विश्वकल्याणासाठी अहोरात्र झटणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना देण्यात आलेल्या ‘ॐ  शिव शक्ति ॐ’ पुरस्कार सोहळ्यातील क्षणमोती !

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार !

कण्णूर (केरळ) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी तथा विश्वकल्याणासाठी खडतर दैवी दौरे करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘ॐ  शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण क्षणमोती येथे देत आहोत.

कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आलेले विविध पुरस्कार !

‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्काराचे मानचिन्ह

आद्यशंकराचार्य जयंतीच्या दिवशी, म्हणजेच २ मे या दिवशी ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारासह या वेळी ‘माईलपिली (मोरपीस)’ पुरस्कारही प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार आरोग्य, तसेच अन्य क्षेत्रांत भरीव कामगिरी करणार्‍यांना दिला जातो.

‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार, तसेच ‘माईलपिली’ पुरस्कार प्रदान करण्याची संकल्पना ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’चे संस्थापक डॉ. सी.व्ही. रवींद्रनाथ यांची आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची कन्या शुभा रविंद्रनाथ यांनी कार्यक्रमाच्या आरंभी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर ‘निर्वाण षट्कम’ म्हणण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ. रवींद्रनाथ यांच्या ‘प्रेमांजली’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कृष्णा बिच रिसॉर्टचे श्री. सुमल यांनी आभारप्रदर्शन केले.

‘माईलपिली पुरस्कार’ पुरस्काराचे मानकरी

१. वरिष्ठ प्रा. डॉ. सुरेश के. गुप्तन्, आंतरराष्ट्रीय महासचिव, जागतिक शांतता संघटना आणि जागतिक पुनर्वसन संघटना

२. श्री. बी. लालमोहन, माजी वैज्ञानिक सल्लागार, सी.एन्.एस्-डी.आर्.डी.ओ. मुख्यालय, नवी देहली, तथा संस्थापक अध्यक्ष, शांतीग्राम मानवीयम चॅरिटेबल ट्रस्ट

३. डॉ. जया लालमोहन, आरोग्य सल्लागार, राष्ट्रीय आरोग्य अभियान, तथा केरळ राज्य उपाध्यक्ष, शांतीग्राम मानवीयम चॅरिटेबल ट्रस्ट

४. नाट्याचार्य गुरु श्री. एन्.व्ही. कृष्णन मास्टर, नृत्य शिक्षक

श्री श्री श्री माता अंबिका चैतन्यमयी यांचा थोडक्यात परिचय

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह तमिळनाडू येथील गुडालूर येथील चिंतामणी वाघेश्वरी मुकंबिका मंदिराच्या मठाधिपती प.पू. डॉ. ब्रह्म योगिनी श्री श्री श्री माता अंबिका चैतन्यमयी यांनाही ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री श्री श्री माता अंबिका चैतन्यमयी यांनी लहानपणापासून साधनेला आरंभ केला. त्यांना वेद, उपनिषदे आणि आयुर्वेद अवगत आहे. त्यांना ‘ब्रह्मयोगी पुरस्कार’ आदी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’विषयी थोडेसे…

‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने अध्यात्म आणि संस्कृती यांविषयी जागृती करण्यासाठी समाजात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार, ‘माईलपिली पुरस्कार’ आदी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या ट्रस्टच्या वतीने केरळमधील ‘कृष्णा बिच रिसॉर्ट’ येथे केंद्र चालवण्यात येते. या केंद्रात ‘योग, ध्यान आदींद्वारे तणाविरहित जीवन कसे जगायचे ?’, आदींविषयी समुपदेशन केले जाते. ही संस्था संयुक्त राष्ट्रांच्या ‘यू.एन्. ग्लोबल कॉम्पॅक्ट’शी संलग्न आहे. हा संयुक्त राष्ट्रांचा धोरणात्मक उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे मानवी हक्क, पर्यावरण आदी क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक आस्थापनांना सहकार्य आणि पाठिंबा दिला जातो.

कार्यक्रमात मान्यवरांनी मांडलेले उद्बोधक विचार

गुरूंच्या आशीर्वादानेच मनुष्य अध्यात्माच्या मार्गावर मार्गक्रमण करू शकतो ! – ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य, कुलपती, सनातन एलम वास्तूरत्न

आपल्या गुरूंचे कृपाशीर्वाद आणि त्यांचा परीसस्पर्श लाभल्यास आपण अध्यात्माच्या मार्गावर मार्गक्रमण करू शकतो. या कार्यक्रमाला उपस्थित रहायला मिळाले, हे माझे भाग्य आहे. आदि शंकराचार्य यांनी धर्मासाठी पुष्कळ मोठे योगदान दिले. कलियुगात अधर्म माजला आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून धार्मिक मूल्ये जपणे अतिशय आवश्यक आहे.

