कागवाड, कर्नाटक येथील ‘श्री मांदार गणेशा’च्या नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१९ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कागवाड, कर्नाटक येथील श्री मांदार गणेशाची भंग झालेली जुनी मूर्ती पालटून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिरावर कळसारोहण करण्यात आले. श्री मांदार गणेश (मंदिर स्थापना शके १९७७ (इ.स. १८५५) आणि जीर्णोद्धार वर्ष २०१५) ही पटवर्धन सरकार यांच्या कुटुंबियांची जागृत उपास्यदेवता आहे. या सोहळ्याचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

श्री. मांदार गणेशाची जुनी मूर्ती
श्री. मांदार गणेशाची नवीन मूर्ती

१. श्री मांदार गणेशाची आध्यात्मिक वैशिष्ट्य !

१ अ. तेजतत्त्वप्रधान आणि संकटनाशक देवता : श्री गणपतीच्या ‘मांदार गणेश’ या रूपात तेजतत्त्व आणि संकटांचा नाश करण्याची क्षमता त्याच्या अन्य रूपांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असते.

श्री. निषाद देशमुख

१ आ. क्षेत्राची रक्षक देवता : भक्तांच्या भक्तीभावामुळे विशेष ठिकाणांतील देवळांत देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होते. समाजातील व्यक्तींचा देवतेप्रती भाव आणि श्रद्धा असल्यास त्या देवळातील देवता ‘क्षेत्राची रक्षक देवता’ म्हणून कार्य करते. ग्रामदेवता इत्यादी देवता ज्या संकटाला टाळू शकत नाहीत, अशा कठीण संकटांपासूनही क्षेत्रातील जागृत देवता तेथील समाजाचे रक्षण करते. असेच कार्य कागवाड येथील श्री मांदार गणेशाचेही आहे.

१ इ. भक्तांच्या अनाहतचक्रातून त्यांना चैतन्य आणि प्राणशक्ती देणारी देवता : कागवाड येथील श्री मांदार गणेश ही जागृत देवता आहे. त्यामुळे तिच्या भावपूर्ण दर्शनाने भक्ताचे मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होते अन् भक्ताचे थेट अनाहतचक्र कार्यरत होऊन त्याला चैतन्य आणि प्राणशक्ती यांचा प्रसाद मिळतो.

२. श्री मांदार गणेशाने भक्तांच्या रक्षणासाठी समष्टी त्रासाची झळ सोसणे

एखाद्या परिसरात जागृत देवता असेल आणि तिची नियमित उपासना (आरती, पूजन, यज्ञ इत्यादी) होत असल्यास त्या क्षेत्रात अखंड चैतन्य प्रवाहित होत असते. अशा क्षेत्रात कालमहात्म्यामुळे समष्टी प्रारब्धात वाढ होऊन महामारी किंवा रोगराई पसरणार असल्यास किंवा त्या क्षेत्रातील सात्त्विकता नष्ट करून लोकांना त्रास देण्यासाठी वाईट शक्तींचे तीव्र आक्रमण चालू असल्यास त्याचे पडसाद त्या क्षेत्रातील जागृत आणि रक्षणकर्त्या देवतेवर दिसून येतात. असेच श्री मांदार गणेश देवतेच्या संदर्भातही झाले.

मागील ४ – ५ वर्षांपासून संपूर्ण पृथ्वीवर सूक्ष्मातील आपत्काळ चालू असून त्यात उत्तरोत्तर वाढ होत आहे. या आपत्काळाचा लाभ घेऊन वाईट शक्ती सात्त्विकता न्यून करून आणि रज-तम पसरवून मानवावर विविध स्वरूपांतील जीवघेणी संकटे (महामारी, पूर, दंगली इत्यादी) आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वाईट शक्तींनी कागवाड क्षेत्राच्या संदर्भात असेच करण्यासाठी प्रयत्न केले. या आक्रमणांचा १० टक्के भाग श्री मांदार गणेशाने ग्रहण करून तो नष्ट केला. या प्रक्रियेचे स्थूल रूपातील पडसाद म्हणून श्री मांदार गणेशाची जुनी मूर्ती भंग पावली. अशा प्रकारे श्री मांदार गणेशाने भक्तांच्या रक्षणासाठी समष्टी त्रासाची झळ स्वतः सोसून भक्तांचे रक्षण केले आहे.

