महाराष्ट्राचा १२ वीचा निकाल ९१.८८ टक्के !

कोकणचा निकाल सर्वाधिक, म्हणजे ९६.७४ टक्के !

मुंबई – फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल ५ मे या दिवशी ऑनलाईन घोषित करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के इतका लागला असून यावर्षीही राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, म्हणजे ९६.७४ टक्के इतकालागला आहे. राज्यात एकूण १४ लाख १७ सहस्र ९६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांतील १३ लाख २ सहस्र ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

टक्केवारीमध्ये कोकण विभागानंतर कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.६४ टक्के, मुंबई ९२.९३ टक्के, छत्रपती संभाजीनगर ९२.२४ टक्के, अमरावती ९१.४३ टक्के, पुणे ९१.३२ टक्के, नाशिक ९१.३१ टक्के, नागपूर ९०.५२ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल ८९.४६ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक !

राज्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक, म्हणजे ९७.३५ टक्के लागला आहे. कला ८०.५२ टक्के, वाणिज्य ९२.६८ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम ८३.२६ टक्के आणि आय.टी.आय. चा निकाल ८२.०३ टक्के लागला आहे.

१ लाख ४९ सहस्र ९३२ विद्यार्थी विशेष गुणांनी उत्तीर्ण !

उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ४९ सहस्र ९३२ विद्यार्थ्यांना ७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण प्राप्त करून ४ लाख ७ सहस्र ४३८ विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, तर ५ लाख ८० सहस्र ९०२ द्वितीय श्रेणीत आणि १ लाख ६४ सहस्र ६०१ केवळ उत्तीर्ण झाले आहेत.

पुर्नपरीक्षा देण्यार्‍या विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची संख्या अल्प !

राज्यात एकूण ४२ सहस्र २४ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली; मात्र त्यांतील केवळ १५ सहस्र ८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण होणार्‍यांचे प्रमाण ३७.६५ टक्के इतके आहे.