
उरुळी कांचन (पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे व्हावा, असा ग्रामस्थांचा आग्रह होता. त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांनी गावाची पडताळणी करून परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे होणार असल्याचे निश्चित केले.
नेहमीप्रमाणे देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर आणि कदमवाक वस्ती येथे पालखीचा रात्रीचा मुक्काम असतो. परतीचा रात्रीचा मुक्काम हा उरुळीकांचन येथे असायचा. आता यात पालट करून तो कुंजीरवाडी येथे घेतला आहे.
गेल्या वर्षी उरुळीकांचन गावातील विसावा रहित करून तो उरुळीकांचन फाट्यावर होईल, असे पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांनी घोषित केले होते. या निर्णयावर ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि विश्वस्त यांच्याशी वाद झाला होता. ग्रामस्थांनी पालखी सोहळा आडवला होता. त्या वेळी विश्वस्तांनी ‘नगारा बैलगाड्यांचे बैल सोडून’ विरोध दर्शवला होता.