भक्तांच्या हाकेसरशी धावणारी कोतवडे (रत्नागिरी) येथील स्वयंभू श्री महालक्ष्मीदेवी !

डोंगरांच्या कुशीत, नद्यांच्या काठी वसलेले, वृक्षांनी बहरलेले ‘कोतवडे’ हे कोकणातील निसर्गरम्य गाव आहे. निसर्गाच्या सौदर्यांसह कोतवडे गावाला संतपरंपराही लाभली आहे. विविध समाजातील लोक गावात गुण्यागोविंदाने, आपुलकीने, प्रेमाने रहातात. गावाच्या या कौटुंबिक जिव्हाळ्याचा आणि ऐक्याचा आत्मा आहे ते म्हणजे कोतवडे गावचे प्राचीन श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर. श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणाशी गरीब-श्रीमंत, समाज, प्रतिष्ठा, शिक्षण आदी सर्व भेद विरून जातात. ८ ते १० मे या कालावधीत होत असलेला मंदिराचा जीर्णाेद्धार सोहळा हा जणू संपूर्ण गावाचा कौटुंबिक सोहळाच आहे. केवळ ‘कोतवडे पब्लिक देवस्थान ट्रस्ट’च नव्हे, तर प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ या आनंद सोहळ्यात आत्मियतेने सहभागी झाले आहेत. आपापल्या परिने सेवेत योगदान देत आहेत. या आनंदमय सोहळ्यानिमित्त श्री महालक्ष्मीदेवीच्या या स्वयंभू देवस्थानाविषयी माहिती घेऊया !

संकलक : श्री. प्रीतम नाचणकर आणि आणि श्री. गिरिधर वझे

कोतवडे (रत्नागिरी) येथील स्वयंभू श्री महालक्ष्मीदेवी

१. आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले गाव !

शिर्डी येथील श्री साईबाबा आणि शेगाव येथील श्री गजानन महाराज या थोर विभूतींचे चरित्र लिहिणारे प्रसिद्ध संतकवी दासगणू महाराज, पुणे येथील प्रसिद्ध सद्गुरु दिगंबरदास महाराज यांचे सद्गुरु श्री काका महाराज सहस्रबुद्धे, स्वयंभू श्री कुसुमेश्वर मंदिरासमोर पूर्वी जिवंत समाधी घेतलेले शिवभक्त श्री तात्यास्वामी या सहस्रबुद्धे घराण्यातील ३ संतांचे कोतवडे हे मूळ गाव आहे, तसेच कोतवडे येथील हरिभटजी पटवर्धन या गणेशभक्ताने गणपतीपुळे येथे एका पायावर उभे राहून श्री गणेशाची आराधना केली. गणपतीपुळे येथे त्यांची समाधी आजही आहे. अशा प्रकारे आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले कोतवडे हे कोकणातील निसर्गरम्य गाव आहे. वरील संतांचे चरित्र सांगतांना या गावातील स्वयंभू श्री महालक्ष्मी मंदिराचा उल्लेख आवर्जून केला जातो. येथील स्वयंभू श्री महालक्ष्मीदेवी सहस्रबुद्धे आणि फडके घराण्यांची कुलदेवता आहे.

जिर्णाेद्धार करण्यात आलेले नूतन मंदिर

२. आख्यायिका

स्वयंभू श्री महालक्ष्मी मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी गायरान (गाई-गुरे चरत असलेले ठिकाण) होते. एक गाय काही झाडे आणि वेली यांच्या झुडपातील (जाळीतील), म्हणजे आताच्या गाभार्‍यातील स्वयंभू श्री महालक्ष्मीदेवीचे स्थान असलेल्या पिंडीच्या स्वरूपातील पाषाणावर प्रतिदिन स्वतःहून दुधाचा अभिषेक करत असे. ही गाय सहस्रबुद्धे यांना गोठ्यामध्ये दूध देत नसे. ही गाय कुसुम नदीच्या तीरावरील एका पाषाणावर स्वतःहून दुधाच्या धारा सोडत असल्याचे गुराख्याने पाहिले. नंतर गुराख्याने कुर्‍हाडीच्या साहाय्याने त्या झुडपातील लहान झाडे आणि वेली असलेला भाग तोडतांना कुर्‍हाडीचा घाव देवीचे स्वयंभू स्थान असलेल्या पाषाणावर बसला. तत्क्षणी त्या पाषाणातून रक्त वाहिले. तेव्हा गुराख्याने या स्थानी क्षमायाचना केली. नंतर सहस्रबुद्धे यांना श्री महालक्ष्मीदेवीने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले, ‘तुमची गाय दुधाचा अभिषेक करत असलेल्या पाषाणाच्या ठिकाणी मी स्वयंभू स्वरूपात वास करते. त्या ठिकाणी एका रात्रीमध्ये माझे मंदिर बांधा.’ तेव्हा या स्वप्नदृष्टांतानंतर सहस्रबुद्धे कुटुंबियांसह गावातील सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी एका रात्रीमध्ये श्री महालक्ष्मीदेवीचा (पूर्वीच्या मंदिरातील) गाभारा बांधला. तेव्हा या गाभार्‍यामध्ये स्वयंभू श्री महालक्ष्मीदेवीचे पूजन करण्यासाठी एका पुजार्‍यापुरतीच जागा होती. नंतर या स्थानाच्या पुढे श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर कालांतराने सभामंडपादी मंदिर बांधण्यात आले.

३. ग्रामस्थांचे श्री महालक्ष्मीमातेशी असलेले श्रद्धेचे नाते !

अनेक ग्रामस्थ नियमितपणे देवीच्या दर्शनासाठी येतात. स्वत:ची सुख-दु:खे देवीला सांगतात. गावामध्ये कुणाकडेही घरभरणी, बारसे, विवाह आदी शुभकार्य असले, तरी त्याचे पहिले निमंत्रण देण्यासाठी ग्रामस्थ आवर्जून श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात येतात. देवीचा आशीर्वाद घेऊनच गावातील शुभकार्याला प्रारंभ होतो. गावामध्ये विवाह झाल्यानंतर गावात वरात आल्यावर सर्वप्रथम श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाते. नववधू प्रथम ओटी भरण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात येते. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरा आजही श्रद्धेने सर्व ग्रामस्थ तंतोतंत पाळतात. शाळेत जाणारे विद्यार्थी, शहरात नोकरीला जाणारे ग्रामस्थ देवीला श्रद्धेने वंदन करून मार्गस्थ होतात. परीक्षेत उतीर्ण होणारे विद्यार्थी असोत, नवीन नोकरी मिळालेले युवक असोत. आनंदाच्या क्षणी देवीपुढे पुढे पेढे ठेवायला विसरत नाहीत. ही सर्व देवीवर असलेली ग्रामस्थांच्या अतूट श्रद्धेची उदाहरणे आहेत.

श्री महालक्ष्मीमाता समस्त ग्रामस्थांचे श्रद्धास्थान ! – अरुण पेडणेकर, अध्यक्ष, पब्लिक देवस्थान ट्रस्ट्र, कोतवडे

श्री. अरुण पेडणेकर

१. श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार !

पूर्वी कृष्णाजी सहस्रबुद्धे कुटुंबियांनी श्री महालक्ष्मी मंदिरासाठी जागा दिली होती. मंदिराच्या गाभार्‍यात देवीचे पूजन करण्यासाठी पुरेशी जागा असावी, तसेच मंदिरामध्ये सभामंडप आदी चांगल्या सुविधा असाव्यात, या उद्देशाने गावातील सर्व ग्रामस्थ श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यासाठी एकत्र आले आणि मार्च २०२५ मध्ये ‘पब्लिक देवस्थान ट्रस्ट’ या न्यासाद्वारे आत्ताच्या नवीन मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.

२. मंदिरामध्ये होणारे उत्सव !

२ अ. हरिनामसप्ताह

श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून ७ दिवस-रात्री प्रतिदिन २४ घंटे गावातील बारा वाड्यांतील ग्रामस्थ आळीपाळीने प्रत्येकी २ घंटे देवीसमोर उभे राहून भजन करतात. सप्ताहाला आरंभ झाल्यावर देवीचे पूजन करून उचलण्यात आलेली वीणा (तंबोरा) ७ दिवस पूर्ण झाल्यानंतरच देवीच्या समोर ठेवली जाते.

२ आ. नवरात्रोत्सव

या देवालयात प्रतिवर्षी आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करतात आणि पुढे दसर्‍यापर्यंत एकूण १० दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात प्रतिदिन देवीचे षोडशोपचारांनी पूजन करून दुपारी महाप्रसादाचा नैवेद्य दाखवतात. नंतर कोतवडे गावातील १२ वाड्यांमधील ग्रामस्थ प्रतिदिन देवीच्या समोर भक्तीभावाने भजन करतात. रात्री ‘श्री कुसुमेश्वर आणि महालक्ष्मी ब्रह्मवृंद उत्सव मंडळा’च्या वतीने देवीची आरती, देवतांचे अभंग म्हणत मंदिराभोवती ५ प्रदक्षिणा घालणे, भोवत्या, आरत्या, मंत्रपुष्पांजली, कीर्तन केली जाते.

२ इ. शिमगोत्सव

फाल्गुन मासामध्ये पौर्णिमेच्या रात्री पारंपरिक पद्धतीने सामूहिक होलिकोत्सव साजरा करण्यात येतो. होळी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी धूलिवंदनानंतर श्री महालक्ष्मीदेवीसह सर्व ग्रामदेवतांची पालखी १२ वाड्यांतील प्रत्येक ग्रामस्थाच्या घरी भक्तीभावाने नेली जाते. तेव्हा सर्व जण ‘ग्रामदेवता घरी आल्या आहेत’, या भावाने पूजन करतात. या काळात ग्रामस्थ शुचिर्भूत होऊनच पालखी नाचवतात.

भविष्यातील संकल्पना !

श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना माफक दरामध्ये भक्तनिवास असायला हवा. यासह मंदिराच्या उपलब्ध जागेत ‘व्यावसायिक गाळे’ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यांमुळे भविष्यात देवस्थानाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. मंदिराच्या बाजूला असलेल्या नदीच्या संरक्षक भिंतींचे कामही करायचे आहे. मंदिराच्या जीर्णाेद्धाराचे काम देवीची कृपा, भाविकांच्या सदिच्छा आणि समस्थ ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण झाले, त्याप्रमाणे भविष्यातील या संकल्पनाही देवीच्याच कृपाआशीर्वादाने पूर्णत्वास जातील, यात शंका नाही.

– श्री. अरुण पेडणेकर, कोतवडे

३. पालखीमध्ये देवीचे अस्तित्व अनुभवता येणे !

अन्य वेळी कोतवडे येथील मंदिरातून ढोकमळेवाडीतील केळकर यांच्या घरी जाण्यासाठी २ डोंगर पार करायला चालत ४५ मिनिटे लागतात; परंतु ग्रामदेवतेची पालखी घेऊन ग्रामस्थ चालत २० मिनिटांमध्ये केळकर यांच्या घरी पोचतात. या संदर्भात ‘ग्रामदेवतांची पालखी कोतवडे येथील मंदिरातून ढोकमळे येथे केळकर कुटुंबियांच्या घरी नेतांना आपोआप हलकी होते’, अशी अनुभूती श्रद्धावान ग्रामस्थांना येते. यासंदर्भात वयोवृद्ध ग्रामस्थांकडून कळले की, ढोकमळे गावातील केळकर कुटुंबाच्या वंशातील एक भक्त पूर्वी श्री महालक्ष्मीदेवीचे भक्तीभावाने दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीमुळे पूर्वीपासून ग्रामदेवतांची पालखी ढोकमळे येथे नेतांना हलकी होते.

कृतज्ञता आणि प्रार्थना !

‘हे जगज्जननी श्री महालक्ष्मीदेवी, तुझ्याच कृपेने तुझ्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. तुझी कृपादृष्टी सर्व भक्तजनांवर सदैव असू दे. आम्हाला तुझे अखंड स्मरण राहू दे. आमच्याकडून तुला अपेक्षित असे कार्य गुण्यागोविंदाने होऊ दे’, हीच तुझ्या प्रार्थना आहे.’

नूतन मंदिराची वैशिष्ट्ये !

श्री. शैलेंद्र शिवलकर

नवीन बांधण्यात आलेले श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर हे नागर शैलीतील आहे. उत्तर भारतीय मंदिरांच्या वास्तूकलेची ही एक प्रमुख शैली आहे. या शैलीत शिखर हे मंदिराचा सर्वांत महत्त्वाचा भाग मानला जातो. श्री महालक्ष्मीदेवीचे संपूर्ण मंदिर हे जांभ्या दगडाने बांधण्यात आले आहे. मंदिरावर छोटा आणि गर्भगृहावरील मोठा असे २ कलश आहेत. मंदिर जांभ्या दगडाचे असले, तरी खिडक्या, दरवाजे सागवानी लाकडाच्या सुबक कलाकुसरीने कोरीव काम करून बनवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर आकर्षक कमान आहे. मंदिराच्या परिसरात दीपमाळ आहे.

नागर शैलीची वैशिष्ट्ये !

या शैलीतील मंदिरे उंच आणि आकर्षक शिखरांनी ओळखली जातात. नागर शैलीतील मंदिरांचे बांधकाम पायापासून ते शिखरापर्यंत चौकोनी असते. गर्भगृह मंदिराच्या मध्यभागी असते. या शैलीतील मंदिरांमध्ये अनेकदा आकर्षक आणि तपशीलवार कोरीव काम आढळते. हिमालयापासून ते विंध्य पर्वतरांगांपर्यंत नागर शैलीचे मंदिरे पहायला मिळतात. खजुराहो मंदिरे नागर शैलीतील उत्कृष्ट उदाहरणे आहेत. मध्य प्रदेशात अशी मंदिरे पहायला मिळतात.

– मंदिराची निर्मिती करणारे स्थापत्य अभियंता श्री. शैलेंद्र शिवलकर