तुर्भे रेल्वेस्थानकातील भुयारी पादचारी मार्गाची दुरवस्था !

भुयारी मार्गाच्या तुटलेल्या पायर्‍या

नवी मुंबई – ठाणे – बेलापूर मार्गावरील तुर्भे रेल्वेस्थानक येथील भुयारी पादचारी मार्गाची दरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

१. तुर्भे येथे पूर्वेकडील औद्योगिक पट्टा आणि पश्चिमेकडील रहिवासी वस्ती यांना जोडणार्‍या रेल्वे मार्गाखालून पादचारी भुयारी मार्ग काढण्यात आला आहे.

२. या मार्गाची देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छता सिडकोकडे आहे; मात्र सिडकोचे याकडे दुर्लक्ष होत आहे. येथील पायर्‍या ठिकठिकाणी तुटलेल्या आहेत. त्यामुळे चढ-उतार करतांना पाय घसरून प्रवाशांना इजा होते.

३. येथे रात्री गर्दुल्ल्यांचा वावर असतो. ते अनेकदा मार्गामध्ये लघुशंका करणे, नशा करून त्याच्या बाटल्या तेथेच टाकून देणे, तसेच अन्य प्रकार करत आहेत.

४. मध्यभागी मलन्निःसारण वाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे शौचमिश्रित पाणी येथे जमा होते. परिणामी प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

५. काही दंडदीप बंद पडल्याने अंधार पसरला आहे. काही जण मद्य प्राशन करून फिरत असतात. त्यामुळे महिलांना येथून ये-जा करण्यास असुरक्षितता निर्माण झाली आहे.

६. दैनंदिन पाणी वाहून नेणारे गटार तुंबले आहे.

७. या मार्गाच्या शेजारील शौचालयांची योग्य प्रकारे निगा राखली जात नसल्याने भुयारी मार्गातून बाहेर पडताच शौचालयाच्या दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागतो.

‘महापालिकेच्या क्षेत्रात ‘स्वच्छ भारत अभियान’ चालू आहे. त्यामुळे या प्रकरणी सिडको आणि पालिका अधिकार्‍यांनी लक्ष घालून येथील अस्वच्छता दूर करून प्रवाशांना दिलासा द्यावा’, अशी मागणी केली जात आहे.

संपादकीय भूमिका

प्रशासनाने यात लक्ष घालून समस्या तातडीने सोडवाव्यात !