पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात ६ मे या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अहिल्यानगर येथील चौंडी या त्यांच्या जन्मस्थानी मंत्रीमंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यातील मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी ५ सहस्र ५०३ कोटी ६९ लाख रुपयांचा मंदिर विकास आराखडा संमत करण्यात आला. यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अन्य मंत्री या वेळी उपस्थित होते.
मंदिर विकास आराखड्याच्या अंतर्गत अष्टविनायक गणपति मंदिरांच्या जिर्णाेद्धारासाठी १४७ कोटी ८१ लाख रुपये, श्री क्षेत्र तुळजाभवानीदेवी मंदिराच्या विकासासाठी १ सहस्र ८६५ कोटी रुपये, श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिराच्या विकासासाठी २५९ कोटी ५९ रुपये, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर २७५ कोटी रुपये, श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिरासाठी १ सहस्र ४४५ कोटी ९७ लाख रुपये, श्रीक्षेत्र माहुरगडाच्या विकासासाठी ८२९ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन आणि संवर्धन यांसाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपये संमत करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती !
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. मराठीसह विविध भाषांमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून ‘महाराष्ट्र चित्रपट महामंडळा’च्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती’ अभियान !
महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांविषयी समाजात संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी राज्यात आदिशक्ती अभियान राबवले जाणार आहे. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण अल्प असणे, मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती, लैंगिक-शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचारमुक्त समाजनिर्मिती, अनिष्ट रूढींचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यांसाठी या अभियानातून काम केले जाणार आहे. हे अभियान उत्कृष्टपणे राबवणार्या ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती’ पुरस्कार देण्यात येणार आहे. हे अभियान राबवण्यासाठी १० कोटी ५० लाख रुपये व्ययाला मान्यता देण्यात आली आहे.