‘मागील ९ वर्षांपासून जळगाव सेवाकेंद्रात सर्व साधकांना व्यवस्थित पुरेल, एवढी भाजी प्रत्येक आठवड्याला अर्पण मिळत आहे. अगदी कोरोना काळातही यामध्ये खंड पडला नाही. भाज्यांचे दर कितीही वाढलेले असू देत, भाज्यांची कितीही टंचाई किंवा अन्य काही अडचण असू दे, सेवाकेंद्रासाठी लागणारी भाजी मात्र नेहमीच अर्पण स्वरूपात मिळते. सेवाकेंद्राच्या जवळील भाजीमंडईत भाजी आणण्यासाठी गेल्यावर साधक त्यांना सनातन संस्थेचे कार्य थोडक्यात सांगतात आणि ‘आश्रमासाठी भाजी हवी आहे, तर अर्पण म्हणून थोडी भाजी देता का ?’, असे विचारतात. त्या वेळी ‘कितीही गरीब भाजीविक्रेता असला, तरी तो आनंदाने भाजी आणि फळे अर्पण स्वरूपात देतो. मागील अनेक वर्षांपासून मी हे अनुभवत आहे.
यामुळे भाजीविक्रेते आणि साधक यांच्यामध्ये एक प्रकारची कुटुंबभावना निर्माण झाली आहे. अनेक जण या माध्यमातून सनातन संस्थेशी जोडले गेले आहेत. गेल्या दीड वर्षापासून त्यांच्यासाठी नियमित साधना सत्संगही चालू करण्यात आला आहे. भाजी आणण्याची ही सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळतो. ही सेवा करतांना मला आलेले अनुभव आणि जाणवलेली सूत्रे श्री गुरुचरणी अर्पण करते.

१. भाजीविक्रेत्या काकांनी सनातन संस्था आणि सत्संग यांविषयी स्वतःहून जाणून घेणे
एका भाजीविक्रेत्या काकांनी सनातन संस्था आणि सत्संग यांविषयी अधिक जाणून घेण्याच्या दृष्टीने मला स्वतःहून विचारले, ‘‘तुम्ही सत्संग घेत नाही का ?’’ यावर मी त्यांना संस्थेचे कार्य सविस्तर सांगितले. काही कालावधीनंतर सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचे त्या ठिकाणी मार्गदर्शन झाले. त्यानंतर तेथे नियमित साधना सत्संग चालू झाला.
२. भाजीविक्रेते, तसेच समाजातील लोक यांना आश्रम आणि साधक यांच्याविषयी विश्वास वाटू लागणे
२ अ. साधिकेने आवश्यक तेवढीच भाजी घेतल्याने भाजीविक्रेत्यांच्या मनात विश्वास निर्माण होणे : कधीकधी मी सेवाकेंद्रासाठी भाजी घ्यायला जाते. एखादी भाजी पुरेशी मिळाल्यावर मी अन्य भाजीविक्रेत्यांना सांगते, ‘‘आता मला ही भाजी मिळाली आहे, तर मी पुढच्या आठवड्यात तुमच्याकडून भाजी घेते.’’ असे सांगत असल्याने ‘त्यांच्या मनात आश्रम आणि साधक यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे’, असे मला जाणवले.
२ आ. काही भाजीविक्रेत्यांनी आपणहून भाजी काढून ठेवणे आणि त्याविषयी साधिकेला कळवणे : मी ‘भाजी घेण्यास येणार आहे’, हे ठाऊक असल्याने काही भाजीविक्रेते मी तेथे पोचण्यापूर्वीच सेवाकेंद्रासाठी भाजी काढून ठेवतात. कधीकधी आपणहून ते मला ‘भाजी काढून ठेवली आहे’, असा भ्रमणभाषही करतात. काही कारणास्तव माझा १ – २ आठवडे भाजी घेण्यात खंड पडला, तर पुढच्या वेळी ते आवर्जून त्याविषयी मला विचारणा करतात की, ‘तुम्ही १ – २ आठवडे का आला नाहीत ?’ काही भाजीवाले स्वतःहून आम्हाला बोलवून भाजी देतात. उन्हाळा असला किंवा काही भाज्यांचे दर वाढले, तरी ते ‘हवी ती भाजी घेऊन जा’, असे मला सांगतात.
२ इ. भाजी विकत घेण्यास आलेल्या अन्य लोकांनीही भाजी विकत घेऊन ती अर्पण करणे : भाजीविक्रेत्यांकडे भाजी अर्पण मागत असतांना तेथे इतरही काही जण भाजी विकत घेत असतात. आश्रमाचे महत्त्व ऐकून ते लोक स्वतः भाजी विकत घेऊन आपल्याला अर्पण म्हणून देतात. यावरून ‘सनातनचे कार्य आणि प.पू. डॉक्टरांनी साधकांना दिलेली शिकवण’ यांमुळे ‘समाजातील अनेक जण सनातन संस्थेशी नकळत जोडले जात आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
३. भाजीविक्रेत्यांची परिस्थिती पाहून ‘त्यांच्याकडे अर्पण कसे मागायचे’, असे वाटणे आणि ‘अर्पण दिल्यामुळे तो मागणारा अन् देणारा यांची साधना होते’, हे पटल्याने भावनिक विचारांवर मात करता येणे
कधी भाजी फार महाग असतांना किंवा भाजीवाल्या काकांची परिस्थिती पाहून माझ्या मनात विचार यायचे, ‘यांचा उदरनिर्वाह केवळ भाजीवरच चालत आहे, तर त्यांच्याकडे अर्पण कसे मागायचे ?’ माझ्या मनातील हे भावनिक विचार मी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितले. तेव्हा मला आढावासेवकांनी सांगितले, ‘‘हा भावनिक विचार आहे. प्रत्यक्षात भाजीवाल्यांकडून होणार्या अर्पणामुळे देव त्यांना भरभरून देणार आहे.’’ या दृष्टीकोनामुळे माझ्या मनातील विचार निघून गेले आणि ‘अर्पण दिल्यामुळे अर्पण देणारा अन् अर्पण घेणारा यांचीही साधना होते’, हे माझ्या मनावर बिंबले.
४. अनुभूती
४ अ. भाजी अर्पण दिल्यानंतर संपूर्ण भाजी विकली जाणे : एका भाजीविक्रेत्यांनी सेवाकेंद्रासाठी भाजी दिल्यानंतर ‘त्यांच्याकडील सर्व भाजी विकली गेली’, असा त्यांना अनुभव आला. त्यानंतर त्यांनी भाजीविक्रेत्या मित्रालाही अर्पण म्हणून भाजी देण्यास सांगितले. तेव्हापासून तेही नियमित भाजी अर्पण देत आहेत.
४ आ. अर्पण म्हणून भाजी देतांना भाजीविक्रेत्यांनी जयघोष केल्याने भाव जागृत होणे : भाजी देतांना काही भाजीविक्रेते ‘जय गुरुदेव’, ‘जय सद्गुरु’, असा जयघोष करत भाजी देतात. काही काळापूर्वी महर्षींनी साधकांना ‘जय गुरुदेव’, असा जयघोष करायला सांगितला होता. भाजी देणार्या काकांनीही त्याप्रमाणे जयघोष केल्यावर माझी भावजागृती झाली.
५. भाजीविक्रेत्यांना राखी बांधल्यामुळे त्यांना पुष्कळ आनंद होणे
एकदा रक्षाबंधनानिमित्त मी सनातनला भाजी अर्पण देणार्या भाजीविक्रेत्यांना राखी बांधली होती. मी राखी बांधल्यावर ‘त्या भाजीविक्रेत्यांना पुष्कळ आनंद झाला’, असे मला जाणवले.’
– सोनल विभांडिक, जळगाव सेवाकेंद्र, महाराष्ट्र. (३१.३.२०२५)
भाजीविक्रेत्यांच्या काही प्रतिक्रिया
१. तुम्हाला भाजी दिल्याने आम्हाला आनंद मिळतो आणि चांगले वाटते.
२. तुम्हाला भाजी दिल्याने ‘स्वकमाईतील थोडा भाग सत्कार्याला दिला’, याचे समाधान वाटते.
३. आध्यात्मिक कार्य करणार्या संस्थेला दान दिलेच पाहिजे. भाजी दिल्याने आम्हाला चांगले वाटते. माझी बरीच कामे नकळत पूर्ण होतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |