‘मुसलमान आणि काश्मिरी यांना लक्ष्य करू नये’, असे केले होते आवाहन !
नवी देहली – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात भारतीय नौदलातील अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला होता. या घटनेच्या वेळी त्यांची पत्नी हिमांशीही त्यांच्या समवेत होती. या घटनेनंतर हिमांशी त्यांनी भारतियांना आवाहन केले होते की, ‘मुसलमान आणि काश्मिरी यांना लक्ष्य करू नका.’ यावरून त्यांच्यावर सामाजिक माध्यमांत आता टीका केली जात आहे. यामुळे हिमांशी यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महिला आयोगाने एक निवेदन प्रसारित करत ‘कोणत्याही महिलेवर तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या आधारे टीका करणे चुकीचे आहे’, असे म्हटले आहे.
विनय नरवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १ मे या दिवशी त्यांच्या कुटुंबियांनी कर्नाल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. या वेळी हिमांशी यांना काही राज्यांमध्ये काश्मिरींना लक्ष्य केले जात असल्यावरून पत्रकरांनी प्रश्न विचारला होता. त्यावर हिमांशी यांनी म्हटले की, आम्हाला हिंदु आणि मुसलमान यांच्या नावाखाली द्वेष पसरवायचा नाही. आम्हाला ‘लोक मुसलमान आणि काश्मिरी यांच्या विरोधात जावेत’, असे अजिबात वाटत नाही. आम्हाला हे नको आहे. आम्ही केवळ सर्वांना शांततेचे आवाहन करतो.
संपादकीय भूमिकाकुणाचाही द्वेष करणे चुकीचेच आहे; मात्र जेव्हा हिंदूंना त्यांचा धर्म विचारून लक्ष्य केले जात असेल, तेव्हा जनतेची प्रतिक्रिया तितकीच संतप्त असणार आहे. अशा वेळी पीडितांनी गांधीगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर जनता आणखीच संतप्त होऊ शकते, हेच या घटनेतून लक्षात येते ! |