ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल मोदी आणि सैन्यदले यांचे अभिनंदन !

पणजी – आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शिरगाव येथील श्री लईराई जत्रेतील चेंगराचेंगरीत मृत्यू आलेल्यांना १ मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली वहाण्यात आली. मंत्रीमंडळ बैठकीत या घटनेवर चर्चाही झाली. याविषयीचा सत्यशोधन अहवाल ८ मेपर्यंत येणार असून तो सार्वजनिक केला जाईल, अशी माहिती मंत्रीमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मंत्रीमंडळ बैठकीतील इतर सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. कॅगचा लेखापरीक्षण अहवाल, वित्तीय खात्यांचा अहवाल, विनियोगाचा अहवाल इत्यादी ७ मेच्या मंत्रीमंडळ बैठकीत संमत करण्यात आले असून पुढील विधानसभेसमोर ते सादर केले जाणार आहेत.
२. मिनरल फाऊंडेशनचा सेवाकाल वर्ष २०२३ ते वर्ष २०२४ या १ वर्षाच्या कालावधीसाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल.
३. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील ‘सर्जिकल ऑन्कॉलॉजी’ या वैद्यकीय विभागात प्राध्यापक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
४. आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी यशस्वीरित्या ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सैन्यदले यांचे अभिनंदन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सक्षम देश म्हणून पुढे येत आहे. बहुतांश देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
५. सांगे तालुक्यात १ सहस्र ४७२ चौरसमीटर भूमी सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. या भूमीतील एका व्यक्तीला घर बांधण्यासाठी पर्यायी भूमी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील पुलाचे काम करण्यास येणारा अडथळा दूर झाला आहे.