पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ जळगाव येथे मूकमोर्चा !

मूकमोर्चात २ सहस्त्र हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची उपस्थिती !

जळगाव येथे मूकमोर्चा काढतांना हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी

जळगाव, ४ मे (वार्ता.) – पहलगाम या पर्यटनस्थळी आतंकवाद्यांनी २७ हिंदु पर्यटकांची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ जळगाव शहरातील विविध संस्था, संघटना यांनी ३ मे या दिवशी भव्य मूकमोर्चा काढला. जळगाव शहरातील व्यापार्‍यांनी अर्धा दिवस बाजारपेठ बंद ठेवली. या मूक मोर्चात २ सहस्र हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

१. सकाळी ७ वाजता शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चास प्रारंभ झाला. स्वातंत्र्य चौकाच्या ठिकाणी मोर्चाची समाप्ती झाली.

२. येथे १ घंटा ठिय्या आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी अणि पोलीस अधीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

३. २४ एप्रिल या दिवशी जळगाव नागरिक मंचच्या पुढाकारात झालेल्या बैठकीत जळगाव रोटरी परिवार, जळगाव जिल्हा गणेशोत्सव मंडळ आणि युवाशक्ती फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी मूकमोर्चाचे आयोजन केले होते.

४. मोर्च्यात व्यापार्‍यांसह परिचारिका, विविध क्षेत्रांतील मान्यवर, भाजपचे आमदार श्री. राजूमामा भोळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. सचिन नारळे, जळगाव एकता मंचचे मुख्य आयोजक श्री. दिलीप तिवारी उपस्थित होते, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, योग वेदांत समिती, संत जगनाडे महाराज युवा मंच अशा हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या.

५. ‘३ मे या दिवशी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील मुख्य आणि उपनगरांमधील बाजारपेठ बंद ठेवावी. यासाठी कोणतीही संस्था अथवा संघटना व्यापार्‍यांना येऊन विनंती करणार नाही अथवा व्यवहार बंद करण्यासाठी आग्रह करणार नाही’, असे सांगितले होते. त्यानुसार व्यापार्‍यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली होती.