आदर्श हिंदु राष्ट्रात स्वतःचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी चांगल्या सवयींचे पालन करा !

आदर्श हिंदु राष्ट्र निर्माण होण्यासाठी आपल्याला जीवनातील सर्व पैलूंमध्ये प्रगती करायला पाहिजे. त्यात एक म्हणजे स्वास्थ्य ! शरीर आणि मन स्वस्थ राहिले, तरच साधना करून मनुष्यजन्माचे ध्येय आपण पूर्ण करू शकतो. इंग्रजीत म्हण आहे, ‘Cleanliness is next to Godliness’, म्हणजे ‘जेथे स्वच्छता आहे, तेथेच देवाचा वास असतो.’ भारतीय संस्कृतीतसुद्धा हेच आहे. यासाठी भारतियांनी आणि विशेषत: साधकांनी स्वच्छतेचे पैलू पाळायला पाहिजेत. त्याविषयी ठाऊक नसणार्‍यांना ते शिकवायला पाहिजेत. अयोग्य सवयी सोडून आरोग्यशास्त्राप्रमाणे जे योग्य आहे, ते करावे. हा लेख लिहिण्यामागील हाच उद्देश आहे. अयोग्य कृती आणि योग्य सवयी यांच्याविषयी या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया.

१. सकाळी उठल्यावर काय करावे ? 

अ. प्रतिदिन सकाळी उठल्यावर डोळ्यांवर थंड पाणी शिंपडून नंतर तर्जनीने डोळ्यांतील घाण काढावी.

आ. तर्जनी नाकपुडीत घालून नाक स्वच्छ करावे. आवश्यकता असल्यास नाक पिळावे. कधीही दुसर्‍यांसमोर नाकात बोटे घालू नयेत. घातल्यास लगेच साबण लावून हात धुवावा.

इ. बोटांनी अथवा जीभ घासणीने जीभ घासावी. यामुळे तोंडातून येणारा दुर्गंध टाळू शकतो. हे करतांना मोठ्याने आवाज करणे टाळावे, अन्यथा समवेत असणार्‍यांना त्रास होऊ शकतो.

ई. काहींच्या तोंडाला घाण वास येतो. त्यामुळे बोलतांना दुसर्‍यांना त्याचा त्रास होतो. घरगुती उपाय म्हणून टूथपेस्ट अथवा दंतमंजन वापरल्यानंतर खडे मीठाने हिरड्या आणि दात बोटांनी घासावेत. तरीही दुर्गंध जात नसल्यास दंतवैद्यांकडे जावे. कधी कधी दात व्यवस्थित असूनही पोटात जंतू अथवा आणखीन काही आजारामुळे दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो.

उ. टूथपेस्ट अथवा दंतमंजन वापरून सकाळी आणि रात्री झोपण्याआधी असे २ वेळा दात स्वच्छ करावेत. रात्री दात घासल्यानंतर परत खाऊ नये. दुधाचे दात असतांनाच मुलांना दोन्ही वेळा दात घासण्याची सवय लावल्यास नंतर दात कमी किडतात आणि नवीन दातही चांगले येतात. दातांत अन्नकण अडकल्यास ‘टूथपिक’ (दातकोरणी) घेऊन काढावे. ‘डेंटल फ्लॉस’ (दातात अ डकलेले अन्नकण काढण्यासाठी दोर्‍याच्या स्वरूपातील उपकरण) वापरल्यास दात स्वच्छ रहातात. िवनाकारण तोंडात बोटे घालू नयेत आणि घातल्यास हात धुवावेत.

ऊ. स्नान करतांना प्रतिदिन बोटाने बेंबीतील मळ हलकेपणाने काढावा.

ए. अंतर्वस्त्रे स्वच्छ आणि वाळलेली असावीत. ओले कपडे घातल्यास जंतूसंसर्ग होऊ शकतो. शक्यतो अंतर्वस्त्रे सुती असावीत. नायलॉनची नसावीत; कारण त्यात घाम टिपला जात नाही. शक्य असल्यास अंघोळ झाल्यावर काखेत, पोटावर, पाठीवर, स्त्रियांनी स्तनांच्या खाली आणि जांघेच्या बाजूला ‘टाल्कम पावडर’ लावावी, म्हणजे ती जागा कोरडी रहाते.

ऐ. प्रतिदिन धुतलेले कपडे घालावेत. घाम आलेले कपडे परत न धुता घातल्यास त्यांचा दुर्गंध अन्य कपड्यांना येतो. जे प्रतिदिन प्रवास करतात किंवा रुग्णालयात नोकरी करतात, त्यांनी प्रतिदिन कपडे धुवावेत.

डॉ. रूपाली भाटकार

२. केसांची निगा कशी घ्यावी ? 

