‘आफ्टरनून व्हॉईस’च्या ‘न्यूजमेकर अचिव्हर्स’ पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव !

आप्पा परब यांचा सत्कार करतांना रामलालजी

मुंबई, ४ मे (वार्ता.) – इंग्रजी दैनिक ‘ऑफ्टरनून व्हॉईस’ आयोजित ‘न्यूजमेकर अचिव्हर्स’ या नामांकित पुरस्काराचे वितरण १ मे या दिवशी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने करण्यात आले. समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, चित्रपट कलाकार, धार्मिक क्षेत्र, राजकीय, साहित्यिक, दुर्गप्रेमी, संगीत आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा या वेळी गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख श्री. रामलालजी हे ‘मुख्य अतिथी’ म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही  ‘न्यूजमेकर अचिव्हर्स’ पुरस्कार स्वीकारला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. दैनिक ‘आफ्टरनून व्हॉईस’च्या संपादिका वैदेही ताम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समूहाच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

सरिता कौशिक यांचा सत्कार करतांना रामलालजी, राज्यमंत्री योगेश कदम आणि डॉ. वैदेही ताम्हण

या वेळी सर्वाेत्तम कार्यरत राजकारणी म्हणून मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम, सर्वाेत्तम भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी राजीव पाटील, संरक्षण क्षेत्रातील कर्नल (निवृत्त) प्रभात सूद, सर्वाेत्तम रंगकर्मी प्रशांत दामले, सर्वाेत्तम समाजसेवक दत्तात्रय माने, सर्वोत्तम महापौर आणि सामाजिक उद्योजक पुष्यमित्र भार्गव, सर्वोत्तम पत्रकार नेहा पुरव, सर्वोत्तम ‘न्यूज एडिटर’ सरिता कौशिक (एबीपी माझा), आशिष जाधव (लोकमत), आशुतोष पाटील (जय महाराष्ट्र) यांच्यासह अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या वेळी गौरव करण्यात आला.

या वेळी गड-दुर्ग आभ्यासक श्री. आप्पा परब मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘युवकांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेल्या आदर्शावरून वाटचाल करून देशाचे भवितव्य घडवावे.’’ मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘मी अधिक प्रामाणिकपणे काम करत रहावे आणि सेवा भावनेतून महाराष्ट्रासाठी अन्  जनतेसाठी कार्यरत रहावे, यासाठी हा पुरस्कार मला प्रेरणा देईल.’’

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह चौघांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार !

पं. हृदयनाथ मंगेशकर (पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या वतीने त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी पुरस्कार स्वीकारला), गड-दुर्ग अभ्यासक श्री. आप्पा परब, जे.व्ही. पवार, अभिनेत्री सौ. स्मिता जयकर आणि अनु अग्रवाल यांना या वेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आपापल्या क्षेत्रात भारताला पुढे नेण्यासाठी कार्य करायला हवे ! – रामलालजी, अखिल भारतीय संपर्कप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

महाराष्ट्राने भारताला अनेक संत, क्रांतीकारक आणि समाजसुधारक दिले आहेत. पुरस्कार विजेते आपल्या संस्कृतीचे आधुनिक ध्वजवाहक आहेत. जग भारतीय संस्कृतीचा स्वीकार करत आहे. ही संस्कृती पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी देश समक्ष होईल, असे कार्य आपल्याला करायचे आहे. येत्या काळात भारत जगाचे नेतृत्व करील. आपण ज्या क्षेत्रात आहोत, त्यामध्ये देश पुढे जाईल, असे कार्य करायला हवे.