आळंदीत देवस्थान आणि ग्रामस्थ यांकडून भाविकांसाठी उत्कृष्ट व्यवस्था !

आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवात सहभागी झालेल्या सहस्रो भाविकांसाठी देवस्थान आणि ग्रामस्थ यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे. चौथ्या दिवशीही भाविकांचा मोठा ओघ आळंदीत दिसून आला आणि या सर्वांसाठी निवास, भोजन आणि दर्शनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. ३ मेपासून चालू झालेल्या या महोत्सवात दूरदूरहून आलेल्या भाविकांसाठी कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ आणि आळंदी ग्रामस्थ यांनी नियोजनबद्ध काम केले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता यांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. ज्यामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचा आनंद घेता आला.

आजच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी पारायण, ह.भ.प. प्रसाद महाराज बडवे यांचे कीर्तन, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र चिंतन आदींचा समावेश होता. भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्या उत्कृष्ट व्यवस्थेचे कौतुक झाले. भाविकांसाठी माहिती आणि मदतकेंद्रे उभारण्यात आली असून महोत्सव आनंदमय वातावरणात चालू आहे.