३. श्री मांदार गणेशमूर्तीच्या तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

३ अ. प्रथम दिवस (१९.२.२०२५) – तत्त्वन्यास, अघोर होम आणि जुन्या मूर्तीमधील तत्त्व काढून कलशामध्ये ठेवणे

३ अ १. वाईट शक्तींनी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात निर्माण केलेले अडथळे दूर करण्यासाठी श्री मांदार गणेशाचे मारक तत्त्व कार्यरत होणे : ‘प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील पहिल्या दिवसातील विधी होऊ नयेत’, यासाठी वाईट शक्ती तीव्र आक्रमणे करून विविध प्रकारचे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या. या वेळी वाईट शक्तीच्या आक्रमणांची तीव्रता नेहमीच्या तुलनेत २५ टक्के अधिक होती. त्यामुळे विधी वेळेवर चालू न होणे, विविध सामग्री मिळवण्यात अडथळे येणे, प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीत सहभागी श्रद्धाळूंना विविध शारीरिक त्रास होणे, विधीसाठी आपसांत सामंजस्य न होणे, अव्यवस्था होणे, आदी विविध त्रास काही प्रमाणात झाले.

असे असले, तरीही प्राणप्रतिष्ठापना करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या भक्तांच्या तीव्र तळमळीमुळे श्री मांदार गणेशाचे मारक तत्त्व वाईट शक्तींशी लढण्यासाठी कार्यरत झाले. त्यामुळे आरंभी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात १० टक्के अडथळे आले. नंतर भक्तांना विविध अडथळ्यांवर मात करणे शक्य झाले.

३ अ २. राक्षोघ्न होमातून प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीमुळे क्षेत्रातील त्रास १० टक्के न्यून होणे : प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीच्या अंतर्गत राक्षोघ्न होम करण्यात आला. या होमामुळे देवतेची मारक शक्ती प्रगट होऊन ती संपूर्ण क्षेत्रात प्रक्षेपित झाली. पूर्ण क्षेत्र त्या मारक शक्तीने भारित झाल्यामुळे त्या क्षेत्रावर सूक्ष्मातून लालसर रंगाची छटा दिसत होती. या मारक शक्तीमुळे पूर्ण क्षेत्रात वाढलेला वाईट शक्तींचा प्रादुर्भाव न्यून झाला, तर पूर्ण क्षेत्रात वाढलेला आध्यात्मिक त्रास १० टक्क्यांनी न्यून झाला.

३ अ ३. श्री गणपतीची तारक शक्ती कार्यरत झाल्यामुळे जुन्या मूर्तीमधील पूर्ण तत्त्व कलशामध्ये प्रवाहित होणे : राक्षोघ्न होमामुळे वाईट शक्तींचे अडथळे नाहीसे झाले. त्यामुळे जुन्या मूर्तीमधील तत्त्व कलशामध्ये प्रवाहित करण्यासाठी त्या स्थळी श्री गणपतीचे तारक तत्त्व कार्यरत झाले. श्री गणपतीचे तारक तत्त्व श्री मांदार गणेशाच्या जुन्या मूर्तीच्या डोक्यावर जलधारांप्रमाणे पडत होते. त्यामुळे जुन्या मूर्तीत सुप्त स्वरूपात असलेले तत्त्व प्रगट होऊन ते विधीद्वारे सहजतेने कलशामध्ये प्रवाहित होत होते. ही पूर्ण प्रक्रिया तारक शक्तीच्या बळावर होत असल्याने त्यातून आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत होती. त्यामुळे वातावरणात सूक्ष्मातून शीतलता जाणवत होती.

३ आ. द्वितीय दिवस (२०.२.२०२५) – जलाधिवास, धान्यादिवास आणि मूर्तीची मिरवणूक !