अ. पूर्वी केसांना प्रतिदिन खोबरेल तेल लावले जायचे. त्यामुळे केसांना पोषण मिळून केसांची चांगली वाढ होत असे. सध्या आधुनिक विचारसरणीमुळे तेल लावण्याची प्रथाच नाही. केसांना प्रतिदिन तेल लावणे लाभदायक आहे. त्यामुळे केस चांगले रहातात. केसांवर अनिष्ट शक्तींची आक्रमणे अल्प होतात. केस मोकळे सोडल्यास ते अधिक प्रमाणात गळतात आणि त्यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणेही होतात. केस खाली पडल्यास परिसर दूषित होऊ शकतो. केसांना विनाकारण हात लावू नये अथवा केस उगाच मोकळे सोडू नयेत किंवा घट्ट बांधू नयेत.

आ. प्रत्येकाचा कंगवा वेगळा असावा. प्रत्येक आठवड्याला तो जुन्या टूथब्रशच्या साहाय्याने साबणाने स्वच्छ करावा. कंगव्यासाठी ठेवलेल्या ब्रशवर ‘कंगव्यासाठी’ अशी चिठ्ठी लावावी.

इ. पुरुष प्रतिदिन केस धुवू शकतात. स्त्रियांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केस धुवावेत. केस पातळ पंचाने वाळवावेत. केस अधिक गळत असल्यास शरिरात लोहाचा अभाव असू शकतो. यासाठी रक्तातील हिमोग्लोबिनची पडताळणी करावी.

३. कान आणि नखे यांची काळजी कशी घ्याल ? 

अ. आठवड्यातून एकदा कानात ‘इयरबड’ (कानातील मळ काढण्यासाठीची कापसाची काडी) वापरून मळ काढावा. काही जण कानातील मळ चावी, केसांची पिन किंवा बोटांच्या साहाय्याने काढतात. यातून कानांना इजा होऊ शकते. मळ काढल्यावर हात धुवावेत.

आ. नखे वेळोवळी कापावीत. वाढलेल्या नखांमध्ये मळ साठल्यास ते आजाराला कारण होऊ शकते.

४. हात कधी धुवावेत ? 

अ. सार्वजनिक प्रसाधनगृह वापरल्यास साबण लावून हात धुवावेत अथवा ‘सॅनिटायझर’ने (हात धुण्यासाठीचे द्रव्य) हात स्वच्छ करावेत. तसे न केल्यास ‘टायफॉईड’ (विषमज्वर) किंवा जुलाब होऊ शकतात.

आ. सध्या विमानतळ आणि मॉल्स येथे लेझरचे नळ असतात. त्यांना स्पर्श करावा लागत नाही. नळाखाली हात ठेवल्यावर आपोआप त्यातून पाणी येते. हात कोरडे करण्यासाठीही ‘ड्रायर’चे यंत्र असते.

५. त्वचेची काळजी कशी घ्याल ? 

अ. त्वचा खाजवल्यावर त्या भागांतील पेशी नखांत येतात. त्वचेचा संसर्ग असल्यास खाजवल्यावर नखांत मृत पेशी येतात; म्हणून खाजवल्यावर साबणाने हात धुवावेत.

आ. तळपायांवरील घट्ट त्वचा काढण्यासाठी (विशेषतः वयस्करांच्या पायांवरील) कोमट पाण्यात केसांचा शॅम्पू टाकून पावले १० ते १५ मिनिटे भिजवावीत. नंतर ‘लुफा स्पंज’ (घोसाळ्यापासून बनवलेला एक स्पंज) वापरून ती त्वचा काढावी. त्वचा पुष्कळ घट्ट असल्यास परत दुसर्‍या दिवशी ही प्रक्रिया करावी; मात्र अधिक जोरात करू नये. रक्त आल्यास लगेच त्या भागावर ‘सोफ्रामायसीन’ हे मलम लावावे.

इ. झोपण्यापूर्वी पाय धुवावेत. बागेत अथवा शेतात अनवाणी गेल्यासही पाय धुवून पुसून मगच झोपावे. मातीतील जंतू त्वचेतून शरिरात शिरून आजार होऊ शकतात.

ई. घरात शक्यतो प्रत्येक आठवड्याला किंवा १५ दिवसांनी पलंगावरील चादर पालटावी. त्यामुळे रोजच्या धुळीमुळे होणारे आजार, उदा. ‘डस्ट माइट’ किंवा त्वचेवर ॲलर्जी होणे टाळता येते. खाली सुती आणि वर जाड चादर घालावी. रात्री झोपतांना वरची चादर काढावी. तसे शक्य नसल्यास एकच चादर घालावी; पण ती  स्वच्छ असावी.

उ. भारतात बहुतेक ठिकाणी हवा दमट असल्यामुळे टर्किश टॉवेल वापरण्याऐवजी सुती पंचे वापरावेत; कारण टर्किश टॉवेल ओले रहातात. त्यातून दुर्गंध येऊ शकतो आणि जंतूसंसर्गही होऊ शकतो. ते टॉवेल उन्हात वाळवल्यास योग्य होईल. स्वतःचा पंचा आठवड्यातून एकदा तरी धुवावा. प्रत्येक व्यक्तीचा पंचा वेगळा असावा.

६. औषधांच्या संदर्भात घ्यावयाची काळजी ! 

अ. कुठलीही औषधे आयुर्वेदिक असोत किंवा ॲलोपॅथी असोत, ती आधुनिक वैद्य किंवा वैद्य यांच्या सल्ल्याविना घेऊ नयेत. समाजात अपसमज आहे की, आयुर्वेदाची औषधे वर्षानुवर्षे चालू ठेवली, तरी त्यांचा दुष्परिणाम होत नाही; पण हे चुकीचे आहे. काही प्रांतांत घराघरात ‘पचनासाठी अरिष्ट’ वैद्यांच्या सल्ल्याविना घेतात. एरव्ही दारू पिऊन होणारे आजार असा प्रकार केल्याने दारू न पिताच होतात.

आ. लवकर बरे वाटण्यासाठी किंवा शक्तीवर्धक म्हणून काही आधुनिक वैद्य स्टिरॉईड इंजेक्शन देतात. त्यामुळे रुग्णाला लगेच बरे वाटते. कधी कधी तर रुग्ण स्वतःहून पुन्हा पुन्हा त्याची मागणी करतो. स्टिरॉईड अधिक प्रमाणात घेणे, हे बर्‍याच अवयवांसाठी हानीकारक आहे. गोळ्यांपेक्षा इंजेक्शन घेणे अधिक लाभदायक असते, हा अपसमज आहे. रुग्ण गंभीर स्थितीत असतांना इंजेक्शन देणे वेगळे आहे.

इ. १-२ दिवस प्रथमोपचार म्हणून औषधे घेऊ शकतात; पण आधुनिक वैद्य किंवा वैद्य यांच्या सल्ल्याविना उगाच कुणी सांगितले; म्हणून औषधे घेऊ नये.

ई. स्वयंपाक करतांना पदार्थाची चव घेण्यासाठी काही जण हाताच्या तळव्यावर तो पदार्थ घेतात. अशा वेळी हात धुऊन पुन्हा स्वयंपाक करायला पाहिजे. अन्यथा चमच्याने किंवा वाटीत घेऊनही चव पाहू शकतो. शिंकतांना किंवा खोकतांना हात तोंडावर ठेवल्यावर हात न धुता तसाच स्वयंपाक करणे किंवा जेवणाची भांडी, टॉवेल इत्यादी हाताळणे टाळावे; कारण दुसरी व्यक्ती ते वापरणार, तेव्हा जंतू पसरण्याची शक्यता असते.

७. अन्य 

अ. शिंकतांना तोंडासमोर रूमाल ठेवावा. रूमाल नसल्यास तोंडासमोर हाताचा तळवा ठेवून नंतर हात धुवावा अथवा स्वत:च्या कपड्याच्या बाहीवर शिंकावे. जेथे हात धुण्याची सोय नसते, उदा. आगगाडीतून प्रवास करतांना, शाळेत असतांना अशा वेळी ‘सॅनिटायझर’ने हात स्वच्छ धुवावेत. स्वतःजवळ ‘सॅनिटायझर’ची लहान बाटली अथवा ‘वेट वाईप’ (ओले टिशू) सतत ठेवावेत.

आ. दूषित पाणी पिण्यामुळे जुलाब, अमीबाएसिस, हगवण, कॉलरा असे रोग होऊ शकतात; म्हणून ‘फिल्टर’चे (यांत्रिक पद्धतीने शुद्ध केलेले) पाणी प्यावे किंवा उकळलेले पाणी प्यावे. पाणी नुसते गरम करून जंतू मरत नाहीत. त्यासाठी  पाणी किमान १० मिनिटे उकळणे आवश्यक आहे.

इ. काही कारणास्तव बाहेरचे अन्नपदार्थ खावे लागल्यास ते अन्न उष्ण आहे ना, याची निश्चिती करावी. माशा बसलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत, तसेच काही काळ आधीच कापून ठेवलेली फळे खाऊ नयेत.

ई. यंत्रांतून (‘ज्यूसर’मधून) काढलेला फळांचा रस शक्यतो पिऊ नये; कारण फळांचा रस काढणारी यंत्रे वेळोवेळी स्वच्छ केली जात नाहीत. त्यामुळे ‘टायफॉईड’, कावीळ यांसारखे आजार होऊ शकतात.

उ. प्रतिदिन घातलेले सोन्याचे दागिने पंधरवड्यातून एकदा धुवावेत. वाटीत पाणी घेऊन त्यात कपडे धुण्याची पावडर आणि चिमूटभर हळद घालावी. असे केल्याने पाणी लाल होते. आध्यात्मिक लाभासाठी पाण्यात एक चिमूटभर विभूती घालू शकतो. दागिने १० ते १५ मिनिटे त्यात भिजवावेत. जुना टूथब्रश वापरून दागिने स्वच्छ करावेत आणि नळाच्या थंड पाण्याने धुवावेत. दागिन्यांसाठी वेगळा ब्रश वापरावा.

– डॉ. रूपाली भाटकार, फोंडा, गोवा. (१२.२.२०२५)