दारिद्र्य हे जिवंत मरणच !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्न : मृतः कथं स्यात् पुरुषः ?

अर्थ : पुरुष मेलेला (मेल्यासारखाच) आहे, असे केव्हा समजावे ?

उत्तर : मृतो दरिद्रः पुरुषः ।

अर्थ : दरिद्री पुरुष (जणू) मेलेला आहे, असे समजावे.

दारिद्र्य हे मरणापेक्षाही भयंकर !

दरिद्री असणे आणि दारिद्र्य स्वीकारणे निराळे. काही उदात्त ध्येयाच्या प्राप्तीसाठी वेडा होऊन आपले सर्वस्व त्यासाठी पणाला लावणारा महापुरुष दारिद्र्य स्वीकारण्याचा प्रसंग आला, तर मोठ्या आनंदाने स्वीकारतो, असे उघड्या डोळ्याने स्वीकारलेले दारिद्र्य हे भूषण आहे. एरव्ही दारिद्र्य हे मरणापेक्षाही भयंकर मानले पाहिजे. मरण बरे; पण दारिद्र्य नको. मरणाचे दुःख मोठे खरे; पण ते क्षणिक असते. दारिद्र्याचे दुःख सतत भोगावे लागते. ते अंत नसणारे आणि न संपणारे दुःख आहे. दारिद्र्य भोगावे लागणे, हे माणसाची दुर्बलता, आळस, निर्बुद्धपणा आणि अकार्यक्षमता इत्यादींचे लक्षण आहे. क्वचित् तो शोषण करणार्‍या व्यवस्थेचाही परिणाम असतो. असे दारिद्र्य अत्यंत निंद्य आहे. आपल्या परंपरेत दारिद्र्याला कधीही चांगले म्हटलेले नाही, तसे भूषणही मानलेले नाही.

हिंदु संस्कृतीने दारिद्र्याऐवजी त्यागाचा गौरव केलेला असणे

कुबेराला संपत्तीचा राजा करण्याचे सामर्थ्य असलेल्या भगवान शंकरांचे दारिद्र्य त्यांना शोभणारे, आदरणीय आणि वंदनीय ठरते; पण ‘पदपथावर फाटक्या-तुटक्या कपड्यात, एखाद्या फुटक्या भांड्यानिशी दीन अवस्थेत रहाणार्‍या भिकार्‍याचेही कौतुक करावे’, हे योग्य ठरत नाही. वरवरचा सारखेपणा महत्त्वाचा नाही, तर त्या मागचा हेतू लक्षात घेतला पाहिजे. ‘दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ।।’, म्हणजे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘दोन व्यक्तींची शारीरिक अवस्था एकच असली, तरी त्यांच्या मानसिकतेतील भेद जाणकारालाच कळेल.’

हिंदु संस्कृतीने त्यागाचा गौरव केला आहे, दारिद्र्याचा नाही. त्यागासाठी जवळ काही असावे लागते. पुष्कळ मिळवण्याची पात्रता असावी लागते. नाही तर दारिद्र्य जिवंत मरणच आहे, हे लक्षात घेतलेच पाहिजे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)