे महत्त्व मार्गदर्शनामध्ये सांगितले.