सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. आपण कुठेही असलो, तरी ईश्वराचे चैतन्य आपल्यापर्यंत पोचत असणे

श्री. गिरीश गुडी : घरी एखादा सत्संग किंवा राष्ट्रीय भक्तीसत्संग ऐकतो. तेव्हा पुष्कळ चैतन्य अनुभवता येते आणि आध्यात्मिक स्तरावरील उपायही होतात. अशा प्रकारच्या अनुभूती आतापर्यंत ईश्वराने मला दिल्या आहेत. उपाय होत असल्यामुळे स्मरण झाले. येथे आल्यावर लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही जेव्हा भाव ठेवतो, तेव्हा ते चैतन्य आम्ही घरीही अनुभवू शकतो.’ भ्रमणभाषचे ‘नेटवर्क’ सगळीकडे येत नसते; पण ईश्वराचे चैतन्य आपण कुठेही गेलो, तरी अनुभवू शकतो. ‘संत नामजपादी उपाय करतात. तेव्हा ईश्वराचे चैतन्य सर्वत्र पसरते’, असेही लक्षात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमची साधना चांगली चालू आहे, हे या अनुभूतीतून कळते. ईश्वराने तुम्हाला प्रमाणपत्रच (सर्टीफिकेट) दिले आहे. फारच छान !

श्री. गिरीश गुडी : मी रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात बसून नामजप करत होतो. तेथेही माझा नामजप होऊ लागला. ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना जसे चैतन्य मिळते, तसेच चैतन्य स्वागतकक्षातही मिळत होते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आश्रमात सर्वत्र पुष्कळ चैतन्य आहे. त्यामुळे नामजपादी उपाय कुठेही होतात.’

२. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’त आता व्यष्टी साधना आणि समष्टी साधना आणखी चांगली कशी होईल ?’, हे शिकवले जाणे

श्री. पार्थ राऊत : पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात आल्यानंतर सर्व जण ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ करतात. तिचे महत्त्व काय आहे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’त आता व्यष्टी साधना अन् समष्टी साधना आणखी चांगली कशी होईल ?’, हे शिकवतात. पूर्णवेळ साधना करण्यासाठी सेवा करायला आरंभ केल्यावर सेवेत चुका झाल्या, तर साधना होत नाही. आश्रमात राहून असे जीवन व्यर्थ घालवायचे नाही. त्यामुळे ‘आश्रमात रहातो, तर प्रत्येक सेवा परिपूर्ण कशी होईल ? भावपूर्ण कशी होईल ?’, हे शिकवतात. घरात असे शिकवणारे कुणी नसते. येथे सर्व शिकायला मिळते.

३. ‘मला साधना करून ईश्वरप्राप्ती करायची आहे’, ही एकच स्वेच्छा जीवनात ठेवली पाहिजे !

पूजा पाटील : गुरुदेव, पूर्वी मी कृष्णाशी बोलत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : फारच छान !

पूजा पाटील : एकदा सत्संगात सांगितले होते, ‘आपण जे बोलतो, ते कृष्णापर्यंत पोचते; पण कृष्ण जे बोलतो, ते आपल्याला समजत नाही. आपली भाषा वेगळी आहे. त्यानंतर माझे प्रयत्न पुष्कळ अल्प होऊ लागले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : स्वभावदोष इत्यादी गेल्यावर आपले देवाशी बोलणे आपोआप होते. ‘मन निर्मळ होण्यासाठी प्रयत्न करीन, साधना चांगल्या प्रकारे करीन’, याला साधनेत प्राधान्य आहे. स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृती, अष्टांग साधना हे सगळे करायचे आहे. केवळ कृष्णाशी बोलणे एवढेच नाही. आपल्याला तसा विचार करायचाच नाही. आणखी पुढे जाऊन आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यावर, ७० टक्के इत्यादी झाल्यावर ईश्वर स्वतः आपल्याशी बोलायला लागतो. ‘कृष्णाशी बोलावे’, हीसुद्धा स्वेच्छाच आहे ना ! ‘स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा’, हे ठाऊक आहे ना ? आपल्याला कसलीच स्वेच्छा ठेवायची नाही. आपल्या स्वेच्छेने झाडाचे एक पानही हलत नाही, तर ईश्वर कसा बोलेल ? ‘मला साधना करून ईश्वरप्राप्ती करायची आहे’, ही एकच स्वेच्छा असली पाहिजे.

४. साधना चांगली होत नसतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहून भाव जागृत होणे आणि तेव्हा प्रार्थना केल्यावर नेहमी कुणीतरी आतून मार्गदर्शन करत असल्याची जाणीव होणे

कु. सोनाली शेटे : मला एक अनुभूती आली आहे. मी घरी असतांना माझ्याकडून काहीच साधना होत नव्हती आणि माझ्याकडून नामजपही एकाग्रतेने होत नव्हता. त्यामुळे मला निराशा आली होती. एक दिवस मी माझ्यासमोर ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला होता. मी त्या ग्रंथाकडे पाहिले आणि माझा पुष्कळ भाव जागृत झाला. त्या वेळी मी मनात आपल्यालाच प्रार्थना केली, ‘परम पूज्य, भगवान श्रीकृष्णा, आपणच माझ्याकडून साधना करून घ्या. मी साधना करणारी कुणीच नाही. नंतर आतून आवाज आला, ‘मी तुझ्या समवेत आहे.’ तेव्हापासून आजपर्यंत ‘मला आतून कुणीतरी मार्गदर्शन करत आहे’, असे वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे, ‘प्रथम व्यष्टी साधना चांगली असली पाहिजे, तरच समष्टी साधना होऊ शकते. ‘समष्टी साधना चांगली चालली असेल, तर त्यामुळे व्यष्टी साधना चांगली होईल’, असे उलट कधी होत नाही. ‘घरात साधना होत नाही’, असे ज्याला वाटते, त्याने आश्रमात येऊन रहावे. आपल्याला संपूर्ण जीवनभर समष्टी साधनाच करायची आहे; मात्र समष्टी साधना चांगली होण्यासाठी व्यष्टी साधना चांगली झाली पाहिजे, तरच आपण समष्टी साधना करू शकतो.          (क्रमश:)   

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक