प्रशासनात सुधारणा करण्याची आवश्यकता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

शिरगाव (गोवा) येथील श्री लईराईदेवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी झाल्याचे प्रकरण

पणजी, ४ मे (वार्ता.) – जत्रोत्सवात धोंड आणि भाविक यांनी योग्य प्रकारची दक्षता घेणे आवश्यक आहे, तसेच प्रशासनातही सुधारणा करणे आवश्यक आहे. मृतांचे कुटुंबीय आणि इतर यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला लक्षात आले आहे की, प्रशासकीय पातळीवर काही गोष्टी सुव्यवस्थित करणे आवश्यक आहे अन् त्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ४ मे या दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. प्रारंभी शिरगाव येथील श्री लईराईदेवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या सूर्या नंदरगे यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. नंदरगे परिवाराची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री भावूक झाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘सरकारने घोषित केलेली १० लाख रुपयांची हानीभरपाईची रक्कम संबंधित कुटुंबियांना १२ दिवसांनंतर देणार आहे. प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. सरकार यापुढे भविष्यात कुठल्याही जत्रोत्सवात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेणार आहे. शिरगाव येथील घटनेमुळे मी पुष्कळ व्यथित झालो आहे. ‘घटना कशामुळे घडली ?’, याचे कारण शोधण्याचे काम विशेष समिती करत आहे. त्यासाठी समितीकडून या घटनेच्या अनुषंगाने आवश्यक लोकांशी चर्चा केली जात आहे. काहींची साक्षही नोंदवली जात आहे.’’

वार्षिक कौलप्रसादाच्या ठिकाणी शेकडो भाविकांनी दिली भेट

चेंगराचेंगरीनंतर शिरगाव येथील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मंदिर समितीने भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता अस्नोडा येथे बंद करण्यात आला आहे. ४ मे या दिवशी वार्षिक कौलप्रसादाच्या ठिकाणी शेकडो भाविकांनी भेट देऊन कौलप्रसाद घेतला.