वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी दक्षता घ्यावी

मुंबई अग्नीशमन दलाचे आवाहन !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – तापमानात लक्षणीय वाढ होत असून विजेच्या उपकरणांवरही ताण येतो. परिणामी घर, कार्यालये आणि औद्योगिक परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी दक्षता घ्‍यावी, असे मुंबई अग्नीशमन दलाने सांगितले आहे. ‘सावधगिरी हाच सर्वोत्तम उपाय आहे’, हे लक्षात घेऊन नागरिकांनी दायित्वाने वागावे’, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित मुंबई अग्निशमन दलाने केले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्‍या अखत्‍यारितील अग्नीशमन सेवा, नागरिक सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालयाने नुकतेच यासंदर्भातील परिपत्रक प्रसारित केले आहे. या पार्श्वभूमीवर वरील आवाहन करण्यात आले.

मुंबई अग्नीशमन दलाने केलेल्या महत्त्वपूर्ण सूचना !

१. घरगुती आणि व्यावसायिक ठिकाणांवरील विजेची वायरिंग, प्लग, स्विच बोर्ड आणि उपकरणांची नियमित पडताळणी करावी.

२. वापरानंतर पंखे, वातानुकूलित यंत्र, दूरचित्रवाणी, मिक्सर, गीझर, इस्त्री इत्यादी उपकरणे त्वरित बंद करावीत.

३. जुन्या किंवा जीर्ण वायरिंगची आवश्यकता असल्यास तज्ञांच्या साहाय्याने दुरुस्ती करावी.

४. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी लागणारे सर्व मार्ग (जिने, प्रवेशद्वार) कायम मोकळे ठेवावेत.

५. एकाच प्लग सॉकेटमध्ये अनेक विद्युत् उपकरणे लावणे टाळावे. ओव्हरलोडिंग टाळून योग्य प्रकारे विद्युत उपकरणे वापरावीत.

६. वातानुकूलित यंत्रणेची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे.

७. घर, दुकान किंवा कार्यालय येथे एक ‘फायर एक्सटिंग्विशर’ ठेवावा आणि त्याचा वापर करणे शिकून घ्यावे.

८. रात्री झोपतांना भ्रमणभाष किंवा अन्य उपकरणे चालू ठेवणे टाळावे.

९. रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक्स यांनी आवश्यक ती अग्नीसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवून वेळेवर ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करणे बंधनकारक आहे.

१०. आग लागल्यास ‘१०१’ या क्रमांकावर संपर्क साधावा.