पाक खोटे कथानक रचत असल्याचा केला आरोप
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावावरून बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीला १५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही चर्चा सुमारे दीड घंटे चालली. बैठकीनंतर सुरक्षा परिषदेने कोणतेही अधिकृत निवेदन प्रसारित केलेले नाही किंवा बैठकीत कोणताही ठराव संमत करण्यात आला नाही. उलट परिषदेतील सदस्यांनी पाकला फटकारले. त्यांनी पाक खोटे कथानक रचत असल्याचा आरोप केला. या बैठकीतून बाहेर पडतांना रशियाच्या राजनैतिक अधिकार्याने सांगितले की, आम्हाला आशा आहे की, तणाव अल्प होईल.
या बैठकीत सदस्य देशांनी पाकिस्तानला विचारले की, लष्कर-ए-तोयबाचा यात सहभाग असण्याची शक्यता आहे का ? तसेच या वेळी आतंकवादी आक्रमणाचा व्यापक निषेध करण्यात आला. काही सदस्यांनी विशेषतः पर्यटकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारावर लक्ष्य करण्याचे सूत्र उपस्थित केले. अनेक सदस्यांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचण्या आणि अणूयुद्धाची विधाने, ही सूत्रे चिथावणीखोर असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. यामुळे परिस्थितीचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्नही अयशस्वी झाले. या बैठकीत भारतासोबत द्विपक्षीयपणे चर्चा करण्याचा सल्ला देण्यात आला.
भारत आणि पाक यांच्यातील संबंध धोकादायक टप्प्यावर ! – अँटोनियो गुटेरेस

या बंद दाराआड झालेल्या बैठकीच्या काही घंटे आधी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी एका निवेदनात म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव शिगेला पोचला आहे. मी दोन्ही देशांच्या सरकारांचा आणि नागरिकांचा आदर करतो अन् संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत दोघांच्याही योगदानाबद्दल कृतज्ञ आहे. अशा परिस्थितीत, त्यांचे परस्पर संबंध इतक्या धोकादायक टप्प्यावर पोचले आहेत हे पाहून मला दुःख होत आहे.
संपादकीय भूमिकाअशा फटकारण्याचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. त्याला जी भाषा समजते, त्याच भाषेत त्याला समजावणे आवश्यक आहे ! |