‘हिंदु धर्मशास्त्रानुसार श्राद्धविधी, तसेच सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यामुळे होणारे लाभ’ यांविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे !

‘माझी आई कै. (सौ.) सुरेखा कारदगे (वय ५८ वर्षे) हिचे ७.५.२०२५ (वैशाख शुक्ल दशमी) या दिवशी ४ थे श्राद्ध आहे आणि माझा भाऊ कै. नरेंद्र कारदगे (वय ३२ वर्षे) याचे ८.५.२०२५ (वैशाख शुक्ल एकादशी (मोहिनी एकादशी) या दिवशी ८ वे श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. (सौ.) सुरेखा कारदगे

१. मे २०१७ मध्ये मोठ्या भावाचा झालेला अपघाती मृत्यू !

१ अ. भावाच्या मृत्यूनंतर लिंगायत समाजानुसार त्याचे अंत्यविधी करण्यात येणे : माझा मोठा भाऊ कै. नरेंद्र कोल्हापूरमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत होता. मे २०१७ मध्ये एका अपघातात त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबियांना पुष्कळ मोठा धक्का बसला. मृत्यूसमयी त्याचे वय अवघे ३२ वर्षे होते. माझा तो एकुलता एक भाऊ होता. त्या वेळी त्याचे सर्व अंत्यविधी आमच्या लिंगायत समाजानुसार करण्यात आले. त्या वेळी आम्ही सनातन संस्थेने सांगितलेली साधना करत नव्हतो. त्यामुळे आम्हाला हिंदु धर्मातील शास्त्राप्रमाणे त्याचे मृत्यूत्तर विधी करता आले नाहीत.

कै. नरेंद्र कारदगे

१ आ. भावाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी नामजपाला आरंभ करणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी कुटुंबियांना प्रारब्ध सहन करण्याची शक्ती दिली’, असे जाणवणे : भावाच्या मृत्यूनंतर लगेचच आई-वडील आणि अन्य कुटुंबीय यांनी श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करायला आरंभ केला. मृत्यूनंतर २ वेळा आईच्या स्वप्नात माझा भाऊ आला. तेव्हापासून आई नियमित ‘नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे’, हे साधनेचे प्रयत्न करू लागली. या प्रसंगानंतर माझीही थोड्या प्रमाणात साधना चालू झाली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच मला आणि आमच्या कुटुंबियांना प्रारब्ध सहन करण्याची शक्ती दिली’, असे मला जाणवू लागले. माझे आई-बाबाही दुःखातून लवकर सावरले आणि स्थिर झाले. ते दोघेही मनापासून नामजप करू लागले.

१ इ. सनातनने प्रकाशित केलेले श्राद्धावरील ग्रंथ वाचून भावाचे वर्षश्राद्ध करणे : वर्ष २०१८ पासून आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला आरंभ केला. भावाच्या वर्षश्राद्धाच्या वेळी आम्हाला श्राद्धविधी करण्याचे शास्त्र ठाऊक नव्हते; पण सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ वाचून त्याप्रमाणे कृती करण्याचा आम्ही प्रयत्न केला. (सनातन संस्थेने ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’ आणि ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’ हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. – संकलक) श्राद्धविधीसाठी गावी पहाटे उठून आई, मी आणि मोठी बहीण स्वयंपाक करत होतो. पहाटे साडेपाचच्या सुमारास मला बाहेर कावळ्याचा आवाज आला. तेव्हा आम्ही त्याच्यासाठी दहीभात ठेवला, तर कावळ्याने तो पटकन खाल्ला.

१ ई. श्राद्धाच्या दिवशी यजमानांना स्वप्नात मृत भाऊ भोजन आणि दत्ताचा नामजप करतांना दिसणे : भावाच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी रात्री माझ्या यजमानांना स्वप्न पडले. त्यांच्या स्वप्नात माझा भाऊ आला होता. तो यजमानांच्या समोर जेवायला बसला होता. त्याला पहाताच यजमानांनी प्रार्थना केली, ‘हे श्री दत्तगुरु, नरेंद्र यांच्या लिंगदेहाला सद्गती मिळू दे आणि त्यांना अन्न ग्रहण करता येऊ दे. आम्हाला आपला आशीर्वाद लाभू दे’, अशी प्रार्थना करताच भावाने हसत मान डोलावली. नंतर लगेच यजमानांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केला. तेव्हा भावानेही नामजप करायला आरंभ केला.

सौ. तपस्विनी नीलेश शेटे

२. कोरोनाच्या काळात आई आणि अन्य नातेवाईक यांचे निधन होणे

२ अ. कोरोनाच्या काळात आई, मामा आणि आजोबा यांचे निधन होणे : आम्ही वर्ष २०१८ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला आरंभ केला. कोरोनाच्या काळात मे २०२१ मध्ये माझी आई, मामा आणि आजोबा यांचे ८ दिवसांच्या अंतराने निधन झाले. कोरानाचे निमित्त होऊन कुटुंबातील ३ व्यक्ती अकस्मात् निघून गेल्या. माझी आई साधना करत असल्यामुळे तिचे मृत्यूत्तर विधी हे हिंदु धर्मशास्त्रानुसार करता आले.

२ आ. आई करत असलेल्या साधनेमुळे तिचे अंत्यसंस्कार हिंदु धर्मशास्त्रानुसार करता येणे : वर्ष २०१७ मध्ये माझ्या भावाचे निधन झाल्यानंतर आई सतत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायची. घरातील सर्व कामे करतांना, तसेच रात्री जाग आली की, प्रार्थना, नामजप करणे, तसेच कृतज्ञता व्यक्त करणे’, असे आईचे सतत चालू असायचे. ती करत असलेल्या या साधनेमुळेच तिचे अंत्यसंस्कार हिंदु धर्मशास्त्रानुसार झाले आणि त्यात कोणतीही अडचण आली नाही. आई गेल्यानंतरही माझे मन स्थिर होते.

२ इ. हिंदु धर्मशास्त्रानुसार आईचे पहिले वर्षश्राद्ध केल्यावर मनाला आनंद वाटणे : आईच्या पहिल्या वर्षश्राद्धाच्या वेळी आम्ही वडिलांना सांगितले की, आपण हिंदु धर्मशास्त्रानुसार आईचे श्राद्धविधी करूया. अशा प्रकारे श्राद्धविधी केले, तर पूर्वजांना सद्गती मिळते आणि कुटुंबाला आशीर्वाद मिळतो. वडील यासाठी लगेच सिद्ध झाले. त्यानंतर हिंदु धर्मशास्त्रानुसार वर्षश्राद्धाचे सर्व विधी केल्याने मनाला आनंद वाटला.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमुळेच मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रारब्ध सहन करण्याची शक्ती मिळाली. याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. तपस्विनी नीलेश शेटे, पुणे (सप्टेंबर २०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक