‘सनातन संस्थेचे प्रवक्ते म्हणून सेवा करणारे माझे यजमान श्री. अभय वर्तक यांचा ५० वा वाढदिवस चैत्र कृष्ण नवमी या दिवशी झाला. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ एकदा म्हणाल्या होत्या, ‘‘अभयदादा गुणांची खाण आहेत.’’ यजमानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे लक्षात आलेले काही गुणमोती येथे दिले आहेत.


१. लेखनकौशल्य
श्री. अभय यांच्या लिखाणाची शैली चांगली आहे. त्यांच्यामध्ये उत्स्फूर्तपणे काव्य करण्याची कलाही आहे.
२. पाककलेत निपुण
ते उपलब्ध साहित्यांत रुचकर पदार्थ बनवतात.
३. नवीन संकल्पना सुचणे
त्यांना सतत नवीन संकल्पना सुचत असतात. सर्वसामान्य व्यक्ती जो विचार करील, त्याच्या पलीकडे जाऊन यजमानांचा विचार होतो. ते प्रत्येक संकल्पनेचा विचार व्यापक स्तरावर करतात.
४. निर्णयक्षमता
‘सर्वसामान्य माणूस विचार करू शकणार नाही’, असे धडाडीचे निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आहे. त्या निर्णयाचा नंतर सेवा आणि कार्य यांसाठी लाभ झाला असल्याचे लक्षात आले. एखादे गुंतागुंतीचे किंवा अवघड काम किंवा सेवा पूर्णत्वाला नेण्याची धडाडीची वृत्तीही त्यांच्यात आहे.
५. एकाच वेळी अनेक विषय हाताळणे
त्यांची एकाच वेळी अनेक विविध विषय हाताळण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. तेव्हा त्यांचा सहसा गोंधळ होत नाही.
६. जवळीक साधणे
लाघवी स्वभाव, सर्वांशी जवळीक साधण्याच्या आणि लोकांना जोडून ठेवण्याच्या हातोटीमुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना त्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो. त्यांनी काही वैचारिक विरोधकांनाही जोडून ठेवले आहे. त्यामुळे त्या विरोधकांचे सनातन संस्थेविषयी मतपरिवर्तन होण्यास साहाय्य झाले आहे. यजमानांचा समाजातील निरक्षर व्यक्तींपासून मोठे विचारवंत, विविध क्षेत्रांतील तज्ञ, वलयांकित व्यक्ती यांच्याशी संपर्क येतो. श्री. अभय यांचे सर्वांवर प्रेम आहे आणि त्या सर्वांचेही श्री. अभय यांच्यावर प्रेम आहे.
७. यजमान नातेवाईक, साधक, संत, सद्गुरु यांच्याशी मोकळपणाने बोलतात. त्यांचे मन निर्मळ असल्याचे लक्षात येते.
८. स्वीकारण्याची वृत्ती
त्यांच्या सेवेच्या स्वरूपामुळे त्यांना कधी कुठे प्रवासाला जावे लागेल, याची निश्चिती नसते. त्यांचे नियोजन सातत्याने पालटत असते, तरीही त्या संदर्भात त्यांची सदैव सिद्धता असते. दूरच्या प्रवासाला आरंभ करून अर्ध्या वाटेत परत माघारी फिरण्याचा प्रसंग घडला, तरीही त्यांना त्याचे काही विशेष वाटत नाही. ‘सतत वर्तमानकाळात रहाणे’, हा गुण त्यांच्यात पूर्णपणे विकसित झाला आहे.
९. सेवेची तळमळ
अ. एकाच वेळी अनेक सेवा करतांना, सेवेच्या नियोजनात सतत पालट होत असतांना आणि सततच्या प्रवासामुळे शारीरिक कष्ट होत असतांनाही त्यांनी ‘काही सेवा करण्याचे टाळले आहे’, असे होत नाही. त्यांचा सेवा करण्याचा उत्साह शारीरिक त्रास होत असतांनाही मावळत नाही.
आ. त्यांच्यामध्ये ‘गुंतागुंतीच्या आणि अनेक बारकावे असणार्या विषयात गुंतून न जाता थेट मुळाशी कसे जायचे किंवा मुख्य सूत्रापाशी कसे जायचे ?’, याचे चांगले कसब आहे. त्यामुळे त्यांच्या सेवा गतीने होतात आणि त्यांचा वेळ वाचून त्याचा एकत्रित परिणाम सेवेच्या फलनिष्पत्तीवर होतो.
१०. पत्नीकडून अपेक्षा नसणे
यजमानांना आमच्या घरी नागोठणे (जिल्हा रायगड) येथे काही कामानिमित्त वारंवार जावे लागते. त्यांना तिथे एकट्याला बरीच कामे करावी लागतात. तेव्हा ‘तिथे मी त्यांच्या समवेत यावे’, अशी त्यांची अपेक्षा नसते. ते नेहमी माझ्या सेवेला प्राधान्य देतात.
११. आसक्ती नसणे
‘स्वतःच्या आयुष्यासाठी काही वेगळा वेळ द्यावा’, असे त्यांनी कधी केले आहे, असे नाही. ‘स्वतःसाठी जगावे किंवा मिळालेले लाभ घ्यावेत’, असा त्यांचा विचार कधीही नसतो. ते माणसांमध्ये अधिक आनंदी असतात. त्यांनी मला लग्नाच्या पूर्वीच सांगितले होते, ‘‘तू कुठल्याही कारणाने पुढे सेवा-साधना सोडलीस, तरीही मी सेवा सोडून तुझ्या समवेत येणार नाही.’’
१२. गुरुकृपा
श्री. अभय यांच्यावर गुरुकृपा असल्याचे अनेक प्रसंगांतून वारंवार माझ्या लक्षात येते. ‘त्यांची अनेक कामे करण्यास कुणीतरी अकस्मात् त्यांना साहाय्य करतो’, असे नेहमीच होते. ‘प्रवासात किंवा अडचणीच्या वेळी त्यांना देवाचे साहाय्य मिळत असते’, असे अनेक वेळा घडते. ‘व्यवहारात आणि सेवेतही त्यांनी घेतलेले अनेक निर्णय अन् केलेली कृती कालांतराने पुष्कळ महत्त्वाची होती’, असे लक्षात येते. ‘गुरुकृपेविना हे शक्य नाही’, असे वाटते. प्रसिद्धी माध्यमांसमोर संस्थेची बाजू मांडतांना यजमानांवरील गुरुकृपेची प्रचीती त्यांनी आणि मी अनेक वेळा घेतली आहे.
१३. गुरुनिष्ठा
‘काहीही झाले, कितीही बिकट परिस्थिती आली, तरीही गुरूंच्या चरणांशी रहायचे, त्यांना सोडायचे नाही’, अशी यजमानांची ठाम निष्ठा आहे. ही निष्ठाच त्यांच्या साधनाप्रवासाचा आधारस्तंभ आहे.
‘श्री. अभय यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते.’
– सौ. रूपाली अभय वर्तक (श्री. अभय यांची पत्नी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.५.२०२५)