
पुणे – सध्याच्या काळात ‘मी’पणा वाढला असून ‘आम्ही’चे महत्त्व अल्प होत आहे. याचा परिपाक समाजामध्ये आजारपण वाढण्यात होत असून माणसाचे समाधान हरपत आहे, अशी खंत महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापिठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी व्यक्त केली. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. स्वाती भावेलिखित ‘अनुभवातून अनुभूती’ या पुस्तकाचे प्रकाशन माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. सनदी लेखापाल सुरेश रानडे, पुस्तकाच्या सहलेखिका अंजली दुरुगकर, ग्रंथालीच्या डॉ. लतिका भानुशाली आणि यशवंत भावे या वेळी उपस्थित होते.
कानिटकर यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवर आधारित लेखन करण्याचा सल्ला मला डॉ. किरण बेदी यांनी दिला होता; पण माझ्याकडे वेळ नसल्याने पती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. राजीव यांनी माझ्याविषयी आणि आमच्या सहजीवनाविषयी लेखन केले आहे.