‘कागवाड येथील पटवर्धन सरकार कुटुंबियांची जागृत उपास्यदेवता श्री मांदार गणेशाच्या मंदिराची स्थापना शके १९७७ (इ.स. १८५५) मध्ये झाली. वर्ष २०१५ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला. जुनी मूर्ती भंग झाल्यामुळे तिच्या जागी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून मंदिरावर कळसारोहण करण्याचा समारंभ १९ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत झाला. श्री गुरूंच्या आज्ञेने सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले यांनी या धार्मिक विधींचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून केलेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे. श्री मांदार गणेशाची भंग झालेली मूर्ती आणि श्री मांदार गणेशाची नूतन मूर्ती यांची छायाचित्रे पाहून हे सूक्ष्म परीक्षण करण्यात आले. तेव्हा त्यांना आलेल्या विविध अनुभूतीही सूक्ष्म परीक्षणाच्या प्रत्येक सूत्राखाली लिहिल्या आहेत.


१. देवघरात आणि देवळात मूर्ती स्थापन करण्याचे महत्त्व
मनुष्याला पृथ्वीवर राहून देवलोकातील देवतांची उपासना करण्यात सुलभता येण्यासाठी पृथ्वीवर संबंधित देवतेच्या रूपाशी साधर्म्य असणार्या मूर्तींची निर्मिती झाली. मूर्ती लहान असेल, तर तिची स्थापना घरातील देवघरात आणि मोठी असेल, तर देवळात स्थापना करण्याची प्रथा आहे. त्यामुळे व्यष्टी स्तरावर देवघरातील देवतेची मूर्ती आणि समष्टी स्तरावर देवळातील देवतेची मूर्ती यांच्या उपासनेची परंपरा सत्ययुगापासून चालू झाली. त्यामुळे भाविकांना संबंधित देवतांची उपासना चांगल्या प्रकारे करता येऊन त्यांना ऐहिक (मायेशी संबंधित आणि सकाम) आणि पारमार्थिक (आध्यात्मिक स्वरूपाच्या आणि निष्काम) स्तरांवरील अनुभूती येऊ लागल्या. त्यामुळे भाविकांनी सलग अनेक वर्षे देवतांची उपासना केल्यामुळे त्यांना ‘सलोक, समीप, सरूप, सार्ष्टि आणि सायुज्य’ (टीप १) या विविध प्रकारच्या मुक्ती प्राप्त होऊन त्यांची वाटचाल मोक्षप्राप्तीच्या दिशेने चालू झाली.
(टीप १ – ‘सलोक, समीप, सरूप, सार्ष्टि आणि सायुज्य’ मुक्ती
१. सलोक मुक्ती : ब्रह्मांडामध्ये उपासकाचा देव ज्या सूक्ष्म लोकात वास करतो, त्या लोकात त्याला रहाण्यास मिळते.
२. उपासकाला उपास्यदेवतेच्या लोकात जवळ रहाण्याची संधी त्याला मिळते. याला ‘समीप मुक्ती’ म्हणतात.
३. उपासकाच्या देवाप्रमाणे उपासकाला रूप प्राप्त होते. याला ‘सरूप मुक्ती’ असे म्हणतात.
४. उपासकाला उपास्यदेवतेचे गुण आणि आध्यात्मिक ऐश्वर्य प्राप्त होते. त्यामुळे याला ‘सार्ष्टि मुक्ती’ असे म्हणतात.
५. उपासक त्याच्या उपास्यदेवतेच्या सगुण रूपाशी एकरूप होतो. याला ‘सायुज्य मुक्ती’ असे म्हणतात.)
१ अ. वरील सूत्राचे टंकलेखन करत असतांना साधिकेला आलेली अनुभूती : ‘जेव्हा भाविक श्री गणेशाच्या देवळातील श्री गणेशाच्या मूर्तीचे दर्शन भावपूर्णरित्या घेत असतो, तेव्हा मूर्तीतून प्रक्षेपित होणारे संबंधित देवतेचे तत्त्व भाविकाच्या दिशेने आकृष्ट होऊन ते त्याच्या हृदयात जाते’, असे मला जाणवते.
२. देवतेची मूर्ती अखंड असण्याचे महत्त्व
कोणत्याही देवतेची मूर्ती साकारत असतांना त्या देवतेच्या रूपाशी तंतोतंत जुळणार्या अखंड मूर्तीची निर्मिती करणे आवश्यक असते, तरच संबंधित देवतेच्या सूक्ष्म लोकात कार्यरत असलेले देवतेचे तत्त्व त्याच्या स्वरूपाशी जुळणार्या पृथ्वीवरील देवतेच्या मूर्तीत येऊ शकते. त्यामुळे अशा देवतांच्या मूर्तींची स्थापना केल्यावर त्याचा अधिकाधिक लाभ उपासकाला होतो.
२ अ. वरील सूत्राचे टंकलेखन करत असतांना साधिकेला आलेली अनुभूती : श्री गणेशाच्या पूर्णाकृती मूर्तीकडे श्री गणेशलोकातून प्रक्षेपित होणारे श्री गणेशाचे तत्त्व अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट होऊन ते श्री गणेशाच्या मूर्तीमध्ये कार्यरत झाले. त्यामुळे मूर्ती तेजःपुंज दिसू लागली.
३. देवतेची मूर्ती भंग झाल्यामुळे सूक्ष्म स्तरावर होणारे परिणाम आणि भंग झालेल्या देवतेच्या मूर्तीच्या ठिकाणी नवीन मूर्ती स्थापन करण्याचे महत्त्व
जेव्हा देवतेची मूर्ती अखंड असते, तेव्हा ती सात्त्विक आणि परिपूर्ण असते. त्यामुळे अशा अखंड असणार्या देवतेच्या मूर्तीमध्ये देवतेचे तत्त्व अधिकाधिक प्रमाणात येऊन ते वायूमंडलात अधिकाधिक प्रमाणात प्रक्षेपित होऊन स्थान, क्षेत्र आणि पृथ्वीचे वायूमंडल यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सतत चालू रहाते. जेव्हा एखाद्या देवतेची मूर्ती भंग होते, तेव्हा तिचे अखंडत्व संपते. त्यामुळे अशा मूर्तीची आकृती बिघडून तिचे रूपांतर विकृतीमध्ये होते. जेथे विकृत आकृती असते, तेथून चांगली स्पंदने न येता त्रासदायक स्पंदने येऊ लागतात. त्यामुळे हिंदु धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, ‘देवतेची मूर्ती भंग झाली, तर ती पाण्यात विसर्जित करावी आणि तिच्या ठिकाणी नवीन अखंड मूर्ती विधीवत स्थापन करावी.’ यावरून पूर्वीच्या काळी भंग झालेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित करून त्या ठिकाणी देवतेची नवीन मूर्ती स्थापन करत, याचे महत्त्व लक्षात येते.
३ अ. वरील सूत्राचे टंकलेखन करत असतांना साधिकेला आलेली अनुभूती : भंग झालेल्या मूर्तीकडे पाहिल्यावर श्री गणेशाच्या दर्शनातील अपूर्णत्वाची जाणीव होऊन ‘मूर्तीकडे पाहू नये’, असे वाटले, तसेच तिच्या ठिकाणी स्थापित होणार्या नवीन मूर्तीकडे पाहिल्यावर ‘तिच्याकडे पहातच रहावे’, असे वाटले.
नवीन मूर्तीच्या प्रतिष्ठापनेमध्ये विविध धार्मिक विधींसह देवतेच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढल्याने देवतेचे तत्त्व समष्टी स्तरावर कार्यरत होणे

जेव्हा देवतेच्या मूर्तीचा संपर्क एखाद्या भाविकाशी येतो, तेव्हा देवतेचे तत्त्व व्यष्टी स्तरावर कार्यरत होते. जेव्हा देवतेच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढली जाते, तेव्हा देवतेचे दर्शन अनेक भाविकांना झाल्यामुळे देवतेचे तत्त्व समष्टी स्तरावर कार्यरत होते.
अ. वरील सूत्राचे टंकलेखन करत असतांना साधिकेला आलेली अनुभूती : गावातील भाविकांनी श्री गणेशाच्या मनोहारी मूर्तीचे दर्शन घेतल्यामुळे सर्वांच्या मनात गावात श्री मांदार गणेशाच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होऊन तिची लवकरात लवकर स्थापना होण्याचा एकच विचार प्रबळ झाला. भाविकांच्या मनातील श्री गणेशाप्रतीचा भाव जागृत झाला. भाविकांमधील हा समष्टी भाव पाहून श्री गणेश भाविकांवर प्रसन्न झाला. त्यामुळे श्री मांदार गणेशाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना होण्यापूर्वीच ५ टक्के गणेशतत्त्व आकृष्ट होऊन कार्यरत झाले. यावरून ‘देवाप्रतीच्या भक्तांच्या एकवटलेल्या भावाचे रूपांतर जेव्हा समष्टी भावात होते, तेव्हा देवतेचे तत्त्व कसे कार्यरत होते !’, हे सूत्र अनुभवण्यास मिळाले.
– सुश्री मधुरा भोसले
४. जुन्या मूर्तीतून नवीन मूर्तीमध्ये देवतेचे प्राण संक्रमित होण्याची प्रक्रिया आणि महत्त्व
हिंदु धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे की, ‘देवतेची जुनी मूर्ती भंग झाली असेल, तर तिच्यातील प्राण ‘संपात’ नावाच्या कलशातील (‘संपात’ कलश म्हणजे पाण्याने भरलेला आणि यज्ञकुंडाजवळ ठेवलेला एक संस्कारित कलश) जलामध्ये काढून घ्यावेत आणि नंतर या कलशातील प्राण दर्भाच्या कुर्चाने (दर्भांचा गुच्छ केलेल्या लहानच्या काटकीने) कलशातून नवीन मूर्तीला जलाचा स्पर्श करून तिच्यामध्ये संक्रमित करावे. याला ‘तत्त्व धारणा’ असेही म्हणतात. या प्रक्रियेमध्ये प्राणप्रतिष्ठापनेशी संबंधित असणारा संकल्प महत्त्वाचा असतो. त्यामुळे एका मूर्तीतील प्राण दुसर्या मूर्तीमध्ये संक्रमित होण्याची प्रक्रिया चालू होते. या मुख्य संकल्पाला या धार्मिक विधीशी संबंधित असणारे मंत्र हे आकाशतत्त्वाच्या स्तरावर, तर अन्य धार्मिक उपविधी हे पृथ्वी अन् आप या स्तरांवर, तर संबंधित देवतेचा यज्ञ हा तेजतत्त्वाच्या स्तरावर साहाय्यक असतात.
४ अ. वरील सूत्राचे टंकलेखन करत असतांना साधिकेला आलेली अनुभूती : भंग झालेल्या जुन्या मूर्तीच्या हृदयस्थानी असणारी लालसर केशरी रंगाची प्राणज्योत तिच्यातून निघून नवीन मूर्तीच्या हृदयात स्थित होतांनाचे सूक्ष्म दृश्य दिसले.
५. देवळात प्राणप्रतिष्ठापना केलेल्या नवीन मूर्तीची स्थापना करण्याचे महत्त्व
देवतेच्या मूर्तीमध्ये प्राण हे चैतन्याच्या स्तरावर कार्यरत होतात. हे चैतन्य जलातून आपतत्त्वाच्या स्तरावर तत्त्वलहरींच्या स्वरूपात मूर्तीमध्ये प्रविष्ट होते. त्यानंतर देवतेच्या मूर्तीमध्ये तेजतत्त्वाच्या स्तरावर दिव्य ज्योत प्रज्वलित होते आणि त्यानंतर मूर्तीमध्ये जेव्हा वायूतत्त्वाच्या स्तरावरील प्राण प्रविष्ट होऊन कार्यरत होतो, तेव्हा देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेची सूक्ष्मातील प्रक्रिया पूर्ण होते.
५ अ. वरील सूत्राचे टंकलेखन करत असतांना साधिकेला आलेली अनुभूती : प्राणप्रतिष्ठापना केलेल्या नवीन मूर्तीच्या चित्राकडे पाहिल्यावर तिच्यामध्ये साक्षात् श्री मांदार गणेशाचे दर्शन होऊन माझा भाव जागृत झाला.
६. देवळावर कळस स्थापन करण्याचे महत्त्व !
देवळातील गाभार्यात स्थापन केलेल्या देवतेच्या मूर्तीमध्ये केवळ प्राण येऊन उपयोगी नसते, तर तिच्याकडे संबंधित देवतेच्या सूक्ष्म लोकातून त्या देवतेच्या चैतन्यदायी तत्त्वलहरींचा अखंड प्रवाह येणे आवश्यक असते. त्यासाठी देवळातील गाभार्यात देवतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यावर त्या देवळातील शिखरावर धातूच्या कळसाची स्थापना करणे आवश्यक असते. संबंधित देवतेच्या उच्च लोकामध्ये कार्यरत असणार्या देवतेच्या तत्त्वलहरी या अभिमंत्रित कळसाकडे आकृष्ट होऊन त्या देवलोकातून पृथ्वीवरील संबंधित देवतेच्या मंदिराच्या शिखराकडे येऊ लागतात. त्यानंतर त्या कळसामध्ये प्रवेश करून कळसाच्या बरोबर खाली असणार्या गाभार्यातील मूर्तीमध्ये आकृष्ट होऊन त्या मूर्तीमध्ये घनीभूत होऊन कार्यरत होतात. त्यामुळे देवळातील मूर्तीकडे चैतन्याचा प्रवाह सातत्याने चालू राहून देवतेच्या मूर्तीमध्ये संबंधित देवतेचे तत्त्व सतत कार्यरत रहाते. अशा प्रकारे देवतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यावर त्या मंदिरावर कळस स्थापन केल्यामुळे त्या देवळातील देवतेची मूर्ती अखंड जागृत रहाते. ‘यालाच देवता जागृत असणे’, असे म्हणतात.
६ अ. वरील सूत्राचे टंकलेखन करत असतांना साधिकेला आलेली अनुभूती : मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर तिच्यामध्ये श्री गणेशाचे सगुण तत्त्व कार्यरत झाले होते. जेव्हा त्याच्या मंदिरावर कळस उभारण्यात आला, तेव्हा श्री गणेशलोकातून प्रक्षेपित होणार्या निर्गुण-सगुण स्तरावरील श्री गणेशाच्या लहरी मूर्तीकडे अधिक प्रमाणात आकृष्ट झाल्यामुळे श्री मांदार गणेशाची नूतन मूर्ती सजीव होऊन ती दिव्य तेजामुळे दिप्तीमान झाल्याचे जाणवले. तेव्हा ‘श्री मांदार गणेश प्रसन्नतेने हसून मला आशीर्वाद देत आहे’, असे जाणवले.’ (क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/911315.html
|