श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव

आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या तिसर्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आळंदीला भेट देऊन माऊलींचे दर्शन घेतले. या वेळी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने ज्ञानभूमी प्रकल्पाची माहिती सादर केली. सुमारे ४५० एकर जागेत साकारणारा हा प्रकल्प अनेक अर्थांनी नाविन्यपूर्ण असून, वारकर्यांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल. या प्रकल्पासाठी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करू. पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल सिद्ध करून इंद्रायणी नदीला प्रदूषणमुक्त करू, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. आळंदी येथे चालू असलेल्या या भव्य सोहळ्यामध्ये सहस्रो भाविकांची उपस्थिती असून वातावरण भक्तीमय झाले आहे.
या प्रसंगी आळंदी देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार केला. या प्रसंगी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.