तसे घडायला नको असेल तर… !

आमच्या हिंदु समाजाचे डोळे अजून उघडले नाहीत का ? जयचंद राठोडने आणि सूर्याजी पिसाळने आमच्या राष्ट्राचा घात केला. अनेक राजपुतांच्या प्रतापी पराक्रमाने देहलीच्या जुलमी मोगली सिंहासनाला बळकटी आणली आणि काही मराठे सरदारांच्याच आत्मघातकी वैरवृत्तीने इंग्रजी राज्यकर्त्यांचे आसन येथे स्थिर केले. हा सारा इतिहास अजूनही आम्हाला काही शिकवू शकत नाही का ? स्पृश्यास्पृश्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर एवढेच नव्हे, तर देशस्थ-कोकणस्थ आणि ऋग्वेदी-यजुर्वेदी यांच्यातही कलह माजवल्यामुळे आमच्या राष्ट्राचे वाटोळे झाले, हे अद्यापही आम्हाला उमगू शकत नाही ? आमची बुद्धी, शक्ती परस्परांत भांडण्यासाठी खर्च होत असून त्यामुळे पारतंत्र्याचा पाश आमच्या मानेभोवती अधिकाधिक करकचून आवळला जात आहे, याची जाणीव दशकावधी वर्षांच्या अनुभवानंतरही आमच्या मनाला शिवली नाही का ? आणि इतक्यावरही जर शहाणपणा शिकायला आम्ही सिद्ध नसू, तर मग ‘तुम्ही स्वराज्य चालवण्यास नालायक आहात’, असे कुणी म्हटल्यास त्यात वावगे ते काय ? ही घातकी वृत्ती आपण जोवर सोडली नाही आणि ‘हिंदु तेवढा एक’ या विशुद्ध भूमिकेवर जोवर आपण उभे रहात नाही, तोवर ‘माझ्या प्रिय हिंदुस्थाना, तुला मानहानी आणि सत्त्वहीन बनून जगाच्या बाजारात कवडीमोलानेच पडून रहावे लागेल.’

(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने,’ संचालक : अमरेंद्र गाडगीळ)