वरसई (पेण) येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ग्रामीण रस्ते विकास विभागातील भ्रष्टाचाराविरोधात हिंदु स्वराज्य सेनेची तक्रार !

  • निकृष्ट दर्जाचे रस्ते वाहतुकीसाठी योग्य असल्याचा अहवाल दिला !

  • कंत्राटदाराच्या घशात कोट्यवधी रुपये घातले !

प्रतिकात्मक छायाचित्र

पेण, ४ मे (वार्ता.) : वरसई (ता. पेण) येथील मंदार रमाकांत पाटील या कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवूनही ते रस्ते वाहतुकीसाठी योग्य असल्याचा अहवाल ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ग्रामीण रस्ते विकास विभागा’च्या अभियंत्याने दिला आहे. प्रत्यक्षात कामे केल्यावर ६ मासांत रस्त्यांवर खड्डे पडले. या प्रकरणी हिंदु स्वराज्य सेनेचे श्री. किरण गोविंद शिगवण यांनी त्या विरोधात तक्रार केली आहे. त्यात कंत्राटदाराला त्याच्या कामाचे देयक न देता प्रथम त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीची प्रत ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’चे कार्यकारी अभियंता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.

१. मंदार रमाकांत पाटील या कंत्राटदाराने रायगड जिल्ह्यातील ५-६ रस्त्यांच्या कामाचे कंत्राट मिळवले होते. त्यामध्ये डोणवत ते ठाकूरवाडी रस्ता, आत्करगाव ते कातकरवाडी रस्ता, होनाड ते टेंभेवाडी, रामा ८८ ते अजिवली नंदनपाडा रस्ता, राममा ०४ ते कालोते रस्ता आणि इजिमा ३७ ते करंवेळी रस्ता अशा रस्त्यांच्या कामाचा समावेश होता.

२. कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांचा मलिदा देता यावा, यासाठी ग्रामीण रस्ते विकास विभागाने या रस्त्यांची कामे चांगली आणि वाहतुकीस योग्य असल्याचा अहवाल दिला. या प्रकरणी नागरिक संतप्त आहेत.

स्थानिक नागरिकांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात पुढे येऊन आपल्या हक्काचा रस्ता मिळवावा, यासाठी हिंदु स्वराज्य सेनेने लोकांना आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही चांगले रस्ते न मिळणे दुर्दैवी !