डिचोली – राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी ४ मे या दिवशी शिरगाव जत्रोत्सवात चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली होती आणि या वेळी कुटुंबियांनी राज्यपालांना चेंगराचेंगरीच्या घटनेविषयी उपयुक्त अशी माहिती दिली आहे. या माहितीचा एक अहवाल केंद्र सरकारला पाठवणार असल्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी सांगितले आहे. ‘या अहवालाच्या आधारे केंद्र सरकार चेंगराचेंगरीत घायाळ झालेले किंवा मृत पावलेले यांचे कुटुंबीय यांच्या साहाय्यात वाढ करू शकते, असे राज्यपालांनी सांगितले.
जत्रोत्सवात महिलेचा विनयभंग केल्यावर तिने प्रत्युत्तर दिल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित
शिरगाव जत्रोत्सवात काही महिलांचा विनयभंग केल्याची माहिती मनाली शिरोडकर या महिलेने दिली आहे. मनाली शिरोडकर यांनी याविषयी एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केला आहे. मनाली शिरोडकर व्हिडिओत म्हणतात, ‘‘जत्रोत्सवात काही स्थानिक आणि गावाबाहेरील लोक यांचा एक गट महिलांचा विनयभंग करत होता. हा गट महिलांना अयोग्य पद्धतीने स्पर्श करत होता. या गटातील एक सदस्य माझ्याजवळ येऊन मला अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतांना मी त्याच्या थोबाडीत मारली. त्यानंतर तो तेथून पळून गेला. (या युवकांचे वर्तन हिंदु धर्माला काळीमा फासणारे आहे. अशा युवकांना शोधून पुढच्या वेळी त्यांना जत्रोत्सवात सहभागी होण्यापासून रोखले पाहिजे ! – संपादक) जत्रोत्सवात असे प्रकार होऊ नयेत, याविषयी कुणीही काही बोलत नसल्याने अशा लोकांचे फावते.’’ यासाठी जत्रोत्सवात महिला आणि पुरुष यांच्यासाठी निराळ्या रांगा करणे, सुरक्षेत वाढ करणे आणि ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.