नेपाळविषयी चुकीचे वार्तांकन : भारतीय वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घाला ! – नेपाळ प्रेस कौन्सिल

राजेशाहीच्या बाजूने चालू असलेल्या चळवळीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप !

काठमांडू – नेपाळविषयी चुकीचे वृत्तांकन केल्याचा आरोप करत नेपाळच्या ‘प्रेस कौन्सिल’ने भारतीय वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. यासह नेपाळमध्ये काम करणार्‍या भारतीय वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना दिलेली ओळखपत्रे तात्काळ रहित करण्यास सांगण्यात आले आहे. बंदी घालण्याची शिफारस करण्यात आलेल्या प्रसारमाध्यमांमध्ये आज तक, एबीपी, झी न्यूज, न्यूज १८, टीव्ही ९, एन्डीटीव्ही, रिपब्लिक भारत यांसारख्या भारतीय वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे, अशी माहिती नेपाळच्या ‘प्रेस कौन्सिल’चे अध्यक्ष बाळकृष्ण बसनेत यांनी दिली.

१. नेपाळच्या ‘प्रेस कौन्सिल’ने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या माहिती विभागाला एक निर्देशात्मक पत्र लिहून सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्यास सांगितले आहे.

२. या वृत्तवाहिन्यांवर देशाच्या लोकशाही आणि प्रजासत्ताक सरकारविरुद्ध बातम्या दाखवल्याचा आणि राजेशाहीच्या बाजूने चालू असलेल्या चळवळीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

  • देशातील घडामोडींचे सत्य वृत्तांकन पचनी न पडणारा नेपाळ !
  • छोटासा नेपाळ जर त्याच्या देशाच्या हिताविरुद्ध वार्तांकन केल्याचा आरोप करत भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी घालू शकतो, तर दिवस-रात्र भारतविरोधी बातम्या प्रसारित करणार्‍या बीबीसीसारख्या भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांवर भारत बंदी का घालू शकत नाही ?