ठाणे येथे दांपत्यास धमकावून पैसे उकळणारे ३ पोलीस निलंबित

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – येथील मासुंदा तलाव परिसरात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास जेवण्यासाठी आलेल्या दांपत्यास धमकावून त्यांच्याकडून पोलिसांनी ५० सहस्र रुपये उकळले. याची गंभीर नोंद घेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने ठाणे अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) श्रीकांत पाठक यांनी पोलीस शिपाई जयेश आंबिकर, राकेश कुंटे आणि महिला पोलीस शिपाई सोनाली मराठे यांना निलंबित केले आहे.

१. ३० एप्रिलच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठांची अनुमती न घेता संबंधित पोलीस हे आयुक्तांचे एस्कॉट वाहन घेऊन मासुंदा तलाव येथे आले. तिथे जेवणासाठी आलेल्या मुंबईतील एका विवाहित दांपत्याला त्यांनी धमकावले.

२. त्यांना पांढर्‍या स्कॉर्पिओमध्ये बसवून ‘इकडे लफडे करायला मुलीला घेऊन येतो का ? तुझ्या आई-वडिलांचा संपर्क क्रमांक दे’, असे सांगत यातील पुरुषाला मारहाण केली. त्यांच्यावर कारवाई करू नये, यासाठी पुरुषाकडून ४० सहस्र ५०० रुपये एका व्यक्तीला ऑनलाईन पाठवायला सांगितले, तर त्यांच्या पत्नीला मीनाताई ठाकरे चौक येथील ए.टी.एम्.मधून पैसे काढून देण्यास सांगितले.

३. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पैसे खासगी व्यक्तीला गेले; मात्र पैसे घेणारे हे पोलीस असल्याचे आढळले.

४. या माहितीच्या आधारे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी नौपाडा पोलिसांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्याच चौकशीच्या आधारे या तिघांनाही गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर कृत्य केल्याच्या, तसेच पोलीस दलाच्या शिस्तीस बाधा आणणारे कृत्य करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचे स्पष्ट झाले.

संपादकीय भूमिका :

  • स्वत:च्या खात्यातील गुन्हेगारी कृत्ये करणारे ठाऊक नसणारे पोलीस राज्यातील गुन्हेगारी शोधून काढू शकतील का ?
  • जनतेचे रक्षक नव्हे, भक्षक झालेल्या पोलिसांचे निलंबन नव्हे, तर त्यांना बडतर्फच करायला हवे !