जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना मळेवाडचे उपसरपंच घागर आणि नळ यांची माळ भेट देणार !

  •  मळेवाड-कोंडुरे गावात पाणीटंचाई 

  • प्रशासकीय अधिकार्‍यांची उदासीनता परिस्थितीला कारणीभूत असल्याचा उपसरपंचांचा आरोप 

सावंतवाडी – तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे गावात ‘जलजीवन योजने’च्या अंतर्गत संमत असलेली कामे सद्यस्थितीत अपूर्ण असून काही ठिकाणी ती बंद पडली आहेत. त्यामुळे गावात पाणीटंचाई उद्भवत आहे. त्यामुळे उपसरपंच हेमंत मराठे हे आंदोलनात्मक कृती म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना घागर आणि नळ यांची माळ भेट देणार आहेत.

‘लाखो रुपये खर्च करून चालू करण्यात आलेली ‘जलजीवन योजना’ ठप्प पडली आहे. याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबडूलकर यांना लेखी निवेदनाद्वारे पाणीटंचाईविषयी कल्पना देऊनही अद्यापपर्यंत काम चालू करण्यात आलेले नाही. ‘हर घर जल, हर घर नल’ असे ब्रीदवाक्य असलेल्या ‘जलजीवन योजने’ची मळेवाड गावातील स्थिती पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून चालू झालेल्या या योजनेसंदर्भात प्रशासनातील अधिकारी कसे उदासीन आहेत ? हे दिसून येत आहे. गावात मुबलक पाणी असतांना त्यासाठी उपसा यंत्रणा आणि ‘जलवाहिनी’ यांची कामे अपूर्ण असल्याने अन् ठेकेदार आणि अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे गावात पाणीटंचाई उद्भवत आहे. त्यामुळे १५ मे या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना घागर आणि नळ यांची माळ भेट देण्यात येणार आहे, तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सहकार्‍यांसमवेत एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे’, अशी माहिती मळेवाड-कोंडुरेचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली.

संपादकीय भूमिका

या प्रकरणी सरकारने लक्ष घालून संबंधितांना कठोर शिक्षा केली पाहिजे !