३ आ १. ‘जलाधिवास’ आणि ‘धान्यादिवास’ यांमुळे मूर्तीची शुद्धी होऊन त्यात पोकळी निर्माण होणे : प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीच्या अंतर्गत दुसर्‍या दिवशी मूर्तीवर ‘जलाधिवास’ आणि ‘धान्यादिवास’ हे विधी करण्यात आले. ‘जलाधिवास’ या विधीमध्ये देवतेची नवीन मूर्ती विविध नद्यांच्या पवित्र जलात ठेवली जाते. त्यामुळे मूर्तीतील सात्त्विकतेत वाढ होते. याच प्रकारे ‘धान्यादिवास’ या विधीमध्ये देवतेची नवीन मूर्ती विविध प्रकारच्या धान्यांमध्ये ठेवली जाते. त्यामुळे मूर्तीत मातृका शक्ती कार्यरत होते. हे दोन्ही विधी होतांना वायूमंडलात मोठ्या प्रमाणात श्री गणपतीचे तारक तत्त्व आणि देवीची ‘मातृका’ शक्ती कार्यरत झाली होती. या दोन्ही विधींमुळे मूर्तीची शुद्धी होऊन तिच्यात सूक्ष्म स्तरावर मोठी पोकळी निर्माण झाली. ‘जलाधिवास’ आणि ‘धान्यादिवास’ या विधींमुळे देवतेच्या मूर्तीत जेवढ्या मोठ्या प्रमाणावर पोकळी निर्माण होते, तेवढ्या प्रमाणात देवतेचे तत्त्व मूर्तीत आकृष्ट होण्यास साहाय्य होते.

३ आ २. देवतेच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढल्यामुळे देवतेचे तत्त्व समष्टी स्तरावर कार्यरत होणे : श्री मांदार गणेशाच्या नवीन मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळी गावातील भाविकांनी मूर्तीचे दर्शन घेतल्यामुळे त्यांचा भाव जागृत झाला. भाविकांमधील हा समष्टी भाव पाहून श्री गणेश भाविकांवर प्रसन्न झाला. त्यामुळे मिरवणुकीच्या माध्यमातून त्या क्षेत्रात

श्री गणपतितत्त्व पसरल्यामुळे पूर्ण क्षेत्रातील मंद प्रारब्ध आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या विविध अडचणी न्यून होण्यास साहाय्य झाले.

३ इ. तृतीय दिवस (२१.२.२०२५) – प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस

३ इ १. प्राणप्रतिष्ठापनेचे विधी चालू होण्यापूर्वी वायूमंडलात रिद्धिसिद्धिसहित महागणपतितत्त्व कार्यरत होणे : पहिल्या दोन दिवसांतील विधी भावयुक्त झाल्यामुळे तिसर्‍या दिवशी प्रत्यक्ष विधी चालू होण्यापूर्वीच देवळाच्या गाभार्‍यात आणि पूर्ण देवळात रिद्धिसिद्धिसहित महागणपतितत्त्व कार्यरत झाले होते. हे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सगुण-निर्गुण स्तरावर देवाची कृपा असल्याचे प्रतीक होते. यामुळे सूक्ष्मातून पूर्ण देऊळ लालसर छटेने (म्हणजे गणपतितत्त्वाने) युक्त दिसत होते.

३ इ २. प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीमुळे सूर्यासमान तेज असलेले श्री मांदार गणेशाचे तत्त्व नवीन मूर्तीत कार्यरत होणे : प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीच्या वेळी सूक्ष्मातून श्री मांदार गणेशाचे तत्त्व प्रगट झाले. हे तत्त्व सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. प्राणप्रतिष्ठापनेचे विधी चालू असतांना मूर्तीत श्री मांदार गणेशाचे तत्त्व वाढत होते. एकूणच सूक्ष्मातून दिसणारे पूर्ण तत्त्व मूर्तीत प्रविष्ट झाल्यावर मूर्तीच्या पायांपासून डोक्यापर्यंत टप्प्याटप्प्याने मूर्तीत सजीवता येऊन श्री मांदार गणेशाची नवीन मूर्ती जागृत झाली.

