Masood Azhar : मीही मेलो असतो, तर बरे झाले असते ! – मसूद अझहर

जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरचे १० नातेवाईक ठार

नवी देहली – भारताच्या कारवाईत जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचे १० नातेवाइक आणि ४ जवळचे सहकारी आतंकवादी ठार झाले आहेत. बहावलपूर येथील जैशचे मुख्यालय असणार्‍या मरकज सुभान अल्ला मशिदीवर ४ क्षेपणास्त्रांद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात ते ठार झाले. याविषयी मसूद अझहर म्हटले, ‘माझी मोठी बहीण आणि तिचा पती, माझा पुतण्या आणि त्याची पत्नी, माझी भाची आणि तिची ५ मुले ठार झाली. तसेच जवळचे सहकारी ठार झाले. यात मीही मेला असतो, तर बरे झाले असते.’

(म्हणे) आम्ही माघार घेण्यास सिद्ध आहोत !

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तान स्वतःचे रक्षण करू शकतो; पण जर भारत थांबला, तर आम्हीही थांबू. जर भारत माघार घेण्यास सिद्ध असेल, तर आम्हीही कोणतीही कारवाई करणार नाही. पाकिस्तान शांततेचा प्रस्ताव देत आहे आणि तणाव वाढण्यापासून रोखत आहे.

अणूबाँबची धमकी देणार्‍या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी शेपटू घातले !- संपादकीय भूमिका

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा मृत्यू

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुरीदके येथील मरकझ तैयबावरील आक्रमणात लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर हाफिज अब्दुल मलिक मारला गेला. तो संघटनेच्या धोरणात्मक कारवायांशी संबंधित एक महत्त्वाचा भाग होता. तो बराच काळ सुरक्षायंत्रणाना हवा होता.

आक्रमणात २६ जण ठार, तर ४५ जण घायाळ ! – पाकचे सैन्य

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली आहेत. यात २६ जणांचा मृत्यू झाला, तर ४५ जण घायाळ झाले. पाकिस्तानी वायूदलाची सर्व विमाने आणि मालमत्ता सुरक्षित आहेत. दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांनी एकमेकांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले नाही. जेव्हा भारताने आक्रमण केले, तेव्हा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत ५७ आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि अनेक देशांतर्गत उड्डाणे होती. भारताने सहस्रो लोकांचे जीव धोक्यात घातले. भारताच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देत भारताच्या सैनिकी चौक्या नष्ट केल्या. तसेच ४ भारतीय लढाऊ विमाने आणि ड्रोन पाडण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

अहमद चौधरी म्हणाले की, भारताने नीलम-झेलम जलविद्युत् प्रकल्पाच्या नोसेरी धरणालाही लक्ष्य केले आहे आणि त्याची हानी केली. जलविद्युत् प्रकल्पावरील आक्रमण कधीही स्वीकारले जाणार नाही. अशा आक्रमणांमुळे दोन्ही देशांमध्ये मोठे संकट निर्माण होऊ शकते, अशी चेतावणी त्यांनी दिली.

(म्हणे) ‘भारतीय आक्रमणात अनेक नागरिक ठार झाले ! – पाक

संपादकीय भूमिका

भारताने जिहादी आतंकवाद्यांना ठार केले असतांना नागरिकांना ठार केल्याचा दावा करून पाक जगाला दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक भारतावर आरोप करत आहे, हे स्पष्ट आहे !

पाकिस्तानने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या राजनैतिक अधिकार्‍यांना बोलावून भारताने केलेल्या कारवाईवर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. भारतीय आक्रमणात अनेक नागरिक ठार झाले आहेत, तर महिला आणि मुले यांसह अनेक नागरिक घायाळ झाले आहेत. भारतीय राजदूतांना सांगण्यात आले की, भारताची आक्रमणे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहेत. पाकिस्तान भारताच्या या धमकीदायक वृत्तीला विरोध करतो. पाकिस्तान भारताला चेतावणी देतो की, अशा दायित्वशून्य वर्तनामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थिरता यांना गंभीर धोका निर्माण होतो.

(म्हणे) ‘भारताची सैनिकी कारवाई दुर्दैवी ! – चीन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारताच्या कारवाईवरून चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, भारताची सैनिकी कारवाई दुर्दैवी आहे. आम्हाला सध्याच्या परिस्थितीविषयी काळजी वाटते. चीन सर्व प्रकारच्या आतंकवादाला विरोध करतो. आम्ही दोन्ही पक्षांना शांतता आणि स्थैर्य यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. संयम बाळगा आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करू शकेल, अशी पावले उचलू नका.
तुर्कीयेचे परराष्ट्रमंत्री हकान फिदान यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांना दूरभाष करून तुर्कीये त्याच्या सोबत असल्याची भावना व्यक्त केली.

इस्रायलचा भारताला पाठिंबा

इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी ‘एक्स’वर लिहिले की, इस्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करतो. आतंकवाद्यांना हे ठाऊक असले पाहिजे की, निरपराध लोकांच्या विरुद्धच्या त्यांच्या जघन्य गुन्ह्यांपासून सुटण्यासाठी आता जागा उरलेली नाही.

शांततेचा मार्ग शोधा ! – संयुक्त अरब अमिरात

संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार उपपंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन झायेद अल् नाह्यान म्हणाले की, संकटे शांततेने सोडवण्यासाठी आणि शांततेचा मार्ग शोधण्यासाठी राजनैतिक कूटनीती आणि संवाद हे सर्वांत प्रभावी मार्ग आहेत.

दोन्ही बाजूंना संयम बाळगावा ! – रशिया

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाढत्या सैनिकी संघर्षाबद्दल आमचा देश चिंतेत आहे. परिस्थिती आणखी चिघळू नये; म्हणून आम्ही दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन करतो.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून सैन्याचे कौतुक

भारताने केलेल्या कारवाईनंतर केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक ७ मे या दिवशी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’साठी तिन्ही सैन्यदलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, हा नवा भारत आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सैन्याने अल्पावधीतच अचूक आक्रमण केले.

केंद्र सरकारने उद्या, ८ मे या दिवशी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

११ भारतीय विमानतळांवरील कामकाज बंद

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई आक्रमणाचा देशभरातील विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. ११ विमानतळांवरील कामकाज बंद करण्यात आले आहे. यामध्ये जम्मू, श्रीनगर, लेह, चंडीगड, धर्मशाला, अमृतसर, बिकानेर, जोधपूर, राजकोट, भुज आणि जामनगर विमानतळांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

मसूद अझहर याची ही इच्छा अल्ला लवकरच पूर्ण करणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !