
कोल्हापूर, ६ मे (वार्ता.) – आद्य शंकराचार्यांच्या २ सहस्र ५३३ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने करवीरपीठ येथे ७ ते १२ मे या कालावधीत विविध कार्यक्रम होत आहेत. यात जन्मकाळ, कीर्तन, रामायण, हवन, भक्तीगीते यांचा समावेश असून ११ मे या दिवशी पुरस्कार वितरण होणार आहे. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शन होणार आहे. १२ मे या दिवशी पीठाची पालखी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या भेटीला जाईल आणि शहराच्या प्रमुख मार्गांवरून जाऊन ती पुन्हा पीठात येईल, अशी माहिती करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सचिव श्री. शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.
श्री. शिवस्वरूप भेंडे म्हणाले, ‘‘यंदाच्या पुरस्कारांमध्ये वैदिक पुरस्कार वाराणसी येथील ईश्वर घनपाठी, सांस्कृतिक पुरस्कार भाग्यनगर येथील दोर्बल शमा, कीर्तनकार पुरस्कार धाराशिव येथील श्री. राघवेंद्र देशपांडे, स्थानिक वैदिक पुरस्कार कोल्हापूर येथील श्री. प्रसाद निगुडकर यांसह अन्य पुरस्कार देण्यात येणार असून हे पुरस्कार सकाळी १० वाजता मठात देण्यात येतील. १२ मे या दिवशी महाप्रसाद होणार असून कार्यक्रमांचा लाभ भक्तगणांनी घ्यावा.’’