३ इ ३. नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा विधी झाल्यानंतर त्या मूर्तीत जाणवलेले आध्यात्मिक पालट !

३ इ ३ अ. मूर्तीतील तेजतत्त्वात वाढ होणे : नवीन मूर्तीची भावपूर्ण आणि विधीवत् स्थापना केल्यामुळे पूर्वीच्या मूर्तीच्या तुलनेत नवीन मूर्तीतून १० टक्के अधिक प्रमाणात तेजतत्त्व प्रक्षेपित होत आहे.

३ इ ३ आ. मूर्तीतील श्री गणेशतत्त्वात वाढ झाल्यामुळे भाविकांना सहजतेने अनुभूती येणे : नवीन मूर्तीत पूर्वीच्या मूर्तीच्या तुलनेत १५ टक्के अधिक प्रमाणात श्री गणेशतत्त्व कार्यरत झाले आहे. यामुळे भाविकांनी या मूर्तीसमोर केलेले नवस किंवा केलेली साधना यांचे त्यांना अल्प काळात शीघ्र फळ मिळणार आहे, तसेच भाविकांना श्री मांदार गणेशाच्या संदर्भातील अनुभूतीही सहजतेने येतील.

३ इ ३ इ. श्री मांदार गणेशाच्या भावपूर्ण दर्शनामुळे त्रास न्यून होऊन प्राणशक्तीचा प्रसाद मिळणे : प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीमुळे श्री मांदार गणेशाचे तत्त्व आणि त्याचे तेज या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे या नवीन मूर्तीच्या चरणांतून सगुण शक्ती आणि मूर्तीच्या डोक्याच्या भागातून सगुण-निर्गुण शक्ती प्रक्षेपित होणे चालू झाले आहे.

भाविकांनी श्री मांदार गणेशाचे त्याच्या ‘चरणांपासून डोक्यापर्यंत’ या क्रमाने दर्शन घेतल्यावर त्यांच्यावर असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊन त्यांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांमध्ये घट होईल, तसेच त्यांच्या देहाची शुद्धी झाल्याने त्यांना श्री मांदार गणेशाकडून प्रक्षेपित झालेल्या प्राणशक्तीचा प्रसाद मिळेल. त्यामुळे त्यांना विविध कार्यांत यश संपादन करता येईल.

४. श्री मांदार गणेशाच्या नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात सहभागी असलेल्या जिवांची साधना होऊन त्यांच्यावर श्री गणेशाची कृपा होणे 

देऊळ हे चैतन्याचे केंद्र आहे. त्यामुळे समष्टी साधनेला चालना मिळत असते. ज्या समाजातील व्यक्ती आपल्या क्षेत्रातील देवळांकडे दुर्लक्ष करतात, त्या ठिकाणच्या रज-तमामध्ये वाढ होऊन तेथे विविध रोग, दारिद्र्य आणि संकटे यांची उत्पत्ती होते. याउलट ज्या समाजातील व्यक्ती संघटितपणे आपल्या क्षेत्रातील देवळांचा जीर्णाेद्धार करतात, तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या कृती करतात, त्या ठिकाणी अशा कृतींमुळे समाजातील व्यक्तींकडून सत्साठी त्याग होऊन त्यांची साधना झाल्याने त्यांना विविध देवतांचे कृपाशीर्वाद मिळत असतात.

श्री मांदार गणेशाच्या भंग झालेल्या मूर्तीच्या ठिकाणी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या जिवांकडून त्यागपूर्ण साधना झाल्यामुळे ते आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर श्री मांदार गणेशाची कृपा झाली आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), फोंडा, गोवा. (ज्ञान मिळण्याची वेळ : १९.२.२०२५, दुपारी ४.३०, २०.२.२०२५, दुपारी १.१५ आणि २१.२.२०२५, दुपारी २.२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक