पुरंदर (पुणे) विमानतळासाठी भूसंपादन होणार्‍या गावांमध्ये तणावपूर्ण शांतता !

आंदोलकांवर गुन्हे नोंद केल्याने आंदोलकांमध्ये अप्रसन्नता

प्रतिकात्मक चित्र

जेजुरी (पुणे) – पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी भूमीचे ‘ड्रोन सर्वेक्षण’ करण्यासाठी एखतपूर येथे गेलेले अधिकारी आणि पोलीस यांच्या समवेत आंदोलकांनी धक्काबुक्की, दगडफेक केली होती. आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केल्याने आंदोलकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलनाच्या वेळी चित्रीकरण करण्यात आले असून ते चित्रीकरण पाहून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणार्‍या गावांमध्ये तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे.

पुरंदर तालुक्यातील ७ गावांमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी भूमीचे सर्वेक्षण करण्यासाठी ‘ड्रोन’चे साहाय्य घेण्यात येत आहे. भूमीचे सर्वेक्षण एखतपूर येथे ३ मे या दिवशी होत होते. त्या वेळी आंदोलकांनी अधिकार्‍यांचा रस्ता अडवला. पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करून आंदोलकांवर लाठीमार केला. यात काही आंदोलक घायाळ झाले. दगडफेकीमध्ये ३ पोलीस अधिकारी आणि १३ पोलीस अंमलदार घायाळ झाले होते. सासवड पोलिसांनी ४ आंदोलकांना कह्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे नोंद केले. ‘अटक केलेल्या आंदोलकांना सोडा’ यासाठी आंदोलकांनी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी अटक केलेल्यांना पोलीस कोठडीत ठेवले, तसेच २५० ते ३०० अज्ञात व्यक्तींवर गुन्हे नोंद केल्याने गावांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.