मानवी भावनांवर नियंत्रण असणे आवश्यक ! – प्रा. डॉ. सुरेश के. गुप्तन्, आंतरराष्ट्रीय महासचिव, जागतिक शांतता संघटना

जगात ६५ टक्के जनतेमध्ये निराशा दिसून येते. सध्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘डाऊन सिड्रोम’ (विकास खुंटणे, सौम्य ते मध्यम बौद्धिक अपंगत्व) आदी आजार दिसून येतात. या सर्व आजारांना मानवी भावना हे कारण आहे. या भावनांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. याविषयी मी पुस्तक लिहिले असून संयुक्त राष्ट्रांच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी त्याची निवड झाली होती. जर तुम्ही दिवसभरात १० मिनिटे हसू शकला नाहीत, तर तुमचे आयुष्य व्यर्थ आहे.

प्राणायाम हा तणावावर मात करण्याचा उत्तम उपाय ! – डॉ. ज्योती शमिथ, मुख्य चिकित्सक, ‘शिवोहम् स्पिरिच्युअल वेलनेस सेंटर’

कृष्णा बिच रिसॉर्ट हे केवळ हॉटेल नाही, तर ते एक आध्यात्मिक केंद्र आहे. लोकांमध्ये तणावाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या तणावाचा परिणाम आरोग्यावर होतो आणि त्यामुळे अनेक रोग होतात. यावर सोपा उपाय म्हणजे प्राणायाम करणे होय. शिवोहम् केंद्रामध्ये चांगल्या आरोग्यासाठी मसाज, तसेच शिरोधाराही केले जाते.

योग आणि ध्यानधारणा यांमुळे मी तणावमुक्त झालो ! – डॉ. लालमोहन, वैज्ञानिक सल्लागार, भारतीय नौसेना’

मी आयुष्यात योग आणि ध्यानधारणा केल्यामुळे तणावापासून मुक्ती मिळवू शकलो. त्यानंतर समाजही तणावमुक्त जीवन कसे जगू शकतो ?, यासाठी मी प्रयत्न करू लागलो. मी सुलभ असे कुंडलिनी योग शिकून घेतले. यामुळे तुमची सर्जनशीलता वाढते. समाजामध्ये कुंडलिनी जागृत करण्यासाठी योग शिकवणारी केंद्रे निर्माण करणे आवश्यक आहे. भारतीय सैनिकांसाठी सोपा आणि सुलभ योग कसा करू शकतो, हे मी शोधून काढले आहे.


समाजात साधनेचा प्रचार-प्रसार करणे आणि समाजाला समष्टी साधनेविषयी अवगत करणे, हा आपला धर्म !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा ‘ॐ शिव शक्ति ॐ’ हा पुरस्कार देऊन सन्मान केल्यावर त्यांनी मांडलेले आध्यात्मिक विचार !

१. ‘ॐ शिव शक्ति ॐ’ हा पुरस्कार मला नसून गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मिळाला आहे !

उपस्थित सर्व विद्वान आणि मान्यवर यांना माझा नमस्कार ! ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’चे संस्थापक डॉ. सी.व्ही. रवींद्रनाथ आणि त्यांच्या पत्नी सौ. सुधा यांनी आम्हाला येथे निमंत्रित केले. त्यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत. ‘ॐ शिव शक्ति ॐ’ हा पुरस्कार मला मिळाला नसून आमचे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मिळाला आहे. मी केवळ एक माध्यम आहे. गुरुकृपेमुळेच आपण जीवनात यशस्वी होतो. गुरुदेवांच्या कृपेनेच आपले जीवन सात्त्विक होते आणि आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो.

२. मानवी जीवनात साधनेला अनन्यसाधारण महत्त्व असून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली असणे

ईश्वरप्राप्ती हा जीवन जगण्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे आणि त्यासाठी साधना करायला हवी. साधना केल्यानेच आपल्याला आनंदप्राप्ती होते. साधना अनेक प्रकारे केली जाते. कुणी भक्तीमार्ग, कुणी ज्ञानमार्ग, कुणी ध्यानमार्ग, तर कुणी कर्ममार्ग या मार्गांनी ईश्वराच्या जवळ जातो; परंतु हे सर्व मार्ग एकाच पथावरून पुढे जातात आणि तो आहे, शरीर, मन अन् बुद्धी यांची विहंगम शुद्धी करणारा ‘गुरुकृपायोग’ हा मार्ग ! गुरुकृपायोग हा कलियुगातील ईश्वरप्राप्ती करून देणारा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. यात प्रामुख्याने नामजप, सत्सेवा, तसेच स्वभावदोष आणि अंहंनिर्मूलन कसे करावे ?, हे शिकवले जाते.

३. अध्यात्माचा अभ्यास आणि वैज्ञानिक संशोधन करून अध्यात्म अन् विज्ञान यांना एका सुवर्णधाग्याने सुंदररित्या गुंफणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर !

या विज्ञानयुगात लोकांची संतवचनांवर अल्प श्रद्धा असते; परंतु आपण तीच गोष्ट वैज्ञानिक संशोधन करून सांगितली, तर त्यावर लोकांचा अधिक विश्वास बसतो. आमच्या गुरुदेवांनी अध्यात्म आणि विज्ञान यांना एका सुवर्णधाग्याने सुंदररित्या गुंफले आहे. ‘जीवनातील प्रत्येक कृती सात्त्विक असली पाहिजे’, हे आम्हाला आमच्या गुरुदेवांनी शिकवले. ते स्वतः एक यशस्वी डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांनी जीवनातील लहान-मोठ्या गोष्टींवर संशोधन केले आहे, उदा. ‘सोळा संस्कारांचा उद्देश काय ? पूजा साहित्याचे महत्त्व काय ? सात्त्विक अलंकार कसे बनवावेत ? सात्त्विक पोशाख कसा असावा ? केसांची रचना कशी करावी ? अन्नपूर्णा कक्षात (स्वयंपाकघरात) भाजी कशी सात्त्विक पद्धतीने चिरावी ?’ इत्यादी. अशा अनेक विषयांवर सनातन संस्थेने ग्रंथ प्रकाशित केले आहेत. आमच्या गुरुदेवांनी प्रत्येक कृतीमागील अध्यात्मशास्त्र लोकांना सांगणे चालू केले. या प्रवाहात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने सहस्रो विषयांवर संशोधनपर प्रबंध सिद्ध केले असून त्यांना देश-विदेशांत गौरवण्यात आले आहे. या प्रवाहात डॉ. रविंद्रनाथ हे आमच्याशी जोडले गेले. ‘ते या कार्याशी जोडले जाणे’, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

४. ‘मनुष्यजन्माचा प्रमुख उद्देश ‘ईश्वरप्राप्ती करणे’, हाच आहे’, हे मनावर बिंबवून समाजाला अध्यात्म आणि साधना यांकडे वळवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

विज्ञानाच्या भाषेत आणि सोप्या शैलीत लोकांना अध्यात्म सांगितले, तरच ते साधना करू शकतात. सात्त्विक आणि असात्त्विक यांमधील भेद समजण्यासाठी प्रत्येकाला साधना ही करावीच लागते. साधनेने आपल्याला नकारात्मक आणि सकारात्मक स्पंदने यांतील भेद ओळखता येऊ लागतो. जेव्हा नामजप, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांमुळे आपले शरीर, मन शुद्ध होऊ लागते, तेव्हा आपल्याला हा भेद प्रामुख्याने लक्षात येऊ लागतो. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करावे ?’ या विषयावर सनातन संस्थेने ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

जीवनातील प्रत्येक कर्म सात्त्विक झाले, तर ईश्वरप्राप्ती दूर नाही. ‘समाजात साधनेचा प्रचार-प्रसार करणे आणि समाजाला समष्टी साधनेविषयी जागृत करणे’, हा आपला धर्म आहे आणि हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यामुळे समाजात साधनेविषयी जागृती निर्माण होईल आणि आपले राष्ट्र आपोआपच सात्त्विक होईल !

आमचे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी आम्हाला ‘समाजात सात्त्विकता कशी निर्माण करावी ?’, याविषयीचे शिक्षण दिले. आमच्यावर साधनेचे संस्कार केले. ‘या कलियुगात सात्त्विक रूपात कसे जगावे ?’, हे त्यांनीच आम्हाला शिकवले आणि ‘मनुष्यजन्माचा प्रमुख उद्देश ईश्वरप्राप्ती करणे, हा आहे’, हे मनावर बिंबवले. त्यांनी आमचे जीवन ईश्वरी चैतन्याने समृद्ध केले आणि आम्हाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवला. यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.

५. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या शिकवणीमुळे अनेक लोक संत बनून जीवनमुक्त होतील !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते वर्ष २०१४ मध्ये करण्यात आली. त्यामुळे अध्यात्मशास्त्रात रुची घेणारे अनेक लोक आता जोडले जात आहेत. या विश्वविद्यालयाच्या शिकवणीमुळे अनेक लोक संत बनून जीवनमुक्त होतील, यात शंका नाही. जीवनात ‘संत’ या पदवीहून कोणती मोठी पदवी असू शकेल का ? ‘ईश्वरी कृपेने सर्व लोक साधना करून सर्वत्र सात्त्विक समाज आणि राष्ट्र निर्माण व्हावे, तसेच सर्व लोक जीवनमुक्त व्हावेत’, अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना विराम देते.

जय गुरुदेव । जय श्रीकृष्ण ।

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