साधकांनो, आध्यात्मिक सोहळ्यांचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी पुढील प्रयत्न करा !

‘गुरुकृपेने साधकांना विविध आध्यात्मिक सोहळे अनुभवण्याची संधी मिळते. असे असले, तरी साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे, तसेच त्यांना ‘आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ करून घेण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायचे ?’, याचे ज्ञान नसल्याने साधक आध्यात्मिक सोहळ्यांचा सरासरी २० ते ३० टक्के एवढाच लाभ करून घेत आहेत. साधकांना आध्यात्मिक सोहळ्यांचा अधिक प्रमाणात लाभ करून घेता येण्यासाठी लाभदायक ठरणारी काही सूत्रे या लेखात दिली आहेत.

१. वृत्ती अंतर्मुख करण्यासाठी करायचे प्रयत्न

‘आध्यात्मिक सोहळ्याचा खरा लाभ करून घेणे, म्हणजे ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, म्हणजे सूक्ष्मातून येणारी अनुभूती अनुभवणे.’ आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी वृत्ती अंतर्मुख करणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी पुढील कृती कराव्यात.

अ. सोहळा बघतांना ‘शिकायला मिळालेली सूत्रे, चांगली फलनिष्पत्ती मिळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन किंवा रूपरेषा यांत अपेक्षित पालट करण्याविषयीची सूत्रे, स्वतःच्या आणि इतरांच्या लक्षात आलेल्या चुका’ इत्यादी सूत्रे वहीत लिहून ठेवावीत.

आ. सोहळ्याच्या वेळी अन्य साधकांशी अनावश्यक चर्चा किंवा संवाद करणे टाळावे.

इ. सोहळ्यात सेवा नसतांना अधिकाधिक नामजप करावा, तसेच अधूनमधून भावजागृतीचा प्रयोग आणि स्वयंसूचना सत्र करावे.

ई. सोहळ्यातील दोन सत्रांमधील विश्रांतीच्या कालावधीत डोळे मिटून अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा.

वरील सर्व कृतींमुळे मन आणि बुद्धी यांची क्रियाशीलता न्यून होते. त्यामुळे वृत्ती अंतर्मुख होण्यास साहाय्य होते. असे प्रयत्न केल्याने स्थुलातील गोष्टींसह सूक्ष्मातील अनुभूती घेणेही शक्य होते.

२. ‘सोहळ्यात सहभागी होणे’, हे तप असल्याची जाणीव ठेवणे

श्री. निषाद देशमुख

आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होतांना साधकांना कष्ट आणि संकटे भोगावी लागतात. अनेक वेळा स्थुलातील असुविधाही होते. इथे लक्षात घ्यायला हवे की, आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी केलेल्या छोट्या-मोठ्या प्रयत्नांमुळे साधकाची तपःसाधनाच होते आणि त्यामुळे तो साधक आध्यात्मिक अनुभूती घेण्यास अधिक पात्र होतो. परिणामी, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतल्याने साधकावर ईश्वराची कृपा अधिक प्रमाणात होते.

सोहळ्यात परिस्थितीशी जुळवून घेतांना आपल्याला थोडे त्रास भोगावे लागतात; पण ‘ते त्रास सर्वांनाच भोगावे लागणार असल्यास समष्टीचा विचार करून त्या त्रासांविषयी दायित्व असणार्‍या साधकांना सांगून त्यांचे साहाय्य घेणे’, हीसुद्धा साधनाच आहे. याचे एक उदाहरण म्हणजे, एखाद्या तरुण साधकाला बसायला आसंदी (खुर्ची) मिळाली नाही, तर त्याने खाली बसण्याच्या पर्यायाद्वारे परिस्थितीशी जुळवून घेतले, तर त्याची साधना होईल. याउलट एखादा वयस्कर साधक असेल किंवा एखाद्या साधकाला कमरेचा त्रास असेल, तर त्याच्यासाठी आसंदी मिळण्यासाठी दायित्व असणार्‍या साधकाला सांगितल्याने त्याची साधना होईल. थोडक्यात, आध्यात्मिक सोहळ्यात सहजतेने आणि डोळस भावाने सहभागी झाल्यास जिवाला त्याचा आनंद अनुभवता येईल.

३. इतरांसाठी बाधक न होणारे साधकत्व जोपासणे

एका संतांनी ‘साधक’ या शब्दाची पुढील व्याख्या केली आहे – ‘जो (साधना करणार्‍या इतरांना) बाधक होत नाही, तो साधक.’ थोडक्यात, जो साधना करणार्‍या इतरांना त्रास होईल अशी आपली स्वेच्छा त्यागून परेच्छा किंवा ईश्वरेच्छा स्वीकारून वागतो, तो साधक.

पूर्णवेळ साधना करणार्‍या काही युवा साधकांचे आई-वडील त्यांना साधनेत विरोध न करता साहाय्य करतात. ते आपल्या मुलांच्या साधनेत बाधक होत नाहीत. ते स्थुलातून साधनेचे विशेष प्रयत्न करतांना दिसत नाहीत; पण मुलांना पूर्णवेळ साधना करण्यास अनुमती दिल्याने आणि त्यांना साधनेत साहाय्य केल्याने त्यांच्या मनाचा त्याग होऊन मनोलय होतो अन् त्यांची आध्यात्मिक प्रगती होते.

आध्यात्मिक सोहळ्यात अनेक साधक भावनेच्या स्तरावर रहातात. त्यामुळे ते नकळत इतर साधकांसाठी बाधक होतात, उदा. वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार आयोजित ब्रह्मोत्सव सोहळा पूर्ण होऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले चारचाकी वाहनाने जात असतांना अकस्मात् काही साधकांनी स्वतःच्या मनाने ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ किंवा अन्य काही घोषणा देणे चालू केले. काही साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे रूप पहाण्याच्या माध्यमातून भावस्थिती अनुभवत होते. त्यांच्या भावस्थितीत अन्य साधकांच्या घोषणांमुळे खंड पडला. अशा प्रकारच्या कृतींमुळे साधकांना समष्टीला चैतन्यापासून वंचित करण्याचे कर्मफल भोगावे लागते. त्यामुळे साधकांनी अशा कृती प्रयत्नपूर्वक टाळाव्यात.

४. सात्त्विक इच्छांमुळे निर्माण होणार्‍या अहंचा त्याग करणे

अध्यात्मविश्वाच्या कोणत्याही टप्प्यावर साधकाला कशाचाही अधिकार नसतो, तर केवळ दायित्व असते. त्यामुळे ज्या वेळी साधक इच्छांच्या आहारी जातो, त्या वेळी त्याचे आचरण अहंयुक्त होऊ लागते. या आचरणाचा मनावर संस्कार झाल्यामुळे त्याची आध्यात्मिक अधोगती होऊ लागते. काही साधक मायिक इच्छांमध्ये अडकलेले नसले, तरी ते सात्त्विक इच्छांच्या आहारी जाऊन अहंयुक्त आचरण करतात, उदा. वर्ष २०२३ मधील ब्रह्मोत्सव सोहळा झाल्यानंतर उपस्थित साधकांनी सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ज्या रथावर विराजमान झाले होते, त्या रथाच्या खालची धूळ घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, तसेच उपस्थित संत आणि साधक यांना सोहळ्यानंतर रथाचे दर्शन घेण्यात अडचण निर्माण झाली. या प्रसंगी जरी साधकांची ‘गुरुचरणांची धूळ मिळावी’, अशी सात्त्विक इच्छा असली, तरी स्वतःच्या मनाने ठरवून ती धूळ मिळवण्यासाठी साधकांनी केलेली ती कृती चुकीची होती. थोडक्यात, आध्यात्मिक सोहळ्यात सात्त्विक इच्छांमुळे निर्माण होणार्‍या अहंचा त्याग केल्यास साधक भगवंताची कृपा मिळवून आध्यात्मिक उन्नती करू शकतात.

५. स्वतःच्या मनाप्रमाणे नव्हे, तर ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणे

अनेक साधकांच्या मनात ‘सोहळ्यातील विविध सेवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी’, असा विचार असतो. त्यामुळे ते उत्तरदायी साधकांकडे विविध सेवांची मागणी करतात किंवा स्वतःहून एखाद्या सेवेत सहभागी होऊन इतर साधकांना त्या सेवेविषयी विविध सूत्रे सुचवतात. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होऊन एकूण कार्यक्रमाच्या फलनिष्पत्तीवर परिणाम होऊ शकतो.

साधना म्हणजे स्वेच्छेकडून परेच्छेकडे आणि पुढे ईश्वरेच्छेकडे जाणे. त्यामुळे ‘स्वतःच्या मनाप्रमाणे व्हावे’ किंवा ‘सेवेची संधी मिळावी’, अशा अपेक्षांचाही त्याग करणे साधकांसाठी श्रेयस्कर आहे. तसेच ‘दिसेल ते कर्तव्य’, म्हणजे ‘माझ्याकडे विशिष्ट सेवाचे दायित्व नसले, तरी ‘मी देवाचा दास असल्याने त्याची प्रत्येक सेवा करणे, ही माझी साधनाच आहे’, या भावाने ज्या ठिकाणी सेवेची आवश्यकता आहे, तिथे उत्तरदायी साधकांना विचारून सेवा करण्याचा प्रयत्न करणे’, हे साधकांसाठी श्रेयस्कर आहे.

६. कर्म, वाणी आणि मन यांनी सकारात्मक रहाणे

गुरुगीतेमध्ये सांगितले आहे,
कर्मणा मनसा वाचा नित्यमाराधयेद्गुरुम् ।
दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ ।। – गुरुगीता, श्लोक २८

अर्थ : कर्म, मन आणि वाणी यांनी गुरूंची नित्य आराधना करावी. गुरूंना साष्टांग नमस्कार करून आणि निर्लज्ज होऊन (कोणत्याही प्रकारची लाज मनात न बाळगता) गुरूंच्या समवेत रहावे.

ईश्वराची शक्ती आपल्या षट्कोषांतून (टीप) प्रवास करून शेवटी सातव्या कोषाकडे, म्हणजे लिंगदेहाकडे जाते.

टीप – षट्कोष : अन्नमयकोष, प्राणमयकोष, वासनामयकोष (मन), मनोमयकोष (चित्त), ज्ञानमयकोष (बुद्धी) आणि विज्ञानमयकोष (अहं)

ईश्वराची शक्ती लिंगदेहाकडे गेल्यावर त्याला अनुभूती येते. षट्कोष सकारात्मक नसतील, तर ईश्वरी शक्तीला लिंगदेहाकडे जाण्यात अडथळा येतो. यासाठी गुरुगीतेमध्ये शरीर (सत्सेवा), मन (भक्ती) आणि वाणी (नामजप) यांतून आराधना करायला सांगितले आहे. सत्सेवेमुळे साधना होऊन सात्त्विकता वाढते. भक्तीमुळे मन शुद्ध होते आणि नामजपामुळे मन अन् बुद्धी यांचा लय होऊन देवाला आणि गुरूंना शरण जाता येते. अशा प्रकारे षट्कोष श्री गुरूंना शरण जातात. षट्कोष जेवढे शरणागतभावात रहातील, तेवढे ते सकारात्मक होतात आणि तेवढ्या प्रमाणात शिष्याला गुरुतत्त्वाचा आशीर्वाद असल्याची अनुभूती घेता येते.

गुरु ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचा अथांग सागर आहेत. ‘या सागराशी काही क्षण का होईना; पण एकरूप होण्यासाठी साधक करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळावे’, अशी श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी वेळा प्रार्थना !’

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०२३)