|
पणजी – शिरगाव येथे जत्रेच्या वेळी चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणी गतवर्षीही अल्प स्वरूपात अशीच एक घटना घडली होती आणि संबंधित जागा ही अपघातप्रवण आहे, अशी माहिती शिरगाव येथील जत्रेत चेंगराचेंगरी झालेल्या घटनेचे अन्वेषण करणार्या संदीप जॅकीस (आय.ए.एस्.) यांच्या नेतृत्वाखालील विशेष उच्चस्तरीय सत्यशोधन समितीला मिळाली आहे. या समितीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक (रेंज) वर्षा शर्मा, परिवहन संचालक पर्मियल अभिषेक आणि दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकम सिंह वर्मा यांचा समावेश आहे. सत्यशोधन समितीने पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, जिल्हाधिकारी स्नेहा गीत्ते (आय.ए.एस्.), पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी, उपजिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीचे पदाधिकारी यांची साक्ष नोंदवून घेतली आहे. समिती लवकरच चेंगराचेंगरीत घायाळ झालेल्यांची भेट घेणार आहे.
धोंडगणांनी मुख्यमंत्र्यांना दिली चेंगराचेंगरीच्या वेळची संपूर्ण माहिती !

सांखळी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पडोसे, पर्ये येथील सूर्या मयेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी चेंगराचेंगरीत घायाळ झालेल्या धोंडगणांनी मुख्यमंत्र्यांना चेंगराचेंगरीच्या वेळी घडलेली संपूर्ण माहिती दिली. धोंडगणांनी सांगितले की, घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी आवश्यक ते प्रथमदर्शनी साहाय्य केले नाही, तर उलट आम्हालाच उत्तरे दिली. आम्हीच आमच्या माणसांना घेऊन उपचारासाठी धावत सुटलो. पोलिसांची गाडीही चालू होत नव्हती. नंतर अधिकारी वर्ग घटनास्थळी धावून आल्यानंतर पोलिसांनी साहाय्य चालू केले.
४ गंभीर रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ४ मे या दिवशी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन शिरगाव जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत घायाळ झालेल्यांची भेट घेतली आणि त्यांच्यावर चालू असलेल्या उपचारांविषयी माहिती घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना मंत्री राणे म्हणाले, ‘‘येथे उपचार घेत असलेल्या जत्रोत्सवात गंभीररित्या घायाळ झालेल्या ४ जणांची प्रकृती सुधारत आहे, तसेच इतर घायाळ झालेल्यांच्या प्रकृतीतही सुधारणा आहे. गंभीररित्या घायाळ असलेल्यांचा जीव वाचवण्यासाठी आधुनिक वैद्यांकडून पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत.’’
राज्यपालांनी घेतली श्री लईराई जत्रेतील चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबियांची भेट

पणजी – राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी ४ मे या दिवशी श्री लईराई जत्रेतील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या घरी भेट दिली. या वेळी शोकग्रस्त कुटुंबांना भेटून राज्यपालांचे मनही हळहळले. या वेळी त्यांनी संबंधित कुटुबियांचे सांत्वन करत त्यांना पूर्ण साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी या वेळी माडेल, थिवी येथील आदित्य कवठणकर, तनुजा कवठणकर आणि यशवंत केरकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी राज्यपालांसमवेत स्थानिक आमदार तथा पशूसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची उपस्थिती होती. राज्यपालांनी या वेळी पडोसे, सांखळी येथील मयत सूर्या मयेकर यांच्या घरालाही भेट दिली.
श्री लईराईदेवीच्या कौलप्रसादाला गर्दी करू नका ! – देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर
श्री लईराईदेवीच्या चालू असलेल्या कौलप्रसादाला लोकांनी गर्दी करू नये. त्याचप्रमाणे कौलप्रसादाच्या शेवटच्या पाचव्या दिवशी बाहेरच्या लोकांना प्रवेश दिला जाणार नाही. पुढच्या वर्षीपासून मुड्डेर ते होमखंड येथपर्यंत दुकानांवर निर्बंध घालण्यात येणार आहेत, असे शिरगाव येथील श्री लईराई देवस्थानचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांनी स्पष्ट केले. ६ मे हा देवीचा दिवस असून या दिवशी जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमावलीचे पालन केल्यास दुर्घटना टळली असतीपणजी – राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास गर्दीवर नियंत्रण कसे ठेवावे, यासाठी नियमावली सिद्ध केलेली आहे. बहुतेक धार्मिक स्थळे ही डोंगरमाथ्यावर असतात. प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार उत्सवाला होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर संबंधित धार्मिक स्थळावर पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी थांबे केले पाहिजेत आणि टप्पाटप्प्याने लोकांनी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी गेले पाहिजे, तसेच एकाच ठिकाणी लोकांना अधिक वेळ ठेवू नये. शिरगाव येथील जत्रेमध्ये या नियमावलीकडे दुर्लक्ष करण्यात आले. घटना घडलेल्या ठिकाणी ४ मीटर रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकाने होती आणि या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण करण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. प्राप्त माहितीनुसार जत्रोत्सवाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासाठी सराव कवायतही करण्यात आली नव्हती. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमावलीचे पालन केल्यास दुर्घटना टळली असती, असे जाणकारांचे मत आहे |