नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण पाठिंबा ! – संजू परब, जिल्हाप्रमुख, शिवसेना 

 

सावंतवाडी – शक्तीपीठ महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. हा महामार्ग झालाच पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणताही विरोध न जुमानता महामार्ग पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी येथे दिली.

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर परब यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी परब पुढे म्हणाले, ‘‘या महामार्गासाठी कुणाची भूमी, घरे जात असतील, तर त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल; मात्र कुणीही विरोधासाठी विरोध करू नये. या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी हा महामार्ग होणे आवश्यक आहे. या ठिकाणी असलेली आंबा, काजू, कोकम अशा कोकणी फळांची १० घंट्यांत नागपूर आणि देहलीपर्यंत वाहतूक करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे या महामार्गाला विरोध होणे चुकीचे आहे. बांदा ग्रामपंचायतीसह अन्य काही ठिकाणी या महामार्गाला विरोध केला जात असल्याचे दिसून येत आहे; परंतु विकासासाठी संबंधित ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी एकत्र यावे. बांदा सरपंच भाजपच्या आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढली जाईल. त्यांच्या असलेल्या मागण्या पूर्ण केल्या जातील.’’