सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

१. रथोत्सव म्हणजे कलियुगातील श्रीविष्णूच्या जयंतावताराचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे) सात्त्विक महानाट्य !

१ अ. बहुरूपी श्रीविष्णूचे कलियुगात साकारलेले अत्यंत वत्सल आणि प्रीतीमय रूप म्हणजे ‘श्री जयंतावतार’ ! : ‘हे विश्व म्हणजे स्वयं परमेश्वराने घडवलेले महानाट्य आहे. विश्वरूपी रंगभूमीवर प्रत्येक युगात श्रीविष्णूने अवतार घेऊन लीलया आतापर्यंत दशावतार साकारले आहेत. विश्वाच्या रंगभूमीवरील प्रत्येक अवताराच्या महानाट्यात ‘भगवान विष्णु’ हा महानट आहे. ‘मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम आणि श्रीकृष्ण’, अशी भगवंताने घेतलेली बहु रूपे आहेत. अशा बहु रूपी विष्णूने कलियुगात साकारलेले अत्यंत वत्सल आणि प्रीतीमय रूप म्हणजे ‘श्री जयंतावतार’ !

१ आ. श्रीविष्णूने जयंतावतारात अनेक नाट्यलीला केल्या असून रथोत्सवात जयंतावताराने आपले मूळ विष्णुरूपदर्शन घडवून अवघ्या विश्वाला धन्य करणे : हा रथोत्सव सोहळा श्रीविष्णूच्या जयंतावताराची भावपूर्ण प्रचीती देणारा होता. आतापर्यंतच्या इतर अवतारांप्रमाणेच श्रीविष्णूने जयंतावतारातही अनेक नाट्यलीला केल्या आहेत. त्यातील अनेक भावभक्तीमय अंक, प्रसंग आणि दृश्ये यांपैकी एक म्हणजे श्री जयंतावताराचा रथोत्सव सोहळा ! ‘खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे ।।’ (तुकाराम गाथा, अभंग १८९, ओवी १) म्हणजे ‘चंद्रभागेच्या वाळवंटात सर्व संतांचा विठ्ठलाशी एकरूप होण्याचा खेळ चालू आहे. यात सर्व वैष्णव बंधुभावाने नाचत आहेत.’ या अभंगाप्रमाणेच साक्षात् देवानेच या रथोत्सवाचा खेळ मांडला होता. हा खेळीया (नट) आपल्या दिग्दर्शकाला (महर्षींना) अपेक्षित अशी नाट्यलीला साकारत होता. या रथोत्सवात जयंतावताराने आपले मूळ विष्णुरूपदर्शन घडवून अवघ्या विश्वालाच धन्य धन्य केले आहे.
२. रथोत्सवातील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या त्या वेळच्या अस्तित्वातील ‘आहार्य, आंगिक, वाचिक अन् भावातून प्रकट होणारा’ या अभिनयांचे आध्यात्मिक नाट्यशास्त्रीय विश्लेषण !
२ अ. आहार्य अभिनय
(आहार्य अभिनय : अभिनेत्याद्वारे ‘भूमिकेसाठी आवश्यक वस्त्रालंकार, रंगभूषा, साहित्य, नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना’ या सर्वांच्या साहाय्याने जी अभिव्यक्ती होते, त्यास ‘आहार्य अभिनय’ असे म्हणतात.)
२ अ १. गुरुदेवांनी धारण केलेल्या श्रीविष्णूच्या वेशभूषेत त्यांची पराकोटीची एकरूपता असणे : रथोत्सवाच्या वेळी तिन्ही गुरूंनी महर्षींच्या आज्ञेवरून दैवी नाट्यलीला साकारली. गुरुमाऊलींचा ‘आहार्य’ अभिनय, म्हणजे त्यांनी धारण केलेली ‘श्रीविष्णूची वेशभूषा, आभूषणे आणि अलंकार’ ही सर्व केवळ वेशभूषा नव्हती, तर त्यांची त्या वेशभूषेशी असलेली पराकोटीची एकरूपता अन् समरसता होती.
२ अ २. गुरुदेवांनी धारण केलेली वस्त्रे आिण आभूषणे यांतून श्रीविष्णूचे चैतन्य प्रक्षेपित होऊन विश्वकल्याण होणे : गुरुदेवांनी धारण केलेला शेला आणि पितांबर ही वस्त्रे अन् आभूषणे यांतून मोठ्या प्रमाणात श्रीविष्णूचे चैतन्य प्रक्षेपित होत होते. ज्यायोगे विश्वातील सर्व स्थूल आणि सूक्ष्म जिवांचा उद्धार होत होता. सामान्य नट वेशभूषा करतो, तेव्हा त्यातून फारतर त्याची तेवढ्या वेळेपुरती एक छाप प्रेक्षकाच्या मनःपटलावर रहाते; परंतु देव आहार्य अभिनय साकारतो, तेव्हा त्यातून केवळ विश्वकल्याण होते आणि धर्मस्थापनेचे कार्य घडते. त्यामुळे विश्वाच्या मनःपटलावर त्याची छाप अनंत काळापर्यंत रहाते.
