आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (८.५.२०२५)  

ऑपरेशन सिंदूर…

भारतियांकरता अभिमानाचा दिवस ! – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई – भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत आतंकवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्याचे पूर्ण चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे कुणाला पुरावा मागायला जागाच उरली नाही. भारतियांकरता हा अभिमानाचा दिवस आहे. भारत योग्य पद्धतीने सूड घेईल, हे आपण दाखवून दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदुर’ हे नाव अधिक बोलके आहे, अशी प्र्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार

मुंबई – भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील आतंकवादी तळांवर आक्रमणे करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन, कौतुक केले आहे.


न्याय मिळण्यास आरंभ ! – सुनील आंबेकर, रा.स्व. संघ

नागपूर – पहलगाममधील पीडित लोकांना न्याय मिळणे चालू झाले आहे. राष्ट्राचे समर्थन, जय हिंद ! भारतमाता की जय !, असा अभिप्राय रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.


संजय राऊतांकडून सैन्याचे आभार !

मुंबई – पाकिस्तान अन् पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवादी तळांवर आक्रमणाविषयी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’साठी सैनिकांचे आभार मानले.


सैन्याने चांगले काम केले आहे ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

अण्णा हजारे

अहिल्यानगर – सैन्याने केलेल्या कामाचे शब्दांनी कौतुक करता येत नाही, इतके चांगले काम केले आहे. भारत स्वतःहून कुणाला छेडत नाही; मात्र केले तर सोडायचे नाही. भारताने सूड घेतला. अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कुणाचे धैर्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देऊन भारतीय सैन्याचे अभिनंदन केले आहे.