‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या खोलीत डिसेंबर २०२४ पासून उष्णता जाणवत होती. जानेवारी २०२५ मध्ये ही उष्णता पुष्कळ वाढली. याविषयी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सहकारी यांनी याविषयी संशोधन केले. या संशोधनातील गुरुदेवांच्या खोलीतील उष्णतेच्या संदर्भात सूक्ष्मातील ज्ञानातून लक्षात आलेली कारणमीमांसेची १ विचारसरणी ८ मे या दिवशी पाहिली. आज या लेखमालिकेतील उर्वरित भाग येथे दिला आहे.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/911341.html

८. गुरुदेवांच्या खोलीतील उष्णतेच्या संदर्भात सूक्ष्मातील ज्ञानातून लक्षात आलेली कारणमीमांसा

८ अ. ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील मोठ्या वाईट शक्तींशी चाललेले सूक्ष्मातील युद्ध
८ अ २. दुसरी विचारसरणी
८ अ २ अ. वर्ष २००२ ते वर्ष २०२४ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले (गुरुदेव) यांचा पातळ क्रमांक १ ते ६ येथील वाईट शक्तींशी सूक्ष्म लढा चालू असणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे (गुरुदेवांचे) अवतारी कार्य असून त्यांच्यामुळे ‘पृथ्वीवर साधना करणारे जीव आणि सनातन धर्म’, यांचे रक्षण होते. वर्ष २००२ पासून पाताळांतील वाईट शक्तींनी परात्पर गुरु डॉक्टर आणि सनातन संस्थेचे कार्य यांना सूक्ष्मातून विरोध करण्यास आरंभ केला. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना कुठलेही शारीरिक त्रास नसतांना ‘थकवा येणे, ग्लानी येणे आणि प्राणशक्ती न्यून होणे’, असे विविध त्रास होण्यास प्रारंभ झाला.
आरंभी पाताळ क्रमांक १ आणि २ येथील वाईट शक्तींनी परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून विरोध केला. त्या वाईट शक्ती निष्प्रभ होऊ लागल्यावर त्यांना पाताळ क्रमांक ३, ४, ५ आणि ६ येथील वाईट शक्ती टप्प्याटप्प्याने साहाय्य करू लागल्या.
८ अ २ आ. ऑक्टोबर २०२४ पासून परात्पर गुरु डॉक्टरांचा ७ व्या पाताळातील वाईट शक्तींशी सूक्ष्म लढा चालू होणे : पाताळ क्रमांक १ ते ६ येथील वाईट शक्तींची शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांना हरवण्यासाठी न्यून पडू लागली. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पासून ७ व्या पाताळातील वाईट शक्तींनी परात्पर गुरु डॉक्टरांशी चालू असलेल्या सूक्ष्म लढ्यात सहभाग घेतला.

८ अ २ इ. ७ व्या पाताळातील वाईट शक्तींनी सूक्ष्मातील हाडांच्या माध्यमातून विषारी वायूची निर्मिती करणे : ७ व्या पाताळात असंख्य हाडे आहेत. ही हाडे तेथील मोठ्या वाईट शक्तींनी मंत्र आणि तंत्र यांद्वारे विविध आसुरी कार्यांसाठी सिद्ध केली आहेत. वाईट शक्ती संकल्पाद्वारे सूक्ष्मातील हाडांद्वारे विषारी वायूची निर्मिती करतात. या विषारी वायूद्वारे परात्पर गुरु डॉक्टर आणि त्यांची खोली यांवर सातत्याने सूक्ष्मातून आक्रमण होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना ‘विस्मरण होणे, ग्लानी येणे, घशाला अकस्मात् कोरड पडणे आणि अधिक वेळ झोप येणे’, असे त्रास होतात.
८ अ २ ई. सूक्ष्म युद्धाचा परिणाम म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील लादी आणि भिंती यांवर उष्णता जाणवणे : ‘७ व्या पाताळातून परात्पर गुरु डॉक्टरांवर सातत्याने प्रक्षेपित होत असलेला विषारी वायू आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहातून सातत्याने प्रक्षेपित होत असलेले चैतन्य’, यांमध्ये सूक्ष्मातून तीव्र युद्ध होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील लादी आणि भिंती यांवर तळहात धरल्यास उष्णता जाणवते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२५)
८ आ. अन्य कारण
८ आ १. तिसरी विचारसरणी
८ आ १ अ. गुरुदेवांच्या चैतन्यामुळे त्यांच्या खोलीतील लादी आणि भिंती यांत त्रासदायक शक्ती शोषण्याची क्षमता निर्माण होणे : ‘गुरुदेवांची आध्यात्मिक पातळी उच्च असून ते समष्टी संत आहेत. त्यामुळे ते वास्तव्य करत असलेल्या खोलीतील लादी आणि भिंती यांवरही त्यांच्या चैतन्याचा परिणाम झाला आहे. परिणामी खोलीतील लादी आणि भिंती यांत गुरुदेवांच्या स्थूलदेहावर मोठ्या वाईट शक्ती करत असलेल्या आक्रमणातील २० टक्के त्रासदायक शक्ती शोषून घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे. या कार्यामुळे अंदाजे वर्ष २०१९ मध्ये गुरुदेव निवास करत असलेल्या खोलीच्या भिंतींवर फुगवटेही निर्माण झाले होते; कारण त्या वेळी भिंतींनी मोठ्या वाईट शक्तींनी सोडलेला त्रासदायक शक्तीने युक्त वायू शोषून घेतला होता.
८ आ १ आ. डिसेंबर २०२४ पूर्वी आणि डिसेंबर २०२४ नंतर गुरुदेवांच्या स्थूलदेहावर मोठ्या वाईट शक्ती करत असलेल्या आक्रमणांचे प्रमाण (टक्के)
८ आ १ इ. गुरुदेवांच्या खोलीतील भिंती आणि लादी यांभोवती क्षमतेपेक्षा अधिक त्रासदायक शक्ती घनीभूत होत असल्याने तळहात जवळ नेल्यावर त्रासदायक शक्तीमुळे तळहाताला उष्णता जाणवणे : गुरुदेवांच्या खोलीतील भिंती आणि लादी यांची त्रासदायक शक्ती ग्रहण करण्याची क्षमता अधिकाधिक २० टक्के आहे. डिसेंबर २०२४ पासून मोठ्या वाईट शक्तींनी त्यांच्या आक्रमणांच्या तीव्रतेत वाढ केली आहे. या त्रासदायक शक्तीयुक्त आक्रमणांना खोलीतील भिंती आणि लादी अधिकाधिक शोषून घेण्याचा प्रयत्न करतात. भिंती आणि लादी यांना ५ टक्के त्रासदायक शक्ती शोषता येत नसेल, तर भिंत आणि लादी यांच्यातील आकर्षणशक्तीमुळे ती त्रासदायक शक्ती भिंत अन् लादी यांच्या भोवती घनीभूत होते. (ज्याप्रमाणे स्वच्छता करतांना व्हॅक्यूम क्लीनरला (टीप) पुष्कळ कचरा पूर्ण आत ओढून घेता आला नाही, तरी तो त्याला जवळ ओढून ठेवतो, अगदी त्याप्रमाणे सूक्ष्मातून ही प्रक्रिया घडते.) त्यामुळे खोलीतील लादी आणि भिंती यांपासून सुमारे ३ ते ४ फूट अंतरावर तळहात धरल्यास त्यांच्या भोवती घनीभूत झालेल्या त्रासदायक शक्तीमुळे तळहाताला उष्णता जाणवते.

टीप – व्हॅक्यूम क्लीनर : स्वच्छता करण्याचे यंत्र. यात एखाद्या ठिकाणची धूळ शोषून घेतली जाते.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०२५)
८ इ. खोलीतील लादी आणि भिंती यांच्या जवळ तळहात नेल्यास उष्णता थोड्या प्रमाणात वाढण्यामागील कारण
८ इ १. पहिली विचारसरणी
८ इ १ अ. गुरुदेवांनी त्यांचा तळहात खोलीतील लादी आणि भिंती यांच्या जवळ नेल्यास त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या मारक शक्तीमुळे तेथे अप्रगट स्वरूपात असणारी मारक शक्ती प्रगट होऊन कार्यरत होत असणे : ‘गुरुदेव आणि ते रहात असलेली खोली यांच्याभोवती दैवी मारक शक्तीचे अभेद्य संरक्षककवच निर्माण झाले आहे. गुरुदेवांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहातूनही मारक शक्ती वायूमंडलात प्रक्षेपित झाल्यामुळे त्यांनी त्यांचा तळहात खोलीतील लादी आणि भिंती यांच्या जवळ नेल्यास तेथे अप्रगट स्वरूपात असणारी मारक शक्ती प्रगट होऊन कार्यरत होते. त्यामुळे गुरुदेवांनी त्यांचा तळहात खोलीतील लादी आणि भिंती यांच्या जवळ नेल्यास उष्णता थोड्या प्रमाणात वाढते.’
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२५)
८ इ २. दुसरी विचारसरणी
८ इ २ अ. सूक्ष्म युद्धाचा प्रभाव परात्पर गुरु डॉक्टरांच्या (गुरुदेवांच्या) खोलीतील लादी आणि भिंती यांवर सर्वाधिक होत असणे : ‘७ व्या पाताळातून परात्पर गुरु डॉक्टरांवर (गुरुदेवांवर) सातत्याने प्रक्षेपित होत असलेला विषारी वायू आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहातून सातत्याने प्रक्षेपित होत असलेले चैतन्य’, यांमध्ये सूक्ष्मातून तीव्र युद्ध होते. या सूक्ष्म युद्धाचा प्रभाव परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील लादी आणि भिंती यांवर सर्वाधिक होतो. त्यामुळे त्यांच्या जवळ तळहात नेल्यास उष्णता काहीशी वाढलेली जाणवते. त्यानंतर खोलीतील चैतन्यामुळे सूक्ष्म युद्धाचा परिणाम खोलीतील लादी आणि भिंती यांच्यापासून काही अंतरावर न्यून होत जातो.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), (९.१.२०२५)
८ इ ३. तिसरी विचारसरणी
८ इ ३ अ. त्रासदायक शक्ती शोषून घेतलेल्या भिंती आणि लादी यांच्या जवळ तळहात नेल्यावर तळहातातून प्रक्षेपित होणार्या शक्तीमुळे भिंती अन् लादी यांत साठलेली त्रासदायक शक्ती काही प्रमाणात बाहेर पडू लागणे : ‘व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्याच्या तळहातातून चांगली किंवा वाईट शक्ती प्रक्षेपित होत असते. ज्याप्रमाणे गढूळ पाण्याने पूर्ण भरलेल्या पेल्यात चांगले पाणी घातले, तरी गढूळ पाणीच बाहेर पडते, त्याप्रमाणे त्रासदायक शक्ती शोषून घेतलेल्या भिंती आणि लादी यांच्या जवळ व्यक्तीने तिचा तळहात नेल्यावर तळहातातून प्रक्षेपित होणार्या शक्तीमुळे (चांगल्या किंवा वाईट दोन्ही प्रकारच्या) भिंती अन् लादी यांत साठलेली त्रासदायक शक्ती काही प्रमाणात बाहेर पडू लागते. या बाहेर पडणार्या त्रासदायक शक्तीमुळे भिंती आणि लादी यांच्या जेवढ्या जवळ तळहात नेऊ, तेवढी अधिक उष्णता जाणवण्याची अनुभूती येते.
८ इ ३ आ. मोठ्या वाईट शक्ती निर्गुण स्तराच्या त्रासदायक शक्तीचा वापर करत असल्याने निर्गुणाशी संबंधित स्पंदने अनुभवण्याची क्षमता असलेल्या तळहातावर उष्णता जाणवणे : इथे महत्त्वाचा भाग, म्हणजे मोठ्या वाईट शक्ती गुरुदेवांवर आक्रमण करण्यासाठी निर्गुण स्तरावरील त्रासदायक शक्तीचा वापर करत आहेत. हाताची बोटे पंचतत्त्वांशी संबंधित स्पंदने अधिक प्रमाणात ग्रहण करतात, तर तळहात निर्गुणाशी संबंधित स्पंदने अधिक प्रमाणात अनुभवतो. त्यामुळे गुरुदेवांच्या खोलीतील भिंती आणि लादी यांच्या जवळ हात नेल्यावर बोटांच्या तुलनेत तळहातावर अधिक प्रमाणात स्पंदने जाणवतात. यातून निर्गुण स्तरावर चालू असलेल्या देवासुर संग्रामाची, म्हणजे सूक्ष्म युद्धाची भयावहता लक्षात येते.’ (समाप्त)
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), फोंडा, गोवा. (६.१.२०२५)
|