मंदिर समितीने सीसीटीव्ही बसवणे आणि ‘बॅरिकेडींग’ करणे या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे पोलिसांचे म्हणणे

शिरगाव (गोवा) येथील श्री लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी झाल्याचे प्रकरण

(‘बॅरिकेड’ म्हणजे रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात निर्माण केलेला अडथळा)

पणजी, ५ मे (वार्ता.) – शिरगाव, गोवा येथील श्री लईराईदेवीच्या जत्रेच्या पूर्वी मंदिर समितीची सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांसमवेत बैठक झाली होती. या बैठकीत पोलिसांनी जत्रेच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ बसवण्यासाठी आणि गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी योजना आखण्याची सूचना केली होती; मात्र मंदिराच्या अध्यक्षांनी ‘वेळेचा अभाव आणि ‘बॅरिकेड’ घातल्याने यापूर्वी दुर्घटना घडल्याचे कारण सांगून पोलिसांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले. पोलीस सूत्रांनी मंदिर समितीच्या सोबत झालेल्या बैठकीतील सूत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे. शिरगाव येथील जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत

६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७० जण घायाळ झाले आहेत. 

पोलिसांनी बैठकीत सांगितले की, पोलिसांची मंदिर समितीसमवेत जत्रेच्या २ दिवस आधी, म्हणजेच ३० एप्रिल या दिवशी बैठक झाली होती. या वेळी भाविकांनी प्रवेश करण्याचे आणि बाहेर जाण्याचे ठिकाण, तसेच ‘होमकुंडा’च्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची, त्याचप्रमाणे जत्रेच्या ठिकाणी सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष उभारण्याची विशेष सूचना केली होती. यासाठी समितीला साहाय्यासाठी पोलीस कर्मचारी देण्याचे बैठकीत ठरले होते. जत्रेत ठिकठिकाणी ‘बॅरिकेड’ उभे करून भाविकांच्या रांगा लावण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यास समितीला सांगितले होते. या बैठकीला उत्तर गोव्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी, उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर, मंदिर समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर आणि इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.

दिनानाथ गावकर म्हणाले, ‘‘सीसीटीव्ही बसवण्यास किमान १० ते १५ दिवसांचा कालावधी हवा होता.’’ मंदिर समितीने ही माहिती शासनाने नेमलेल्या सत्यशोधन समितीला दिली आहे.