सुट्टीत ‘मराठी’ वाचा !

सध्या शालेय विद्यार्थ्यांचा उन्हाळ्यातील सुट्टीचा कालावधी चालू आहे. या सुट्टीच्या कालावधीत अनेक जणांचे निरनिराळे आवडते छंद जोपासणे, तसेच नवनवीन शिकण्याच्या दृष्टीने नियोजन केलेले असते. पालक आणि विद्यार्थी यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘आम्ही मराठी वाचणार’, असा उपक्रम करायला हवा. वर्षभर शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषेचा एक ‘समृद्ध भाषा’ या दृष्टीकोनातून अभ्यास करणे शक्य होत नाही. या विश्रांतीच्या काळात विद्यार्थी मराठीची समृद्धता, परिपूर्णता, मधुरता आणि वैभवसंपन्नता जाणून घेऊ शकतात. शब्दांच्या विविध छटा असलेल्या मराठी भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. र्‍हस्व आणि दीर्घ योग्य प्रकारे न लिहिल्यास शब्दांच्या अर्थात पालट होऊन प्रसंगी विनोदनिर्मिती होऊ शकते. चिन्हांचे (एकेरी अवतरणचिन्ह, स्वल्पविराम यांचे) स्थान पालटल्यामुळे वाक्याच्या अर्थात पालट होऊ शकतो. अक्षरांवर अनुस्वार दिल्यामुळे दोन अर्थ निर्माण होऊ शकतात, वाक्यरचना आणि व्याकरण न पालटता दोन अर्थ सांगणारी अनेक वाक्ये मराठीत आहेत. अर्थाने परिपूर्ण नटलेले शब्द असणारी सौंदर्यवती अशी ही एकमेव भाषा आहे. मराठी भाषेची समृद्धी, मराठी भाषेतील शब्दांचे वैविध्य, विपुल शब्दसंपदा एकमेवाद्वितीय आहे. मराठी बोलीभाषा, अभ्यासाची भाषा, ज्ञान भाषा सर्व माध्यमांतून विद्यार्थ्यांना, पाल्यांना जवळची वाटावी, यादृष्टीने पालकांनी विद्यार्थ्यांना मराठीच्या भाषासौंदर्याविषयी जाणून घेण्यासाठी उद्युक्त् करणे आवश्यक आहे.

साहित्य म्हणजे वाङ्मय हा मानवी संस्कृतीचा, सर्वांगीण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अन्न, वस्त्र या मूलभूत आवश्यकतांप्रमाणेच मनाचीही एक आवश्यकता असते, ती साहित्याच्या वाचनातून भागते. तिला केवळ मनोरंजन म्हणणे योग्य नाही, तर माहिती आणि ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा म्हणूया. साहित्याने मनाच्या कक्षा रुंदावतात, मनाचा विकास होतो. मन व्यापक होते. पुस्तके, वर्तमानपत्र वाचल्याने मराठी शब्दभांडारात, माहितीत भर पडून मराठी विषयाची शाळेत वाटणारी भीती न्यून होण्यास साहाय्य होऊ शकते. त्याचसमवेत भ्रमणभाषसमवेत व्यतीत होणारा कालावधी साहित्य वाचनास दिल्यास, सर्वांगीण वाढ होण्यास साहाय्य होईल. सध्या मराठी भाषेची अवस्था दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. मराठीमध्ये अन्य भाषिक शब्दांचा भरणा असतो. परस्परसंवादासाठीही इंग्रजी वापरली जाते. हे मानसिक पारतंत्र्याचे लक्षण आहे. भाषाभिमानाचा संबंध थेट राष्ट्राभिमानाशी आहे. त्यामुळे पालकांनीही पाल्यांच्या भाषावृद्धीसाठी परिश्रम घेतले पाहिजेत !

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.