पहलगाम आक्रमणानंतर देशात वर्ष १९७१ मधील बांगलादेशामधील युद्धासारखी स्थिती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ६ मे (वार्ता.) – पहलगाम आक्रमणानंतर देशात वर्ष १९७१ मधील बांगलादेशामधील युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. जर युद्ध झाले, तर जनतेला त्याविषयी संवेदनशील बनवण्याचा एक भाग म्हणून गोव्यात ७ मे या दिवशी मुरगाव बंदर, दाबोळी, वास्को आणि पणजी येथे आपत्कालीन सराव (मॉक ड्रिल) केला जाणार आहे. जनतेने याला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘एन्.सी.सी.’, ‘एन्.एस्.एस्.’, गृहरक्षक दल आणि ‘आपदा मित्र’ यांनी आपत्कालीन स्थितीत कशा प्रकारे काम करणे आवश्यक आहे, हे निश्चित करण्यासाठी ही सिद्धता आहे. आपत्कालीन सरावासंबंधी ६ मे या दिवशी केंद्रीय गृह सचिवांसमवेत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला मुख्य सचिव, गृह सचिव आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. राज्यात होणार्या आपत्कालीन सरावासंबंधी ६ मे या दिवशी सायंकाळपर्यंत आराखडा सिद्ध होणार आहे.’’
नागरिकांनी सूचनांचे पालन करावे !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘आपत्कालीन सरावाच्या वेळी रेडिओ, दूरदर्शन आदींद्वारे सूचना आणि संदेश दिले जाणार आहेत. या सूचनांचे पालन करणे हे नागरिकांचे दायित्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलत आहेत आणि त्यांना सर्वांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे.’’