भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी आयुष्य समर्पित करणारे बेंगळुरू (कर्नाटक) येथील पू. डॉ. शिवकुमार ओझा !

पू. डॉ. शिवकुमार ओझा

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. पू. डॉ. शिवकुमार ओझा यांचा परिचय 

पू. डॉ. शिवकुमार ओझा यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९३३ या दिवशी इटावा (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील बोझा या गावात झाला. लखनौ विद्यापिठातून गणितात एम्.एस्सी. पदवी घेतल्यानंतर त्यांनी ‘आय.आय.एस्सी., बेंगळुरू’ येथील ‘एयरोस्पेस’ (अंतरिक्ष) अभियांत्रिकी विभागातून ‘एयरोडायनामिक्स’ या विषयात पीएच्.डी. पदवी प्राप्त केली, जिथे त्यांची व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली. वर्ष १९६७ मध्ये ते ‘आयआयटी, मुंबई’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – भारतीय तंत्रज्ञान संस्था) येथील ‘एयरोस्पेस अभियांत्रिकी विभागा’त रुजू झाले आणि तेथे प्राध्यापक म्हणून राहिले.

त्या काळात त्यांनी ‘एयरोडायनामिक्स’ क्षेत्राशी संबंधित विविध विषयांचा अभ्यास आणि अध्यापन केले, विविध प्रशासकीय दायित्व सांभाळले आहे. अनेक संशोधन आणि प्रकल्प यांसाठी मार्गदर्शन केले, अनेक संशोधन पत्रे प्रकाशित केली, परदेशात शैक्षणिक दौरे केले आणि ‘फ्लाइट परफॉर्मन्स ऑफ एअरक्राफ्ट’ नावाचे पुस्तक लिहिले की, जे अमेरिकेत प्रकाशित झाले.

कलियुगातील पहिले वेदऋषी पू. डॉ. शिवकुमार ओझा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी डॉक्टर म्हणजे विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. त्यामुळे मला कधी संस्कृत, राष्ट्रभाषा हिंदी किंवा माझी मातृभाषा मराठी यांच्या अभ्यासाची ओढ वाटली नाही. याउलट पू. डॉ. शिवकुमार ओझा विज्ञानातील प्रसिद्ध संशोधक असूनही त्यांनी संस्कृत, हिंदी, अध्यात्मशास्त्र, भारतीय संस्कृती या विषयांवर अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांच्या ग्रंथातील प्रत्येक ओळ अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे ‘ते कलियुगातील पहिले वेदऋषी आहेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. ‘आयआयटी, मुंबई’मध्ये ‘भारतीय संस्कृती’ विषय शिकवण्यासाठी केलेले प्रयत्न

सेवानिवृत्तीनंतर पू. डॉ. ओझा यांची ‘भारतीय संस्कृती’ जाणून घेण्याविषयी विशेष रुची वाढली. त्यानंतर भारतीय संस्कृती हेच त्यांचे अध्ययन आणि अध्यापन यांचे क्षेत्र बनले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ‘भारतीय संस्कृती’ हा विषय ‘आयआयटी, मुंबई’मध्ये शिकवला जाऊ लागला, तसेच या विषयावर स्वतः अध्यापन करून त्यांनी तेथील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी रुची निर्माण केली. पू. ओझाजी जितका काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, तितक्या कालावधीत ‘भारतीय संस्कृती’ हा विषय शिकणार्‍यांची संख्या प्रतिवर्षी वाढतच होती.

हिंदूंना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे !

हिंदीसह अनेक भाषांचा प्रचार केला जातो; पण प्रचारक आपल्या भाषांमधील अनेक गुणांचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. मुलांना हिंदी भाषेची विशेषता शिकवली पाहिजे. भाषेतील गुणधर्म ठाऊक झाल्यावर त्यांना भाषेचा अभिमान वाटेल. हिंदु संस्कृती काय आहे, हे समजावून सांगण्याचे मुख्य माध्यम भाषा आहे आणि हे माध्यम शक्तीशाली असले पाहिजे. ‘संभावत:’ किंवा ‘कदाचित्’ यांसारख्या शब्दांचा वापर आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्येही फारसा आढळत नाही; कारण हिंदु संस्कृतीमध्ये ज्ञान निश्चित आहे. तर पाश्चात्त्य लोकांच्या ज्ञानात संशयाचा एक पैलू आहे आणि त्यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला ‘संभावत:’ किंवा ‘कदाचित्’ या शब्दांचा अर्थ आढळतो; म्हणून हिंदूंना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे. हिंदु संस्कृती जीवनाचे ध्येय निश्चित करते; ती या जगात मुख्य सिद्धांतांसह धर्माच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण करते. ही संस्कृती सनातन सिद्धांतांवर आधारित आहे, म्हणजेच ज्याला नष्ट करता येत नाही.

