
राष्ट्रीय संघटना कोणत्याही विशिष्ट बिंदूकडे धावत नसते. तिची गमन दिशा मात्र निश्चित ठरलेली असते. ‘बंदुकीची गोळी एकदम उडून जावी आणि तिने स्वतःचे जीवन संपवावे, तशी राष्ट्रीय संघटना नसते’, तर ती अखंड ज्योती स्वरूप असली पाहिजे. राष्ट्राच्या या समईत परिश्रमाचे तेल एकसारखे घालत ती सातत्याने जळत ठेवावी लागते. मग त्या कार्यात अनेक व्यक्तींचाच काय; पण पिढीच्या पिढींचा होम झाला, तरी चिंता नाही; कारण ही भावी पिढ्यांसाठी तजवीज असते.
राष्ट्रीय संघटना ही समाजापासून दूर सरलेल्या संन्याशांची किंवा पददलित बद्धांचीही असू शकत नाही, तर आपल्या ध्येयपथावर नीट अवधान राखून चालणार्या, अभ्युदयानंतर निःश्रेयाकडे जाणार्या सर्वसामान्य पथिकांची ती असली पाहिजे. केवळ एखाद दुसरा महापुरुष जन्माला येण्याने कोणतेही राष्ट्र उदयाला येत नाही. अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक निर्माण केल्याने मात्र राष्ट्राचा उर्जितकाळ निश्चित होऊ शकतो.
आता आमच्या या राष्ट्राला हुतात्मे नकोत, या अखंड राष्ट्रीय यज्ञात आपल्या भावना आणि कष्ट यांचा हविर्भाग सातत्याने, शिस्तीने, सूत्रबद्धतेने अर्पण करणारे ज्वलंत जीव हवे आहेत. हुतात्मे निर्माण होणे, हे कोणत्याही राष्ट्राला गौरवास्पद असले, तरी हुतात्म्यांची निर्मिती समाजाच्या दुर्बलत्वांतून होत असते, हेही विसरता येणार नाही. हुतात्मे होण्याच्या पात्रतेचे आणि सिद्धीचे अनेक राष्ट्रीय आत्मे जिवंत राखून ठेवणे आवश्यक असते. त्यांचे हवन केव्हा, कुठे आणि कसे करायचे, ते योग्य समयी योग्य ती माणसे ठरवतील. शक्ती खर्चण्याला वेळ लागत नाही, ते सोपे आहे. त्याची घाई नको. शक्तीसंचय करण्याला मात्र अनेक वर्षे आणि अनंत परिश्रम लागतात. त्या कार्याचा वेग वाढवला पाहिजे.
(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने,’ संचालक : अमरेंद्र गाडगीळ)