२ अ ३. गुरुदेवांच्या वेशभूषेतून श्रीविष्णूचा सात्त्विक भाव प्रक्षेपित होणे : नाट्यकलेतील जाणकार म्हणतात की, ‘कलाकाराला वेशभूषा सांभाळता (‘कॅरी’ करता) आली पाहिजे.’ इथे मात्र यापेक्षाही अधिक आहे. या वेशभूषेतूनही श्रीविष्णूचा सात्त्विक भाव प्रक्षेपित होत होता; कारण हा आहार्य अभिनय साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच साकारत होती.
२ अ ४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची केश-वेशभूषा अन् आभूषणे यांतून देवीतत्त्व प्रक्षेपित होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी हिरवी साडी, तर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जांभळी साडी परिधान केली होती. दोघींची वेशभूषा, केशभूषा आणि आभूषणे यांतूनही मोठ्या प्रमाणात देवीतत्त्व आणि देवीचे चैतन्य प्रक्षेपित होत होते. दोघींच्या आहार्य अभिनयातून विश्वजननीचा वात्सल्यभाव प्रकट हाेत होता.
२ अ ५. रथ, रथाची सजावट आणि रथाचे सारथी ! : रथोत्सवात रथ आणि रथाच्या फुलांची सजावट हे नेपथ्यही आहार्य अभिनयाचा सुंदर सात्त्विक नमुना होता. रथाचे सारथी श्री. परशुराम पाटील यांनी पांढरी वस्त्रे परिधान केली होती. त्यांचा हा आहार्य अभिनय ‘देवा रंगलो तुझ्या रंगी, आता नेई आम्हा मोक्षस्थानी श्वेतरंगी ।’ असेच काही सांगत होता. देवाचे सारथ्य करणारा सारथी त्याच्या चरणी जणू मोक्षस्थानच अनुभवत होता.
२ आ. आंगिक अभिनय (एक्स्प्रेशन्स थ्रू बॉडी – expressions through body)
२ आ १. जयंतावताराचे विलोभनीय मुखमंडल आणि नेत्रांच्या सहजसुंदर हालचाली यांतून श्रीविष्णूची अपार प्रीती प्रदर्शित होणे : या रथोत्सवात श्रीविष्णु अत्यंत विलोभनीय मुखमंडल असलेल्या जयंतावतारात सहज स्वाभाविक आणि प्रसन्न मुख-अभिनयाने युक्त होते. त्यांच्या नेत्रांच्या सहज आणि न्यूनतम सात्त्विक हालचालींमधून जगत् पालनकर्त्या श्रीविष्णूची अपार प्रीती प्रदर्शित होत होती.
२ आ २. श्री गुरूंच्या सहज हावभावांतून श्रीविष्णूच्या अंतरातील भावांचे सहजरित्या प्रदर्शन होणे : आपल्यासमोर जमलेल्या भक्तांना पाहून श्री गुरूंकडून होणारे ‘सहज आणि न्यूनतम हातवारे, मान हलवणे, प्रसन्न चेहर्याच्या हावभावांनी आपल्या प्रत्येक भक्ताची दखल घेणे’, हे लीलानाट्य सहजभावात घडत होते. त्या वेळी त्यांचा संपूर्ण देह श्रीविष्णूच्या अंतरातील भावांचे सहजरित्या प्रदर्शन करत होता.
२ आ ३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या मुखावरील प्रसन्न भाव ! : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघींच्याही मुखमंडलावर तेच सहज स्वाभाविक अन् प्रसन्न भाव होते. त्याचसमवेत त्यांच्या नेत्रांमधील सहज सात्त्विक हालचालींमधून श्री गुरूंप्रती शिष्यभाव आणि साधकांप्रती वात्सल्यभाव एकाच वेळी एकवटले होते. हे केवळ अवतारी विभूतींकडूनच घडू शकते.
२ इ. वाचिक अभिनय (एक्स्प्रेशन्स थ्रू व्हॉईस Expressions through voice)
२ इ १. विष्णुस्वरूप श्री गुरूंचा साधक आणि विश्वातील प्रत्येक अणू-रेणू यांच्याशी झालेला दिव्य अन् गूढगम्य सूक्ष्म संवाद ! : रथोत्सवातील श्रीविष्णुस्वरूप श्री गुरूंचा वाचिक अभिनय हा वैखरीच्या पुढे जाऊन ‘परा आणि पश्यंती’ या वाणींमधील होता. त्यांना आपल्या लाडक्या साधकांशी संवाद साधण्यासाठी शब्दांची आवश्यकताच नव्हती, तरीही ते आणि साधक यांच्यात, तसेच त्यांच्यात अन् विश्वातील प्रत्येक अणू-रेणूत एक शब्दातीत असा गूढगम्य सूक्ष्म संवाद चालू होता. या संवादात विश्वकल्याणाची तळमळ होती, धर्मस्थापनेची शाश्वत गर्जना होती, गुरुकृपायोगातील दिव्य वचने होती आणि अधर्माचा विनाश समीप आला असल्याची चाहूलही होती.
२ इ २. श्री गुरूंच्या दैवी वाणीचा अनाहत नाद साधकांच्या अंतःकरणात स्थिर होणे : हा संवाद त्यांच्या दैवी वाणीतून साधला जात होता; पण ती वाणी त्यांच्या मुखातून नव्हे, तर त्यांच्या दैवी वाणीचा अनाहत नाद त्यांच्या अंतःकरणातून निघून थेट साधकांच्या अंतःकरणात स्थिर होत होता. मला अजूनही माझ्या अंतःकरणात स्थिरावलेला तो दैवी नाद ऐकू येतो. संपूर्ण विश्वाला काळाच्या अंतापर्यंत तो ऐकू येत राहील; कारण हा वाचिक अभिनय सामान्य मनुष्यरूपी कलाकाराचा नाही, तर तो देवाने साकारलेल्या लीलानाट्यातील स्वयं देवाचाच आहे.
२ ई. भावातून प्रकट होणारा अभिनय (एक्स्प्रेशन्स थ्रू इमोशन्स expressions through emotions)
२ ई १. श्री गुरूंनी त्यांचे मूळ स्वरूपच रथोत्सवात साकारल्याने त्यांचा सात्त्विक अभिनय सहज स्वाभाविक असणे : भावातून प्रकट होणारा अभिनय म्हणजे पात्राच्या अंतःकरणातील भाव प्रकट करणे. हे करण्यासाठी आधी नटाला त्या पात्राशी आणि त्याच्या भावविश्वाशी एकरूप व्हावे लागते. त्यासाठी नाट्यसाधना आणि नाट्यसराव आवश्यक आहे. श्री गुरूंच्या संदर्भात त्यांनी त्यांचे मूळ स्वरूपच रथोत्सवात साकारले. त्यामुळे त्यांनी साकारलेला सात्त्विक अभिनय हा सहज स्वाभाविक होता.
२ ई २. श्री गुरूंचे अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन त्यांच्या नेत्रांतून भावाश्रू येणे : श्री गुरूंच्या अंतरात अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन ते भाव सर्व विश्वामध्ये प्रक्षेपित झाले. रथात विराजमान झालेले विष्णुस्वरूप श्री गुरुदेव भक्तांकडे पहात होते. तेव्हा ते स्वतःच भक्तीरसात न्हाऊन निघाल्यामुळे आपल्या भक्तांना पाहून त्यांच्याही नयनकमलांतून भावाश्रू आले.
२ ई २ अ. गुरुमाऊलींच्या, जगत्पालकाच्या नेत्रांतून आलेले भावाश्रू हे त्यांच्या अथांग हृदयातील कारुण्यभावाचे प्रतीक ! : नाट्यशास्त्रकार भरतमुनींनी ‘अश्रू’ हा अष्टसात्त्विक भावांपैकी एक श्रेष्ठ असा भाव सांगितला आहे. आध्यात्मिकदृष्ट्या गुरुमाऊलींच्या नेत्रांतून आलेले भावाश्रू अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत; कारण जगत्पालकाच्या नेत्रांतून आलेले भावाश्रू हे त्याच्या अथांग हृदयातील कारुण्यभावाचे प्रतीक आहेत. त्यात शोक नसून विश्वातील कणा-कणांप्रती अपार करुणा आहे. या भावाश्रूंचा स्पर्श अत्यंत शीतल आहे. त्यांचे रूप अलौकिक शुभ्र मोत्यासारखे, गंध मनमोहक चंदनाचा, रस निर्मळ जलाचा आणि शब्द (ध्वनी) कर्णमधुर आकाशनादाचा असाच होता. हे अनुभवतांना मी श्री जयंतावताराच्या नाट्यलीलेची भाविक आणि रसिकही झाले.
हा अलौकिक रसास्वाद (रसानुभूती) दिल्याबद्दल मी तिन्ही गुरूंच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञ आहे.
(टीप : नाटक म्हणजे घडलेल्या प्रसंगाची पुनर्निर्मिती, असे साधारणपणे असते; पण ‘ईश्वर नाट्य साकारत असतो, तेव्हा तो सर्वज्ञ असल्याने त्याला ते आधीच ठाऊक असते, तरीही घडणार्या घटनांमध्ये तो कोणतीही ढवळाढवळ न करता साक्षीभावाने ते नाट्य साकारत असतो. या अर्थाने इथे गुरुमाऊलींच्या संदर्भात अभिनय आणि अन्य नाट्यघटक यांविषयीचे लिखाण केले आहे.)
– सौ. शुभांगी रामचंद्र शेळके, एम.ए .(नाट्यशास्त्र), फोंडा, गोवा. (२.४.२०२५)
(क्रमशः पुढील गुरुवारी)