– पू. डॉ. शिवकुमार ओझा

अखिल भारतीय हिंदु अधिवेशनमध्ये पू. डॉ. शिवकुमार ओझा यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सन्मान करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

३. भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथांची निर्मिती

भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करून भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पितभावाने अलौकिक कार्य करणारे  पू. डॉ. ओझा यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ‘भारतीय संस्कृती महान आणि विलक्षण’ या नावाचा त्यांचा ६६० पृष्ठांचा ग्रंथ सनातन वैदिक संस्कृतीचा साररूपी ग्रंथ आहे. हे ग्रंथ हिंदी भाषेत आहेत. त्यांचे मराठीत भाषांतर करून ते प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ‘पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात कोणत्या विषयाचा समावेश आहे ?’, याविषयीची थोडक्यात माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

अ. ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’, या ग्रंथात ‘आधुनिक शिक्षणामुळे माणूस भौतिक सुखांकडे आसक्त झाल्याने काय हानी झाली ? ‘शिक्षण’ याचा अर्थ, इंग्रजी भाषेतील आधुनिक शिक्षण आणि त्यातील दोष, शिक्षणात विविध प्रकारच्या प्रमाणांना आधार असणे का आवश्यक आहे आणि त्यातून होणारे लाभ, शिक्षणात धर्म असणे का आवश्यक आहे ? आधुनिक शिक्षणामुळे युवकांची झालेली वैचारिक हानी’ अशा विविध विषयांचा उहापोह करण्यात आला आहे.

आ. ‘भारतीय संस्कृती समझना अनिवार्य क्यो ?’, या ग्रंथात ‘भारतीय संस्कृती म्हणजे काय ? भारतीय संस्कृतीचा केंद्रबिंदू कोणता ? ती जाणून घेतल्याने कोणते लाभ होतात ? भारतीय संस्कृतीने संस्कृत भाषेला अधिक महत्त्व का दिले आहे ? भारतीय संस्कृती धर्माचे स्वरूप कशा प्रकारे समजावून सांगते ? या संस्कृतीचे पालन केल्याने जीवनातील ध्येय कशा प्रकारे योग्यरित्या निवडता येते ? कर्माचे विज्ञान कशा प्रकारे समजून सांगते ? अंतःकरण शुद्धीचे कोणते उपाय संस्कृतीत आहेत ?’, यांसह अनेक विषयांचा उहापोह करण्यात आला असून ‘भौतिकवादी समाजाची स्थिती आणि भारतीय संस्कृती’ यांतील भेद स्पष्ट करून दाखवण्यात आला आहे.

इ. ‘भारतीय संस्कृति : केंद्रबिंदू एवं तत्त्व क्या है ?’, या ग्रंथात ‘पूजा-पाठ करणे, ध्यान, योग, प्राणायाम, मंत्र-जप, तंत्र, आध्यात्मिक प्रवचन हे सर्व नेमके कशासाठी आहेत ? या सर्वांचा केंद्रबिंदू कोणता ? भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असण्यामागील नेमकी कारणे, भारतीय संस्कृती कशा प्रकारे जीवनाला स्थिरता देते ? केवळ भौतिक ज्ञान प्राप्त केल्याने होणारे तोटे’, यांसह अन्य विषयांचा परामर्ष करण्यात आला आहे.

ई. ‘संस्कृत-हिन्दी महत्त्वपूर्ण क्याें, प्रचार कैसे हो ?’, या ग्रंथात ‘संस्कृत भाषेतील विशेष गुण, या भाषेतील शब्दभांडार; हिंदी, तसेच अन्य भाषा यांचा प्रचार वाढण्यासाठीचे विविध उपाय, शुद्ध उच्चारांचे महत्त्व’, यांसह अन्य विषयांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे पू. डॉ. शिवकुमार ओझा

पू. डॉ. ओझा यांचे हे ग्रंथ म्हणजे धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांच्या अभ्यासकांसाठी देवाने दिलेली एक अनमोल देणगी आहे अन् हिंदु समाजासाठी तो एक अमूल्य ठेवा आहे. या ग्रंथांमधील ज्ञान म्हणजे हिंदु धर्मातील सर्व वाङ्मयाचे सार आहे; म्हणून या ग्रंथांना संदर्भ ग्रंथ म्हणणेच उचित ठरेल.

४. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, तर स्वभाषेविषयी प्रेम जागृत होईल !

अ. ‘न्यायदर्शन’ या ग्रंथाचे नावही बहुतेक अधिवक्त्यांना ठाऊक नसणे : हिंदूंमध्ये धर्माविषयी पुष्कळ अज्ञान आहे. सर्वाेच्च न्यायालयाने स्वत: ‘हिंदु धर्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे’, असे म्हटले आहे. याविषयी ठाऊक नव्हते, तर न्यायालयाने धर्मातील जाणकारांचे मत जाणून घ्यायला हवे होते.

अधिवक्त्यांनाही धर्माचे शिक्षण नाही. महर्षि गौतम यांनी रचलेल्या ‘न्यायदर्शन’ या ग्रंथात ‘खरा न्याय काय आहे ?’, याविषयी लिहिण्यात आले आहे. या ग्रंथाचा अभ्यास करणे, तर लांब राहिले, त्याचे नावही बहुतेक अधिवक्त्यांना ठाऊक नाही. आज ‘प्रमाणांवर आधारित निर्णय देणे’ अशीच न्यायाची व्याख्या केली जाते.

ज्ञानशक्तीद्वारे हिंदुत्वासाठी नि:पक्षपातीपणे कार्य करणारे
पू. डॉ. ओझा ‘हिंदु राष्ट्रा’चे ‘भारतरत्न’ आहेत !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

इतक्या वर्षांपर्यंत हिंदुत्वासाठी नि:पक्षपातीपणे कार्य करणारे पू. डॉ. ओझा ‘हिंदु राष्ट्रा’चे ‘भारतरत्न’ आहेत. आज अपात्र व्यक्तींना ‘भारतरत्न’ पुरस्कार दिला जातो. पू. डॉ. ओझाही त्यांच्याप्रमाणेच ‘भारतरत्न’साठी पात्र ठरू शकतात. वर्तमानकाळात समाजामध्ये विचारांचा तिरस्कार होत आहे. ‘विचारवंत’चा अर्थ आहे ‘ज्ञानशक्ती’. ज्ञानशक्ती ही क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती यांना कार्यान्वित करते. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रियाशक्तीच्या आधारावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; परंतु त्यांना त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या ज्ञानशक्तीचा आधार होता. विद्यारण्य स्वामींच्या ज्ञानशक्तीमुळे हरिहर आणि बुक्कराय या वीर बंधूंनी विजयनगरमध्ये हिंदु राज्य स्थापन केले. क्रियाशक्तीचे प्रतीक चंद्रगुप्त मौर्य आर्य चाणक्यांच्या ज्ञानशक्तीमुळे सर्वांत प्रथम सम्राट झाले. या उदाहरणावरून विचारांचे महत्त्व लक्षात येते. आज क्रियाशक्तीद्वारे कार्य करणारे अनेक आहेत; परंतु राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, तसेच संस्कृती संवर्धनासाठी ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे दुर्मिळ आहेत. असेच पू. डॉ. शिवकुमार ओझा ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करत आहेत !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आ. स्वभाषेचे ज्ञान नसल्यामुळे ज्ञानाचा स्तर घसरत आहे ! : आमच्या विद्वानांचा हिंदु धर्माचा अभ्यास नाही. त्यामुळे त्यांची विद्वत्ता न्यून झाली आहे. स्वभाषेत शिक्षण न घेतल्याने विद्यार्थ्यांना अल्प प्रमाणात ज्ञान मिळत असून त्यांचीही विद्वत्ता न्यून होत चालली आहे. स्वभाषेचे ज्ञान नसल्यामुळे ज्ञानाचा स्तर घसरत आहे. जीवनाशी संबंधित अनेक संस्कृत शब्दांचा अर्थ ठाऊक नसल्याने लोकांना जीवनाचा अर्थही कळत नाही. भारतीय भाषा बोलल्या, अभ्यासल्या जाऊ लागल्या, तर मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळून आमचा आत्मविश्वास वाढेल. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, तर स्वभाषेविषयी प्रेम जागृत होईल. भारतीय संस्कृती जर ‘आयआयटी मुंबई’मध्ये अभ्यासली जाऊ शकते, तर अन्य ठिकाणीही शिकवली जाऊ शकते. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, तर स्वत:विषयी आत्मविश्वास वाढेल. भाषा देशाची संस्कृती दर्शवते. स्वभाषेतील अक्षर आणि शब्द यांना अर्थ आहे. आजच्या पिढीला आधिभौतिक आणि आधिदैविक गोष्टींचे शिक्षण द्यायला हवे.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