
पुणे – शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दीड लाखांच्या पुढे आहे. महापालिका प्रतिवर्षी काही सहस्र कुत्र्यांवर नसबंदीचे शस्त्रकर्म करते; मात्र कुत्र्यांच्या संख्येच्या वाढीच्या वेगाच्या तुलनेत हे प्रमाण फारच तोकडे आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात पालिका अयशस्वी ठरत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीच्या शस्त्रकर्माची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत २५ सहस्र ८९९ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे आरोग्य विभागातील आकडेवारी दर्शवते. जानेवारीमध्ये २ सहस्र ७०९, फेब्रुवारी २ सहस्र ३०९ आणि मार्च मध्ये २ सहस्र ३५९ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. यातून भविष्यात ‘रेबीज’ या रोगाचे रुग्ण दिसतील, अशी भीती व्यक्त होत आहे. शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकला जाणारा कचरा, भटक्या कुत्र्यांना खायला घालणारे नागरिक यामुळे ही संख्या वाढत आहे.
भटक्या कुत्र्यांवर नसबंदीचे शस्त्रकर्म करण्यासाठी प्रतिवर्षी निधी संमत होतो. त्यातून २० सहस्र कुत्र्यांवर शस्त्रकर्म करणे शक्य होते; मात्र शहराचा वाढता विस्तार पहाता या भटक्या कुत्र्यांची संख्या रोखणे, हे आव्हान आहे. पुणे शहर रेबीजमुक्त ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे पुणे महापालिकेच्या पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका‘स्मार्ट सिटी’ म्हणवणारी पुणे महापालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू न शकणे हे हास्यास्पद ! |